December 6, 2008

जातो आपुल्याच गावा

अष्टाक्षरी छंदातील ही रचना असून. माझे छंदगुरु श्री. धोंडोपंत ह्यांच्या छंदविवेचनानंतर ही स्फुरली आहे. आता उद्या घरी जाणार तेव्हा काय काय होइल ह्याच्या कल्पना लढबत असतानाच हे रचना झाली. ८,८,८,८ अशी रचना तसेच दुसरया आणि चौथ्या ओळीचे यमक हे ह्या छंदाचे वैशिष्ट्य.

पोचले रे माझे मन
घरीदारी भारतात
भेटतील सानथोर
हात घेउनी हातात

दिन एकच उरला
नुरले हे माह तीन
माझ्या आधी पोहोचली
माझी वेडी आठवण

धाव घेइल अनन्या
वेगे कुशीत शिरेल
घरी पाउल पडता
बार्बी द्यावया लागेल

हुंकारेल माझा दंफी
रांगे रांगे घेइ धाव
अष्ट शब्दी छंद आहे
अनुष्टुभ त्याचे नाव

बोजे ठेवूनी बाजूला
थोडा टाकीन मी श्वास
पाण्यासोबत ऎकेन
काकणांचे अनुप्रास

असेलच आई तिथे
आणि बाबा उत्सुकसे
काय होइल होइल
सर्व तुम्हां सांगू कसे!


(माझ्या मुलाचे नाव अनुष्टुभ. ते ठेवताना बराच काथ्याकूट झाला होता. त्याची आत्ता आठवण येत आहे. अनुष्टुभात सुद्धा ८ अक्षरे येतात पण लघु-गुरु अक्षरांचे नियम वेगळे आहेत.गीता, रामरक्षा, अनेक संत रचना तसेच भीमरुपी स्तोत्र हे अनुष्टुभ छंदाची उदाहरणे.)

असो चला आता परत भेटू , पण थोडया विश्रांतीनंतर!!

December 5, 2008

सोनियाच्या तालावर महाराष्ट्र वारयावर

चाल : चंदनाच्या पाटावर सोन्याच्या ताटावर

मोत्याचा घास तुला भरविते


सोनियाच्या तालावर महाराष्ट्र वारयावर

मुख्यमंत्री आता मी निवडिते. धॄ.

पदावर मुख्य नव्हता

पोलिसांना मंत्री नव्हता

मनी त्याचा सल नव्हता

पित्त्या बसवायचा होता

गुरहाळ चर्चेचे किती घालते ......



सोनियाच्या तालावर महाराष्ट्र वारयावर

मुख्यमंत्री आता मी निवडिते. धॄ.


जन्तेला फाट्या मारिले

नवे नायक नाही दिले

पायांना कितीक खेचले

पछाड धोबी टाकले

डाव कुटील किती मी खेळते........



सोनियाच्या तालावर महाराष्ट्र वारयावर

मुख्यमंत्री आता मी निवडिते. धॄ.


झाला मुंबैइवर हल्ला

इकडे नेत्यांचाच कल्ला

लावला निष्टेचा बिल्ला

कोण मुख्यमंत्री ते बोला

आमदारांची सगळ्या मते जाणते.......



सोनियाच्या तालावर महाराष्ट्र वारयावर

मुख्यमंत्री आता मी निवडिते. धॄ.


कसे केले बिनबोभाट

झाला नारायण सपाट

बाकी सगळेच हे माठ

आहे माझ्याशीच गाठ

पक्षावर सत्ता माझी चालते.......



सोनियाच्या तालावर महाराष्ट्र वारयावर

मुख्यमंत्री आता मी निवडिते.

December 3, 2008

अब पछतावेसे क्या फायदा भाग पहिला

मी कासीम. मुंबईवर हमला करुन मी एकटाच कैद झालो.बॉसने सायनाइडची गोळी दिली होती. पुलिसने पकडले तर खायला. पण इथली मुंबईची पुलिस एकदम चुस्त. ज्या अफसरवर गोळी चालवली त्याने शेवटचा सास भरण्याआधी दरोगाला तेच सांगितले. दरोगाने माझे हाथच पकडून ठेवले आणि ती गोळी काढून घेतली. म्हणूनच तर पकडला गेलो. पण आमच्या पुलिसपेक्षा इथली पुलिस एकदम जांबाज. आमच्या हाथात रायफल , तरीपण एकसाथ दोन हविलदार कूदले आमच्यावर. अमीन तर अल्ला ला प्यारा झाला. बदनसीबीने मी कैद झालो.

आता पुलिसला सांगतोय मला मरु दया. माझ्या घरवाल्यांना जिंदगी हराम करतील आता आर्मीवाले. सलमाआपाची शादी आताच झाली, तिच्या ससुरालवाल्यांना अम्मी- अब्बा आता काय सांगतील? बडे भय्या लाहोरला आहेत, मेहनत मजदूरी करतात. त्यांची पण शादी होउन चार साल झाले, दोन बच्चे आहेत. त्यांना पण आता आर्मीवाले नाही सोडणार. घरी अजून एक छोटी बह्न आणि भाइ आहे. ते काय करतील, आर्मीवाले अम्मी- अब्बुला घेउन गेले तर? मग मला मारुन टाका. म्हणजे मी काय सांगायला पण नको आणी माझ्या घरवाल्यांना काही तकलीफ पण नाही.

अब्बु फरिदपूरमध्ये कसाई होते. तेव्हा मी असेन चार सालचा. इदला बकरे हलाल करत होते अब्बु, ते बघून मी बेहोश झालो. मग अब्बुनी तो धंदा सोडला. चाटची गाडी लावली बझारमध्ये. मुलतानमध्ये किती होणार धंदा. त्यात पाच पोरांचा संसार. मग एक दिवस माझा बडा भाइजान निघून गेला. तेवढाच बोझ हल्का झाला. तो मेहनत- मजदुरी करायचा. इदला यायचा मिठाइ- कपडे घेउन.

असेच काही दिवस गेले. माझी बडी बहन सलमा आपाला रिश्ता आला. तिच्या शादीसाठी अब्बुनी घर गिरवी ठेवले. शादीनंतर दोन महिन्यातच मुलतानला दंगा झाला. सात दिन कर्फ्यू लागला. अब्बुचा काहीच धंदा नाही. अनाज संपले होते. तो शाबानचा महिना होता अजून रमजान यायला एक महिना होता, पण रमजानच्या आधीच आम्ही सात दिन रोजे केले. तेव्हा माझी उमर होती १७ सालची. काही समजत नव्हतं. उपासमारीने राग आला होता. मग अब्बुशी झगडा करुन घर सोडले. अब्बुला जोशात दिल चाहेल ते बोललो. पालना नही आता तो जना क्यू हमें असे काही बोललो अब्बु रडत होते. पण मी बाहेर पड्लो.
रागात पिंडीला पोचलो. एका मदरश्यात आसरा मिळाला. तिथे शाहरुख, आमीरचे पिक्चर बघायला मिळायचे. वाटायचं काय जन्नत आहे हिंदुस्तानात. तिथेले जातभाइ पण किती नसीबवाले, नाहीतरी काय मिळत होतं आम्हाला? दोन वेळची रोटी मिळाली तर लोक अल्लाची शुकर मानायचे. त्या पिक्चरमध्ये तर काय मस्त दिसायची हिंदुस्तानमधील जिंदगी. आमच्याकडे गोरे लोक गेल्यानंतर एक मैल पण जादा पटरी नाही वाढवली सरकारने. इकडे हिंदुस्तान कुठे पोचला.
एक दफा तरी हिंदुस्तानात जायला पहिजे तिथे असं वाटायचं.

पण मदरश्यातला मौलवी काही काही सांगायचा, त्याच्याकडे कोण कोण लोक यायचे, मग त्यांच्या लंब्या मसलती चालायच्या. ते गेले की मौलवी मदरश्यातील माझ्या सारख्या पोरांना गोळा करायचा. आणि कसले कसले कागद वाटायचा. ते वाचायला लावायचा. मग खुद भाषण दयायचा. ती भाषण एकून हळू हळू कश्मीरमध्ये हिंदुस्तानी आर्मी काय करते ते समजायला लागलं आमच्या जातभाईंवर तिथे आर्मी काय काय बदसुलूक करते ते मौलवी समजून सांगायला लागला. शाहरुख आमीरच्या मुंबईपासून कश्मीर किती दूर ते माहित नव्हतं पण नंतर मौलवीने एकदा तर मदरश्यातल्या टीव्हीवर एक टेप लावली. त्याच्यात तर कश्मीरमधे काय काय चालू आहे ते दाखवले. एकदम रक्त तापून निघाले. मग मौलवीकडे हमेशा येणरयापैकी दोघे आले. त्यांनी अजून भाषण दिले.

अजून काही कमवत नव्हतो. मदरश्यात दोन वक्तची रोटी तर मिळत होती. बस्स पिंडीत आर्मी अफसर खूप. ते कार घेउन फिरायला बाहेर पडत. त्यांची पोरं टाय लावून इंग्लीश शाळेत जायची. सुबह शाम आर्मी अफसरांच्या बायका आणी पोरी, बघत भटकायचं. शाहरुख, आमीरचे पिक्चर बघायचे. दुपारी आणि रात्री खान्या अगोदर मौलवीचे भाषण एकायचं अशी मस्त जिंदगी होती. मग नंतर मौलवीच्या त्या दोस्तांच्या खेपा वाढू लागल्या. कश्मीरच्या जोडीला आता तर हैद्राबाद- जयपूरच्या टेप येउ लागल्या. मौलवीचे दोस्त पण रोज भाषण देउ लागले.हिंदुस्तानी एवढी तरक्की केली म्हणतात मग इतके बदसुलूक का करतात?

पाच सहा महिने असेच गेले. एकदम मौलवी आला. मला म्हणाला तुला खुदाचा वास्ता, तुला खुदाने त्याची सेवा करायचा मोका दिलाय. भरोसा ठेव. मी सांगतो तिथे जा म्हणाला. तुझे घर गिरवी ठेवलंय ना ते सोडवून देतो. अब्बुकडे कुठे एवढे पैसे. घर सुटतंय म्हणून मी हो म्हणालो.

अब पछतावेसे क्या फायदा- भाग दुसरा

मौलवीचा दोस्त दुसरया दिवशी आला. त्याच्याबरोबर गेलो. रात्र भर आर्मीच्या ट्रकात बसलो होतो. पिंडीवरुन निघून मरकज़-तय्यबा ह्या गा्वात आलो. रात्रभर आर्मीच्या खुल्या ट्रकमध्ये बसून थंडीने नको जान झाली. माझ्याबरोबर अजून अशीच १२- १५ पोरं होती. सगळी अशीच गरीब. कुणाच्या बहनच्या शादीला पैसे नव्हते तर कुणाची अम्मी बीमार. पचास – साठ हजार घरवाल्यांना मिळतील म्हणून सगळे चालले होते. आणि दोन वक्ताची रोटीची तजवीज.

मौलवीचा इथे काय संबंध ते माहित नाही पडल शेवटपर्यन्त. पण मौलवीकडे येणारे त्याचे दोस्त मात्र इथे ही भाषण दयायला यायचे. काय जबान होती त्या दोघांची. तीन घंटे लगातार बोलले तरी त्यांनी अजून बोलायला पाहिजे असं वाटायचं .रोज वेगळी टेप दाखवायचे. हिंदुस्तान आपल्या जातभाईंवर नाइन्साफ करतो हे आता समोर यायला लागलं होतं. इतके दिवस पिकचरमध्ये बघितलेल्या हिंदुस्तानची ही बाजू समोर यायला लागली.

रोज कसरत मात्र करायला लागायची. झाडावर चढून रस्सीने दुसरया झाडावर जायचं. पहाडीवर धावायचं. मरकज़-तय्यबाच्या त्या थंडीत पोहायला पण लावायचे. हाथ- पायावर सरपटायला लागायचं. पच्चीस किलो वजन घेउन चालायला लावायचे. एखादा चक्कर येउन पडला तर त्याला फटके मारुन पुन्हा चालायला लावायचे. कसरत खूप करुन घेतली.एकदम आर्मीतले लोक करतात तशी. पण भूक लागली की खायला भरपूर मिळायचं. रोज मस्त गोश्त खायला दयायचे. दूध, बादाम, सेब खूप खायला देत. एवढं अब्बूने कधी दिलं नसतं.

फायरिंगमध्ये माझा निशाना बघून बॉस तर खूष झाला. हो त्याला बॉस म्हणायचं. त्याचं नाव नाही विचारायाचं तो आर्मीत होता म्हणे. माझा निशाना बघून तो म्हणायचा, काश ! करगील ला पाठवले त्यांचा असा निशाना असता तर?

आता त्या हिंदुस्तान्यांना सबक देण्याची वेळ आली होती. कश्मीरमधून हिंदुस्तानात पाठवणार होते. हिंदुस्तानात गेलो की एक दफा तरी मुंबई बघायची असं ठरवलं होतं.

पण काय झालं काय माहित , अचानक मला मरकज़-तय्यबा मधून माझी रवानगी दौरा-आम इथे झाली. तिथे सहा महिने समुंदरवर ट्रेनिंग झालं आता मला त्याची आदत पडली होती. त्यामुळे ट्रेनिंग पूरी करायला काही तकलीफ नाही झाली. फायरिंग तर माझी सगळ्यात चांगली होतीच. तेव्हा आपली बोट आपल्याला पाहिजे तिथे कशी न्यायची ते पण शिकवलं. एकदम नवीन फोन वापरायला शिकवला. त्यात तर आपण कुठे आहोत ते पण दिसायचं. आसपासचा नक्शा पाण दिसायचा. स्साल्या पिंडी कॅन्टानमेन्टमध्ल्या, आर्मी अफसरांच्या त्या घरवाल्या मोबाइलवर खिदळताना आठवायच्या. त्यांच्या मोबाइलपेक्षा हा फोन तर अजून बढकर होता.

अजून कारवाइचा हुकुम येत नव्ह्ता. कधी एकदा हिंदुस्तानात जातोय असं झालं. माझ्यासारखे अजून बरेच होते ट्रेनिंगला. पण ह्या समुंदरवर ट्रेनिंग कशाला असा एकदा प्रश्न विचारला बॉसला. हो त्याचं पण नाव नाही माहित. नेव्हीत होता तो. त्याला काय वाटलं काय माहित. त्याने सरळ मला उचलून समुंदरमध्येच फेकून दिलं आणि लॉंच घेउन गेला. तेव्हा एक डेढ घंटा पोहत राहिलो. तो परत आला. उचलून आत घेतलं आणि बेहोश होइपर्यन्त मारला मला तिघांनी मिळून.

किनारयावर आल्यावर समोर माझा छोटा भाइ रसूल दिसला. त्यांनी त्याला पकडून आणला होता. मग दोन दिवसांनी माझा इम्तेहान घेतला. माझ्याकडे रिव्हॉल्वर दिले. समोर माझा रसूल . हुकुम आला “फायर” माझे हाथ कापले. परत हुकुम आला “फायर” तरीपण हाथ कापले. मग मानेवर रिव्हॉल्वरच्या नळीचा थंडगार स्पर्श जाणवला.परत हुकुम आला “फायर”. माझे हाथ आपोआपच चालले. ट्रीगर दाबला गेला. मी डोळे मिटून घेतले. बेहोश होउन खाली पडलो. किती वेळाने शुद्धीवर आलो ते माहित नाही, पण डोळे उघडले तर समोर रसूल होता. त्याला काहीच समजले नव्हते. बॉस आला. थंडपणे म्हणाला. "तू सिलेक्ट हो गया मिशन के लिये, रिव्हॉल्वर खाली था."
मिशन पूरी होइपर्यन्त रसूल आता आमचा मेहमान बनून राहणार असे सांगून निघून गेला.

मला आता चीड आली होती. स्साला जाउन त्या हिंदुस्तान्यांवर गोळ्याच चालवतो. ग्रेनेड फेकून किती जणांना मारुन टाकतो असं होउन गेलं.अजून महिनाभर ट्रेनिंग झालं. आणी मिशन वर जायचा हुकुम आला.

त्यादिवशी आम्हाला एकदम हेवी अम्युनिशन दिले गेले. एकदम नवीन रायफल मिळाल्या. बॉसचा बॉस आला होता. बॉस त्याला सर म्हणत होता. सर म्हणाला माझी मिशन कधीच फेल नाही गेली. माझ्या मिशनमधली पोरं परत आली आहेत. तुम्ही दहाजण परत आणण्याची जिम्मेद्दारी आपली असं म्हणाला. चाहे तो हवाइजहाज अग्वा करेंगे पर तुम सबको वापस लायंगे. एकदम थंड, शांत बोलत होता. पण अजून मिशन काय ते माहित नव्हतं.

सर ने पडदयावर हिंदुस्तानचा नक्शा दाखवला. मग तो मुंबईत आला. मी मनात म्हणालो, वाह क्या बात है, आपलं स्वप्न पूरं होणार तर. पहिलंच मिशन आणि मुंबईत. आमच्यापैकी काही आधीच मुंबईत त्या हॉटेलात जाउन राहून आले होते. त्यांनी आम्हाला नकशे समजाउन सांगितले. दोन रात्री समजून घेण्यात गगुजरल्या.

तिसरया दिवशी पहाटे स्पीडबोटीतून दौरा-आम सोडलं. पोरबंदरला एक मच्छीची लॉंच पळवली. त्याच्यावर चारजण खलाशी होते . त्यांना आम्ही खलास केलं. तिथून मुंबइत उतरलो.
माझ्याकडे सीएसटी आणी कामा हॉस्पिटलचे मिशन सौपले होते. कामा हॉस्पिटल मध्येच त्या तिघांना मारले आम्ही. मरकझ- तय्यबाला फोन लाउन खुष- खबरी दिली. बाहेर पडून पळून जात होतो तर मुंबईची पुलिस पाठी पडली. त्यांनी जीपच घातली आमच्या कारवर. आमच्याहातात गन्स दिसतात तरी ते जांबाज पुलिस आमच्यावर कूदले. सायनाइड यला टाइमच नाही मिळाला. आणी कैद झालो.

आता माझ्या साथीदारांना, इथले मुस्लीमभाई कब्रस्तानात दफन करु नाही देणार. मी जेव्हा माझ्या छोट्या रसूलवर गोळी चालवली ना, तेव्हाच मेलो. पण आर्मीच्या खौफमुळे काम करत राहिलो. आता तर रसूल त्यांच्या ताब्यात आहे. काय करतील त्याचं . त्याचा दुसराकासीम करतील की त्याला मौत देतील? अम्मी-अब्बुला ते एक लाख देणार होते . आता देतील का? एक लाख जाउ दे, तकलीफ तरी नक्कीच देतील. आर्मीवाले नाही सोडणार माझ्या बडेभय्याला, सलमाआपाला.

पण आता पछतावा होउन काय फायदा. त्या वेळीच विचार करायला हवा होता. पण हे पोट? त्याचं काय केलं असतं?

छोट्या रसूलवर गोळी चालवली ना, तेव्हाच मेलो मी. आता जिंदा राहून काय करु? म्हणून सांगतो मला मारुन टाका..

पूर्णत: काल्पनिक. तसेच खालील बातम्यांवर आधारित.
१.TOI Making of a Jehadi page 13 http://epaper.timesofindia.com/Daily/skins/TOI/navigator.asp?Daily=TOIM&login=default
३.
४.
५.

December 2, 2008

मुंबईवरील हल्ले, चॅनेलवाले आणि काही जाहिराती

ह्या सगळ्या हल्ल्यांमध्ये मला दोन घटना खटकल्या.

पहिली म्हणजे चॅनेलवाल्यांचा अति- उत्साह..

चॅनेलवाले पण अति उत्साही, कमांडो हेलिकॉप्टर्मधून खाली कसे उतरले? ताज मध्ये शिरताना करकरेंनी अंगावर काय काय घातलंय? ताजमध्ये अडकलेल्या पत्रकार कोणत्या रुम मध्ये आहेत? अजून किमान १०० लोक आत अडकले आहेत. घ्या अतिरेक्यांनो तुम्हाला १०० बकरे आहेत अजून कत्तल करायला. मिडिया अशी माहिती विनासायास अतिरेक्यांच्या कमांडसेंटरला पोचवत होता.

सगळ्यवर कडी केली ती चरखा बाई मठ्ठ ह्यांनी, सुटका झालेल्या परदेशी महिलेला चरखा बाइ विचारत्या झाल्या “ इतके होवूनही तुम्ही भारतात परत याल का?” ह्या प्रश्नातून काय सूचित करायचं होतं चरखाला कोण जाणे? त्या महिलेनेच सांगितलं की असं कुठेही होवू शकतं त्यामुळे परत न येण्याचा विचार कशाला करु. तेव्हा चरखा मुस्काडात बसल्यागत गप्प.

श्रीयुत लाजबीज छोडदेसाइ तर दमच घेत नव्हते. आमच्याच चॅनेलने किती बातम्या ब्रेक केल्या ह्याची आकडेवारी देताना त्यांची धावपळ उडत होती.

मिडीयाला किती आणि काय दाखवायची परवानगी दयावी ह्याचे काही नियम आहेत की नाही? अश्याप्रसंगी काय करायचे ह्याची काही आखणी आहे की नाही. नसेल तर आता तरी ती सरकार करणार की नाही? ह्या मिडियावाल्यांनाही काही पाचपोच आहे की नाही? भारतीय प्रसारमाध्यमांना आता एवढी वैचारिक समज कधी येइल?

आणि आता दुसरी अजूनच व्यथित करणारी घटना जाहिरातींबद्द्लची..
ह्या गंभीर घटनेचं भांडवल करायला राजकारणीच नव्हेत तर अनेक भारतीय कंपन्या देखील पुढे सरसावल्यात. सध्या सुरु असलेली एअरटेल ची जाहिरात पाहिलीत? आर्यभट्ट,चाणक्य, सुश्रुत, जगदीशचंद्र बोस, विनोद धाम ते अगदी गांधीजी( An Indian who won war without fight) अश्या इतिहासात आणि वर्तमानात उल्लेखनीय कामगिरी बजावलेल्या महान भारतीयांचे, An Indian who invented the chip, An ancient Indian economist ,असे त्यांच्या Indian असण्याचे दाखले देउन झाले की ही जाहिरात Indian मधील I आणी Bharati मधील I ह्यात साम्य दाखवते. किंबहुना ह्या दोन्ही शब्दांमधला I एकसारखाच चित्रीत केला आहे. ह्या दोन्ही शब्दांची कॅलीग्राफी(अक्षरलेखनाची पद्धत) आणी रंगसंगती ही एकसारखीच. परिणाम साधण्यासाठी संपूर्ण जाहिरात कॄष्ण-धवल रंगात. देशभक्तीपर संगीत पार्श्वभूमीवर सुरुच असते. आणी मग Proud To Be Indian अशी पंचलाइन एकू येते. अशीच एक दुसरी जाहिरात म्हणजे ज्या समूहाच्या हॉटेलावर हल्ला झाला त्या टाटा समूहाच्या टाटा इंडिकॉम ह्या दूरध्वनी सेवेची. त्यांनी ही असेच देशभक्तीपर संगीताच्या पार्श्वभूमीवर आपल्या “इंडि”कॉम ची जाहिरात केलेली आहे. ही अगदीच कमी कालावधीची जाहिरात फक्त पंचलाइन सांगून जाते. राजकारण्यांनतर हे व्यावसायिक सुद्धा आता मॄतांच्या टाळूवरचे लोणी खायला निघाले आहेत.

दहशतवादी हल्ल्यांनंतर जो एक युफोरिया निर्माण झाला आहे त्याचे भांडवल करु पाहणारी ही किळसवाणी आणि विकॄत मनोवॄत्ती.

पण ह्या युफोरियाचे विधायक शक्तीत रुपांतर करण्याची आज गरज आहे. त्यातूनच भारताला ह्या समस्येवरचा उपाय सापडेल.

मंबइवरील हल्ले आणि काही प्रश्न

मुंबईवर लादल्या गेलेल्या युद्धात जे शूर पोलिस , जवान आणि कमांडो अधिकारी हुतात्मा झाले त्यांना माझी श्रद्धांजली.

गेले काही दिवस माझी घुसमट सुरु आहे. अनेक उलट- सुलट लेख, प्रतिक्रिया, ब्रेकिंग न्यूज मध्ये माझा कोंडमारा होतोय. पण मी अंतर्मुख होवून विचार केला आणि एक निर्णय घेतला आहे.

असे हल्ले भारतातच काय जगात कुठेही होउ शकतात. कुणी सांगावे? मलाही एखादवेळीस ओलिस ठेवले जाउ शकते. त्यामुळे जर असा प्रसंग माझ्यावर ओढवला तर माझ्या सुटकेसाठी कोणत्याही अतिरेक्याला सोडू नये. अशी इच्छा मी माझ्या कुटुंबीयांकडे व्यक्त केली आहे. असा प्रसंग माझ्यावर आलाच तर त्यांनी तसे सरकारला कळवावे. आपल्याला पटत असेल तर बघा. आपणही असा निर्णय घ्या असे माझा आग्रह नाही. मी जे ठरवले ते माझे वैयक्तिक मत आहे. पण देशासाठी प्राण देणारया बहाद्दर सैनिकांसाठी आपण एवढे नक्की करु शकतो. बघा मनाशी फक्त कल्पना करा अश्या प्रसंगाची. आणि त्यानंतर तुलना करा त्या बहाद्दरांच्या कुटुंबियांवर ओढवलेल्या प्रसंगाची. तेव्हा तुम्हाला ह्या प्रसंगाचे गांभीर्य समजेल.

अशी वेळ आपल्या देशावर का यावी? १९९२ मध्ये अतिरेक्यांनी सागरी मार्गाचा वापर करुन स्फोटके उतरवली. आज १६ वर्षानंतरही तोच मार्ग त्यांनी अनुसरला. आपली सुरक्षा व्यवस्था इतकी पोकळ आहे? महासत्ता होण्याच्या गप्पा करतो ना आपण?

अतिरेक्यांना “ दीज पर्सन्स” म्हणणारे, दिवसाला तीनदा कपडे बदलणारे, मंद दबक्या आवाजात बोलणारे केंद्रीय गॄहमंत्री, सिनेस्टार पुत्राला ताजची सैर घडवणारे मुख्यमंत्री, “५००० लोकांना मारायचे होते पण २०० च मेले, छोट्याश्या घटना होतातच हो” असे म्हणणारे कणखर आबा राज्याचे गॄहमंत्री म्हणून लाभल्यावर असेच होणार. ह्यांची गच्छंती आधीच व्हायला हवी होती. पण त्यांचा घडा भरायला थोडा वेळच लागला म्हणायचा.

अमेरिकेवर ९/११ हल्ला झाल्यावर परत का नाही हो झाले हल्ले? मग आपल्यावरच का होतात परत परत? कारण अमेरिका एकत्र येउन उपाय करते . आपण नाही करत .आता वेळ आहे ते एकत्र येण्याची जशी अमेरिका एकत्र आली होती. भले आपण देशात असू १०० कौरव आणि ५ पांडव. बाहेरच्यांसाठी आपण आहोत १०५ हे दाखवून देण्याची.

मग एवढीही राजकिय समज आपले नेते दाखवू शकत नाहीत? देशासाठी आपल्यातले भेदभाव बाजूला ठेवण्याची तयारी नाही ह्यांची? काय गरज होती ताजसमोर येउन एक कोटी मदत जाहीर करण्याची. सगळ्यांपेक्षा महान , स्वयंभू मीच हे दाखवण्याची ही वेळ होती का? देशभक्तीचा मक्ता आपल्याकडेच असे वाटणारया ह्या पक्षाचे सरकार असताना त्यांनी तर अतिरेक्यांना अगदी घरपोच करायला मंत्री पाठवला होता. त्यांनी कशाला बाता कराव्या देशाच्या? करकरेंच्या स्वाभिमानी कुटुंबियांनी ह्यांची एक पै सुद्धा नाही घेतली.

दैवदुर्विलास म्हणजे ह्या घटनेच्या निषेधाचे भाषण पंतप्रधानांनी टेलीप्रॉम्टरवरुन वाचून दाखवले तो क्षण. अगदीच सपक आणि कणाहीन नेतॄत्व. एक कठोर शब्द नाही उच्चारला गेला त्या भाषणात. अशीच प्रतिक्रिया गॄहमंत्री अगदी क्षीण आवाजात, खांदे पाडून देते झाले तेव्हाच त्यांनी अतिरेक्यांचा “ दीज पर्सन्स” असा उल्लेख केला.

मग राजीनामा सत्रच जणू सुरु झाले. पण जनतेच्या डोळ्यात अशी धूळफेक करुन भागेल का? पुढे काय करणार? मुंबईसारख्या ठिकाणी दिल्लीहून कमांडो पोचायला १० तास लागतात. देशाचे गॄहमंत्री किती कमांडो पाठवले ते वाहिन्यांवरुन सांगतात, अरे साधी अक्कल कशी नाही? तुमच्या वाहिन्या अतिरेक्यांचे कमांड सेंटर पण बघतेच की. मग त्यांना तुमच्या सगळ्या हालचाली जाहीर रित्या सांगता?
“दे वील नॉट हार्म यू अनलेस यू लेट देम हार्म यू” असे एक वचन आहे. प्रत्येक वेळी हल्ला झाला की शेजारयांकडे का बोट दाखवायचं? त्या शेजारयांची आपल्याकडे डोळा वर करुन बघायची हिंमत होता कामा नये असे काहीतरी करुन दाखवायलाच लागेल. इतक्या लांब पसरलेल्या किनारपट्टीवर नजर कशी ठेवणार? पण मग इतर देशांनाही आहेच की किनारा, ते काय करतात? आपण जर चंद्राचे फोटो काढू शकतो तर भारताच्या किनारपट्टीच्या लांबीचं कसलं आलंय कौतुक? मानवविरहीत छोटी टेहळणी विमाने आहेत की.

अमेरिका- मेक्सिकोच्या सीमेवर घुसखोरी टाळण्यासाठी एक आभासी( व्हर्च्युअल) कुंपण आहे. त्याचा भंग करुन प्रवेश करायचा प्रयत्न केला की तातडीने तिथे फौज जमते. आपण आपल्या किनारयाचे रक्षण अश्या प्रकारे करु शकत नाही असे मला वाटत नाही. पहिल्याच प्रयत्नात चांद्रकक्षेत यान यशस्वीरित्या सोडणारया देशाला हे नक्कीच अवघड नाही.

प्रतिबंध हाच एकमेव उपाय आहे अतिरेका वर.
आपली सहिष्णुता हा जर आपला कच्चा दुवा बनला तर ते घातक आहे भारतासाठी.