October 22, 2008

माझा गाव आणि माझे लहानपण-भाग-४

साजराबाईच्या टेकडीवर पाणी योजनेची टाकी आहे. टेकडीच्या टॉपवर गेल्यावर, फणफण वारा अंगावर घ्यायला जाम मजा यायची. तिथून खाली बघितल्यावर वळणं घेत जाणारी आमची शुक नदी दिसायची. तिच्यावरचा रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हे जोडणारा पूल दिसायचा. ह्या नदीवरचा हा एकमात्र पूल. काळ्या दगडांच्या कमानींचे देखणे ब्रिटीशकालीन बांधकाम आहे. समोर पाहिल्यावर दूर वळणं घेत जाणारा हाय वे दिसायचा. तिकडे लांबवर एखादी गाडी दिसली की आम्ही आकडे मोजायला सुरुवात करायचो. गाडी किती आकडयात टेकडीच्या पायथ्याशी आली ते बघणे ह्यात पण मजा यायची.


गणपतीत एकमेकाच्या घरी जाऊन आरती करणे, उद्याच्या आरतीला प्रसाद काय पाहिजे ह्याची हक्काने फर्माईश करणे, कुणाची आरास कशी आहे त्यावर चर्चा करणे ह्यात गणपती कधी आले आणी कधी गेले तेच कळायचे नाहीत.दसर्याला घरोघर जाउन आपट्याची पाने वाटणे आणि संक्रांतीला तीळगूळ वाटणे हे ओघानेच आले.


दसर्याच्या दरम्यान रामेश्वराची समाराधना असायची. सगळ्यांनी एकत्र येऊन, एकत्र मेहनत , साफ सफाई करून, देवाची आराधना करून ,एकत्र स्वयंपाक करून, एकत्रच जेवायचे असा तो कार्यक्रम असायचा. समाराधनेचा साधा सोपा मेनू म्हणजे केळीच्या पानावर लाल भोपळ्याची, लाल मिरच्या घातलेली भाजी, भरीत आणि तांदुळाची खीर. जमल्यास भात खायचा!! आहाहा!! हाताला लागलेला भाजीचा वास कितीवेळ जायचा नाही.

कोजागिरीला तर सगळा गाव रात्री वरती हायवे वर जमा होतो. आटीव दूध आणि भेळीच्या साथीला, गाणी, गप्पा आणि भेंड्याना उत येतो.आसपासच्या सर्वांगी फुललेल्या सात्वीणीच्या सुगंधाने मन मोहून जाते!!

कॉलनीत दिवाळीला तर मजाच असायची.घरांच्या दोन-दोन ओळी आणि मधे रस्ता अशी छान रचना होती. तो रस्ता झाडून साफ करून, नंतर आम्ही दिवाळीला प्रत्येकाने आपल्या कंपाउंडवरती मेणबत्त्या लावल्या की एक नयनरम्य दॄश्य दिसायचे. त्यात परत पहाटे पहिला फटाका कोणी लावला ह्याची स्पर्धा असायची.

दिवाळीनंतर गावातल्या देवळांच्या जत्रा सुरु होत. त्यात कालभैरवाची आणी दत्तजयंतीला होणारी जत्रा तर डोळ्यासमोरुन हलत नाही. ताज्या कोकणी खाज्याचा, कांदाभज्यांचा, फुग्याच्या रबराचा, मालपुव्याचा आणि त्याचवेळी बहरणार्या काजूच्या मोहोराचा संमिश्र सुवास अजूनही डिसेंबरात येतो. तो कोलाहल, गॅसबत्त्याचा उजेड, शिटट्यांचे, पिपाण्यांचे आवाज अजूनही कानात घुमतात.


वेळ काढून मी बर्याच वेळेला जातो गावाला. सगळीकडे फिरतो. गाव विकसित होत चाललंय, इथे आता मोबाइल फोन आहेत, इंटरनेट आहे, चकचकीत रस्त्यांवर, आधुनिक गाड्या आहेत, गावाकडे चाकरमान्यांनी बांधलेली,"सेकंड होम्स" सुद्धा आहेत. त्यात माझं जुनं गाव कुठे? आहे, ते आहे तसंच आहे. आजच्या युगात तिथे बदलली नाही ती तिथली संस्कॄती. अजूनही सण - समारंभ तसेच साजरे होतात, जत्रेतही तीच मजा आहे. कोजागिरी जोरात साजरी होते,समाराधना सुद्धा केली जाते.


अर्बनायझेशनच्या रेटयात माझ्या गावाने, गावपण तसंच टिकवून ठेवलं आहे. विकासाची कास धरली असली तरी, मुळं आहेत त्याहून घट्ट आहेत.म्हणून विचार केला, निदान लिहून तर काढू शकतो सगळं. जगाच्या पाठीवर जिथे जाईन तिथे घेऊन जाईन माझे गाव, माझे लहानपण आणि माझी जडणघडण!!

2 comments:

  1. Dear Kapil
    this is very nice decription of Kharepatan, I think if you add some more about the school and ativities ( Ghand mandal ) it will be very nice.
    Thanks & bye
    Prasad Deosthali.

    ReplyDelete
  2. Dear Kapil,
    its to good. Tu mala gavachi safar ghadvalis agadi kahi kshanat. Add something about our school & teachers & also about schoolmates.

    thx n bye,

    jitendra shetye

    ReplyDelete