October 22, 2008

माझा गाव आणि माझे लहानपण-भाग-३

समुद्राच्या भरतीचं पाणी खारेपाटणपर्यंत येतं.खारेपाटण हे इतिहासात एक व्यापारी बंदर होतं. तिथून मीठ आणि कौलांचा व्यापार चालायचा. गावातून वाहणारी शुक नदी सह्याद्रीत उगम पावते आणि खाली ५०- ६० किमीवर समुद्राला मिळते. त्यामुळे तेव्हा खारेपाटणच्या डाउनस्ट्रीमचे लोक बाजाराला इथे यायचे ते भरती सुरु झाली की. म्हणजे समुद्राच्या भरतीच्या पाण्याबरोबर होडी आपोआप यायची. ओहोटी सुरु झाली की ओहोटीच्या पाण्याबरोबर घरी परत जायचं. खारेपाटणला खूप जुना इतिहास आहे. तश्या इथे खूप खूणा सापडतात. फारसे कुठे न आढळणारे सूर्यमंदीर आणि सूर्यमूर्ती इथे आहे.

साजराबाईच्या टेकडीच्या पायथ्याला आमची कॉलनी आहे. ते एक २५-३० घरांचं कुटुंबच!!. गावात, बाजारपेठेत पावसाळ्यात पूर यायचे हमखास. त्यामुळे, गावापासून थोडं दूर, उंचावर, मुंबई- गोवा हायवेच्या कडेला आमची कॉलनी झाली. जेव्हा ही कॉलनी बांधली तेव्हा तिथूनच दगड काढले गेले, त्यामुळे एक मोठ्ठ तळं निर्माण झाल आहे.विशेष महत्त्वाचं म्हणजे आमची कॉलनीच्या जागेवर एक पुरातन विहीर होती. अजूनही आहे. ही काही साधी नेहमीची विहीर नाही. ही विहीर अती-प्राचीन असून तीला नऊ बाजू आहेत. म्हणजे जसं चौकोनी किंवा गोल बांधकाम असतं तसं हे नऊकोनी . कुण्या अनामिकाने प्राचीनकाळी हे नऊकोनी बांधकाम का केल ते नाही कळत.

हायवेच्या कडेने दुतर्फा वडाची झाडं छान सावली देतात. ह्या वडांच्या झाडाखाली हायवेच्या कामासाठी सिमेंटचे मोठे पाईप टाकले होते. तेव्हा आम्ही मित्रमंडळी त्या पाईपांवर चढून वरती वडाच्या पारंब्या धरून, खाली पायाने पाईप पुढे ढकलण्याचे अचाट खेळ खेळायचो. पावसाळ्यानंतर टाकळे माजले की त्यावर येणार्या पिवळ्या- करड्या फुलपाखरांच्या मागे बेभान होऊन धावायचं आणी आपली फुलपाखरांची शिकार एकमेकाला दाखवण्यात काय थ्रील वाटायचं राव. पण आता त्याला क्रूरपणा, निसर्गाचा ह्रास असे काही काही म्हणतात!

तसाच क्रूरपणा म्हणजे खैराच्या झाडावर कोवळे कोंब खायला आलेले भुंगे पकडून, त्यांना करवंदीचा काटा आणी पानात टोचून , तो कसा काटयाभोवती सुटकेसाठी फिरतो ते पाहणे. पुढे फिजिक्सच्या प्रोफ नी सेंट्रीफ्युगल फोर्सचा कन्सेप्ट शिकवताना, मला तो करवंदीच्या काट्याभोवती फिरणरा भुंगा आठवला!!मग पुढे -पुढे क्रिकेट, व्हॉलीबॉल, कबड्डी सुरु झाल्यावर असले खेळ बंद झाले.

पण आमच्या कॉलनीत खूप धमाल यायची. समोर रामेश्वराच्या मंदिराच्या पाठीमागे डोंगरावर आकाश टेकल्यासारखे वाटायचं. त्याला आम्ही क्षितीज-रेषा म्हणत असू. त्या डोंगरावरून पावसाळ्यात आम्ही नैसर्गिक घसरगुंडी करायचो. म्हणजे चक्क उतार पावसाने निसरडा झाला की बसून घसरत यायचं खाली. दर पावसाळ्यात एक तरी चड्डी घासून फाटायचीच!!

No comments:

Post a Comment