January 24, 2009

विद्रोही साहित्य संमेलनात उच्चवर्णीय मस्तानी

कणकवली- सिंधुदुर्ग येथे ३१ जानेवारीला होणारया १० व्या विद्रोही साहित्य संमेलनाच्या २५ पानी अध्यक्षीय भाषणातील काही पाने काल आमच्या हाती लागली. त्या पानांचा गोषवारा तसेच तिथे मांडले जाणारे काही ठराव इथे देत आहे.
पान क्र. १.
आज दहाव्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरुन बोलताना मला विशेष आनंद होत आहे. कष्टकरी समाज जो वंचित होता तो आता मुख्य प्रवाहात येण्यासाठी संघर्ष करत आहे. बाबासाहेबांच्या, फुल्यांच्या शाहूंच्या उपकारातून आपला समाज कधीच मुक्त होवू शकत नाही. आपण ज्या समाजातून वर आलो त्या कष्ट्करी समाजाचे प्रतीक म्हणून आपण ह्या संमेलनाचे उद्घाटन गाढव पूजनाने करतो. गाढव हे कष्टाचे प्रतीक आहे. ओझी वाहून ते पिचून गेले आहे. उच्चवर्णीयांची ओझी वाहताना आपले पूर्वज असेच पिचून गेले. त्याची आठवण आपल्याला सदा सर्वदा रहावी म्हणून आपण गाढव पूजनाने आपले संमेलन सुरु करतो.त्यांच्या संमेलनाची सुरुवात ग्रंथ दिंडी तसेच दीप प्रज्वलनाने होते. आपल्याला ग्रंथ वाचायला मिळत नाहीत तसेच घरी खायला तेल नसते तर दिव्यात घालायल कुठून आणणार? त्यामुळे अश्या उच्चवर्णीय परंपरांचा हे संमेलन धिक्कार करत आहे…( टाळ्या…)
पान ५
संमेलन हा शब्द उच्च वर्णीयांच्या एका आता वापरात नसणारया भाषेतून आलेला आ्हे. त्यामुळे आपल्या वार्षिक समारंभाला संमेलन न म्हणता दुसरा शब्द सुचवा असे मी आपणा सर्वांना आवाहन करतो/ तसेच आपल्या लेखनात, बोलण्यात असे ह्या वापरात नसलेल्या, उच्चवर्णीयांनी ज्या भाषेत सगळे ज्ञान बंदिस्त करुन ठेवले त्या भाषेतील शब्द वापरु नयेत असे मी आपल्याला आवहन करतो.विद्रोही चळवळीत अनेक लेखक कवी कादंबरीकार झाले आहेत. त्यांच्या लेखनातील असे ह्या भाषेमधून आलेले शब्द घालवून, त्याएवजी बोलीभाषेतील शब्द वापरुन, त्यांचे पुन्हा एकदा लेखन करण्याची गरज आहे. हे महान कार्य हाती घेण्यासाठी मी विद्रोही चळवळीतील तरुण लेखक-लेखिकांना हाक देत आहे.

पान ७
शुद्धलेखन म्हणजे काय? त्याचे नियम कोणी ठरवले? ते नियम आपण का पाळायचे? ह्याचा विचार करण्याची आता वेळ आली आहे. साजूक तुपातील शिरा खाता खाता, आपल्या घराच्या बागेत बसून ह्या उच्चवर्णीयांनी हे नियम बनवले. तेव्हा घराच्या खिडकीतून त्यांनी समोर नजर टाकली असता, त्यांना जेवढी काही पेठ , जिमखाना किंवा पार्क दिसला तेवढ्यांना समजेल असे नियम त्यांनी बनवले. ते आम्ही का शिकावे? शिकले तरी का पाळावे?तेव्हा विद्रोही चळवळीच्या पुढ्च्या पिढीवर ही जबाबादारी मी अध्यक्षाच्या नात्याने टाकत आहे. तरुण पिढी असे नवीन नियम बनवेल आणि ते आपण अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यासाठी आंदोलन करु.सध्या पुणेरी बोलीचा हिच प्रमाण भाषा बनवण्याचा एक कट शिजत आहे. बरेच लेखक इथं, तिथं, तिनं, त्यानं असे शब्द तसेच सागरनी केलं, मीनलनी सांगितलं असा जगावेगळा नी हा विभक्तीप्रत्यय आपल्या लेखनात वापरुन, ही पुणेरी बोली रुढ करु पहात आहेत. हा कट आपण हाणून पाडला पाहिजे.अशी अनेक आव्हाने , विद्रोही चळवळीसमोर उभी आहेत. ती पेलण्यासाठी चळवळीतील सगळ्यांनी एकत्र येण्याची गरज आहे.

पान १७
अमेरिकेतील साहित्य संमेलनावर टीका करणे ही आता फॅशन झाली आहे. उच्च वर्णीय लेखकांनी ह्या संमेलनावर् टीका करुन प्रसिद्धी मिळवली. त्यांना खरेतर तिकडे जायचे होते. पण वयोमाना प्रमाणे जाउ न शकल्यामुळे आता टीका करुन ते प्रसिद्धी मिळवत आहेत. अश्या लोकांपासून सावध रहाण्याचा मी आपल्याला वडिलकीचा सल्ला देत आहे.खरे तर अनेक उच्च वर्णीय लेखकांनी आपल्या लेकी- सुनांच्या बाळंतपणासाठीच्या तारखांप्रमाणे हे संमेलन ठरवले आहे. त्यासाठी शासनाच्या खर्चाने हे तिकडे जात आहेत. निमित्त मात्र संमेलनाचे आहे.अश्या संमेलनासाठी २५ लाख देणारया शासनाचा हे संमेलन निषेध करत आहे.

पान २५
आपल्यासारखेच कष्टकरी जनतेतून वरती आलेले पण सध्या विद्रोही चळवळीशी फारकत घेतलेले प्रा. डॉ. आनंद यादव ह्यांची, त्यांच्या संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड होणे हा मी विद्रोही चळवळीचा विजय समजतो. ते फिरुन चळवळीत येतीलच ह्याची मला खात्री आहे.
जय साहित्य जय विद्रोह!
प्रा.डॉ.दंगाधर तानपावणे ह्यांना मी विनंती करतो की त्यांनी एक महत्त्वाचा ठराव मांडावा.

ठराव :
पाबळ येथे असलेली, मस्तानीची समाधी काही समाजकंटकांनी गुप्तधनाच्या अपेक्षेने उखडली. ह्या समाधीचे सरकारी खर्चाने पुन्हा बांधकाम करुन दिले जात आहे. मस्तानी म्हणजे शाहू महाराजांची सत्ता बुडवण्याचे कार्य करणारया उच्चवर्णीय राजाची प्रेयसी. अश्या उच्चवर्णीय राजाची एय्याशी त्याच्या मृत्यूनंतरही पुरवणारया शासनाचा हे संमेलन निषेध करत आहे.
जय साहित्य जय विद्रोह!

January 17, 2009

धैर्य धुरंधर आणि दहशतवादी पक्षी

न्यूयॉर्कमधून उड्डाण केलेल्या १५० प्रवाश्यांना घेउन जाणारया यू.एस एअरवेजच्या विमानाला पक्षी धडकल्यामुळे, विमानाची दोन्ही इंजिन बंद पडली. त्यामुळे कप्तान सुलेनबर्गर ह्यांनी विमान हडसन नदीत उतरवले. ह्या त्यांच्या धाडसी निर्णयामुळे मोठी जिवीतहानी वाचली. ११ सप्टेंबरसारखा दुर्दैवी प्रसंग टाळण्यासाठी कप्तानाने लोकवस्तीचा भाग टाळून विमान नदीवर उतरवले.

आधुनिक विमाने पाण्यावर बराच काळ तरंगू शकतात. त्यासाठी पाण्यावर विमान उतरवण्याचेही खास कसब लागते. त्यापेक्षाही प्रसंगावधान महत्त्वाचे. उड्डाण सुरक्षेबद्दल आपल्याला विमानात ज्या सूचना दिल्या जातात त्यात अश्या दुर्मिळ प्रसंगी काय करावे ह्याबद्दलही सूचना असतात.

परंतु असा धाडसी निर्णय घेणे आणि त्याची पूर्ण प्रसंगावधानाने अंमलबजावणी करणे हे काम ज्यांनी केले त्या कप्तान सुलेनबर्गर ह्यांना माझा सलाम. विमानातील १५० फक्त नव्हे तर अश्या दुर्घटनाग्रस्त विमानामुळे धोका उत्पन्न झालेल्या , शहरातील इतर लोकसंख्येलाही त्यांनी वाचवले. असा निर्णय घेण्यातील थोडीशी दिरंगाई एका मोठ्या दुर्घटनेचे निमित्त झाली असती.
हडसन नदीतील १ अंश सेल्सियस तापमानात बचावकार्यासाठी फेरी, पोलिस, कोस्ट-गार्ड तत्परतेने आल्यामुळे प्राणहानी झाली नाही. सर्व १५० लोक वाचले.

सगळ्यात शेवटी कप्तान सुलेनबर्गर बाहेर आले. बाहेर येण्यापूर्वी आइल्समधून त्यांनी दोन चकरा मारुन कोणी राहिले नसल्याची खात्री करुन घेतली. त्यांना कॅप्टन करेजियस असेच म्हणावे लागेल.

पण इथे तर अमेरिकेच्या हवाई दलातील निवॄत्त वैमानिकाने आपला अनुभव आणी कौशल्य पणाला लावत, विमान नदीवर उतरवले. लगोलग मदतकार्य सुरु होउन सर्वांचे प्राण वाचले. ह्या घटनेचे विश्लेषण करताना तज्ञांनी असे सांगितले की, विमानातील हवेच्या दाबामुळे बायोनन्सी प्राप्त होते , त्यामुळे विमानाचे दरवाजे उघडले जाइपर्यन्त विमान पाण्यावर तरंगू शकते. पाण्यावर विमान उतरवताना असामान्य कौशल्याशी गरज भासते. पहिल्यांदा शेपटी पाण्यात घालून धक्का कमी करावा लागतो. इथे वैमानिक हवाइ दलात काम केलेला असल्यामुळे त्याने आपला अनुभवाच्या जोरावर ही अशक्य बाब शक्य करुन दाखवली. नदीवर हे लॅन्डींग करताना विमान पूर्णपणे वैमानिकाच्या ताब्यात होते. हे त्यांचे कौशल्य म्हणावे लागेल. अश्या धाडसी, प्रसंगावधानी कॅप्टनला सलाम.

दरम्यान आत्ताच समजलेल्या वॄत्तानुसार ह्या घटनेमागे अल- कायदाचा हात असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ह्या दहशतवादयांनी विमान अपघात घडवून आणण्यसाठी खास प्रशिक्षित पक्षी आपल्या संघटनेत भरती केले असून, असे पक्ष्यांचे थवे मुंबई, हिथ्रो, न्यूयॉर्क अश्या महत्त्वाच्या विमानतळांच्या आसपास सोडून दिले आहेत.

हे पक्षी फिदायीन असून, आपल्या जीवाची पर्वा न करता विमानाच्या इंजिनात घुसतात. विमानाची आणी पर्यायाने त्यामुळे मोठी जिवीतहानी घडवून आणाण्याचा हा मोठा डाव आहे. ह्या पक्ष्यांना अफगाणिस्ताना खास प्रशिक्षण दिले जात असून, हळूहळू जगातील सर्व महत्त्वाच्या विमानतळांच्याआसपास हे पक्षी आपला तळ ठोकतील.
अश्या पक्षांवर मनुष्यहानीस कारणीभूत ठरल्यामुळे न्यूयॉर्क न्यायालयात खटला दाखल झाल्याचेही समजले आहे. मूक मानवाच्या हत्येचा प्रयत्न करणारया पक्षांना इतके दिवस पाठिशी घालणारया मनेका, अल गोर वगैरे प्रभॄतींना सुद्धा ह्या खटल्यात प्रतिवादी केल्याचे समजते.

December 6, 2008

जातो आपुल्याच गावा

अष्टाक्षरी छंदातील ही रचना असून. माझे छंदगुरु श्री. धोंडोपंत ह्यांच्या छंदविवेचनानंतर ही स्फुरली आहे. आता उद्या घरी जाणार तेव्हा काय काय होइल ह्याच्या कल्पना लढबत असतानाच हे रचना झाली. ८,८,८,८ अशी रचना तसेच दुसरया आणि चौथ्या ओळीचे यमक हे ह्या छंदाचे वैशिष्ट्य.

पोचले रे माझे मन
घरीदारी भारतात
भेटतील सानथोर
हात घेउनी हातात

दिन एकच उरला
नुरले हे माह तीन
माझ्या आधी पोहोचली
माझी वेडी आठवण

धाव घेइल अनन्या
वेगे कुशीत शिरेल
घरी पाउल पडता
बार्बी द्यावया लागेल

हुंकारेल माझा दंफी
रांगे रांगे घेइ धाव
अष्ट शब्दी छंद आहे
अनुष्टुभ त्याचे नाव

बोजे ठेवूनी बाजूला
थोडा टाकीन मी श्वास
पाण्यासोबत ऎकेन
काकणांचे अनुप्रास

असेलच आई तिथे
आणि बाबा उत्सुकसे
काय होइल होइल
सर्व तुम्हां सांगू कसे!


(माझ्या मुलाचे नाव अनुष्टुभ. ते ठेवताना बराच काथ्याकूट झाला होता. त्याची आत्ता आठवण येत आहे. अनुष्टुभात सुद्धा ८ अक्षरे येतात पण लघु-गुरु अक्षरांचे नियम वेगळे आहेत.गीता, रामरक्षा, अनेक संत रचना तसेच भीमरुपी स्तोत्र हे अनुष्टुभ छंदाची उदाहरणे.)

असो चला आता परत भेटू , पण थोडया विश्रांतीनंतर!!

December 5, 2008

सोनियाच्या तालावर महाराष्ट्र वारयावर

चाल : चंदनाच्या पाटावर सोन्याच्या ताटावर

मोत्याचा घास तुला भरविते


सोनियाच्या तालावर महाराष्ट्र वारयावर

मुख्यमंत्री आता मी निवडिते. धॄ.

पदावर मुख्य नव्हता

पोलिसांना मंत्री नव्हता

मनी त्याचा सल नव्हता

पित्त्या बसवायचा होता

गुरहाळ चर्चेचे किती घालते ......



सोनियाच्या तालावर महाराष्ट्र वारयावर

मुख्यमंत्री आता मी निवडिते. धॄ.


जन्तेला फाट्या मारिले

नवे नायक नाही दिले

पायांना कितीक खेचले

पछाड धोबी टाकले

डाव कुटील किती मी खेळते........



सोनियाच्या तालावर महाराष्ट्र वारयावर

मुख्यमंत्री आता मी निवडिते. धॄ.


झाला मुंबैइवर हल्ला

इकडे नेत्यांचाच कल्ला

लावला निष्टेचा बिल्ला

कोण मुख्यमंत्री ते बोला

आमदारांची सगळ्या मते जाणते.......



सोनियाच्या तालावर महाराष्ट्र वारयावर

मुख्यमंत्री आता मी निवडिते. धॄ.


कसे केले बिनबोभाट

झाला नारायण सपाट

बाकी सगळेच हे माठ

आहे माझ्याशीच गाठ

पक्षावर सत्ता माझी चालते.......



सोनियाच्या तालावर महाराष्ट्र वारयावर

मुख्यमंत्री आता मी निवडिते.

December 3, 2008

अब पछतावेसे क्या फायदा भाग पहिला

मी कासीम. मुंबईवर हमला करुन मी एकटाच कैद झालो.बॉसने सायनाइडची गोळी दिली होती. पुलिसने पकडले तर खायला. पण इथली मुंबईची पुलिस एकदम चुस्त. ज्या अफसरवर गोळी चालवली त्याने शेवटचा सास भरण्याआधी दरोगाला तेच सांगितले. दरोगाने माझे हाथच पकडून ठेवले आणि ती गोळी काढून घेतली. म्हणूनच तर पकडला गेलो. पण आमच्या पुलिसपेक्षा इथली पुलिस एकदम जांबाज. आमच्या हाथात रायफल , तरीपण एकसाथ दोन हविलदार कूदले आमच्यावर. अमीन तर अल्ला ला प्यारा झाला. बदनसीबीने मी कैद झालो.

आता पुलिसला सांगतोय मला मरु दया. माझ्या घरवाल्यांना जिंदगी हराम करतील आता आर्मीवाले. सलमाआपाची शादी आताच झाली, तिच्या ससुरालवाल्यांना अम्मी- अब्बा आता काय सांगतील? बडे भय्या लाहोरला आहेत, मेहनत मजदूरी करतात. त्यांची पण शादी होउन चार साल झाले, दोन बच्चे आहेत. त्यांना पण आता आर्मीवाले नाही सोडणार. घरी अजून एक छोटी बह्न आणि भाइ आहे. ते काय करतील, आर्मीवाले अम्मी- अब्बुला घेउन गेले तर? मग मला मारुन टाका. म्हणजे मी काय सांगायला पण नको आणी माझ्या घरवाल्यांना काही तकलीफ पण नाही.

अब्बु फरिदपूरमध्ये कसाई होते. तेव्हा मी असेन चार सालचा. इदला बकरे हलाल करत होते अब्बु, ते बघून मी बेहोश झालो. मग अब्बुनी तो धंदा सोडला. चाटची गाडी लावली बझारमध्ये. मुलतानमध्ये किती होणार धंदा. त्यात पाच पोरांचा संसार. मग एक दिवस माझा बडा भाइजान निघून गेला. तेवढाच बोझ हल्का झाला. तो मेहनत- मजदुरी करायचा. इदला यायचा मिठाइ- कपडे घेउन.

असेच काही दिवस गेले. माझी बडी बहन सलमा आपाला रिश्ता आला. तिच्या शादीसाठी अब्बुनी घर गिरवी ठेवले. शादीनंतर दोन महिन्यातच मुलतानला दंगा झाला. सात दिन कर्फ्यू लागला. अब्बुचा काहीच धंदा नाही. अनाज संपले होते. तो शाबानचा महिना होता अजून रमजान यायला एक महिना होता, पण रमजानच्या आधीच आम्ही सात दिन रोजे केले. तेव्हा माझी उमर होती १७ सालची. काही समजत नव्हतं. उपासमारीने राग आला होता. मग अब्बुशी झगडा करुन घर सोडले. अब्बुला जोशात दिल चाहेल ते बोललो. पालना नही आता तो जना क्यू हमें असे काही बोललो अब्बु रडत होते. पण मी बाहेर पड्लो.
रागात पिंडीला पोचलो. एका मदरश्यात आसरा मिळाला. तिथे शाहरुख, आमीरचे पिक्चर बघायला मिळायचे. वाटायचं काय जन्नत आहे हिंदुस्तानात. तिथेले जातभाइ पण किती नसीबवाले, नाहीतरी काय मिळत होतं आम्हाला? दोन वेळची रोटी मिळाली तर लोक अल्लाची शुकर मानायचे. त्या पिक्चरमध्ये तर काय मस्त दिसायची हिंदुस्तानमधील जिंदगी. आमच्याकडे गोरे लोक गेल्यानंतर एक मैल पण जादा पटरी नाही वाढवली सरकारने. इकडे हिंदुस्तान कुठे पोचला.
एक दफा तरी हिंदुस्तानात जायला पहिजे तिथे असं वाटायचं.

पण मदरश्यातला मौलवी काही काही सांगायचा, त्याच्याकडे कोण कोण लोक यायचे, मग त्यांच्या लंब्या मसलती चालायच्या. ते गेले की मौलवी मदरश्यातील माझ्या सारख्या पोरांना गोळा करायचा. आणि कसले कसले कागद वाटायचा. ते वाचायला लावायचा. मग खुद भाषण दयायचा. ती भाषण एकून हळू हळू कश्मीरमध्ये हिंदुस्तानी आर्मी काय करते ते समजायला लागलं आमच्या जातभाईंवर तिथे आर्मी काय काय बदसुलूक करते ते मौलवी समजून सांगायला लागला. शाहरुख आमीरच्या मुंबईपासून कश्मीर किती दूर ते माहित नव्हतं पण नंतर मौलवीने एकदा तर मदरश्यातल्या टीव्हीवर एक टेप लावली. त्याच्यात तर कश्मीरमधे काय काय चालू आहे ते दाखवले. एकदम रक्त तापून निघाले. मग मौलवीकडे हमेशा येणरयापैकी दोघे आले. त्यांनी अजून भाषण दिले.

अजून काही कमवत नव्हतो. मदरश्यात दोन वक्तची रोटी तर मिळत होती. बस्स पिंडीत आर्मी अफसर खूप. ते कार घेउन फिरायला बाहेर पडत. त्यांची पोरं टाय लावून इंग्लीश शाळेत जायची. सुबह शाम आर्मी अफसरांच्या बायका आणी पोरी, बघत भटकायचं. शाहरुख, आमीरचे पिक्चर बघायचे. दुपारी आणि रात्री खान्या अगोदर मौलवीचे भाषण एकायचं अशी मस्त जिंदगी होती. मग नंतर मौलवीच्या त्या दोस्तांच्या खेपा वाढू लागल्या. कश्मीरच्या जोडीला आता तर हैद्राबाद- जयपूरच्या टेप येउ लागल्या. मौलवीचे दोस्त पण रोज भाषण देउ लागले.हिंदुस्तानी एवढी तरक्की केली म्हणतात मग इतके बदसुलूक का करतात?

पाच सहा महिने असेच गेले. एकदम मौलवी आला. मला म्हणाला तुला खुदाचा वास्ता, तुला खुदाने त्याची सेवा करायचा मोका दिलाय. भरोसा ठेव. मी सांगतो तिथे जा म्हणाला. तुझे घर गिरवी ठेवलंय ना ते सोडवून देतो. अब्बुकडे कुठे एवढे पैसे. घर सुटतंय म्हणून मी हो म्हणालो.