October 22, 2008

माझा गाव आणि माझे लहानपण- भाग-२

थोडं पुढे गेल्यावर भाजीची दुकानं. त्याच्या पलीकडे दिसणारे कौलाचे डेपो, सॉ-मिल ( म्हणजे लाकडे चिरुन त्याच्या फळ्या, वासे बनवणारी मिल), तिथे कामाला आलेल्या, लाकूड, कौले घेऊन जाण्यासाठी उभ्या असलेल्या बैलगाडया. ह्या सॉ-मिलवर मात्र मी जायचो. तिथे दोन रेल टाकून, त्यावर एक ट्रॉली असायची, ट्रॉलीवर कापायचे लाकूड/ ओंडका ठेवून, ती ट्रॉली बटण दाबल्यावर पुढे यायची. इकडे गोल फिरणारं पातं तयार असायचं. पण त्या पात्याचा स्पीड बदलून, ओंडक्याची स्थिती बदलून वेगवेगळ्या प्रकारचे आकार तयार होत. ते बघायला मजा वाटायची. ती करवत चालवणरा आणि ओंडक्याची स्थिती बदलणारा , दोघांनीही एक जाड चामडयाचे जॅकेट घातलेले असायचे, काही इजा होऊ नये म्हणून. आजुबाजूला उडणारा लाकडाच्या भुश्शात खेळताना मजा यायची.

बाजारपेठेत विष्णूमंदिराच्या आसपास सगळी, कावळे, ब्रम्हदंडे, उन्हाळकर ह्या जैन मंडळींची दुकानं. तिथे असणार्या तिरफळ आणि काजू बियांच्या दरवळातून पोस्टापर्यंत जातोय न जातोय तर आपली तंद्री भंग पावायची ती तालबद्ध ठोक्यांच्या आवाजाने. कुठून यायचा बरं हा आवाज?

जरासं पुढे , माझा मित्र समीरच्या वडिलांचं भांडयांचं दुकान होतं. स्टेनलेस स्टील, पितळ, तांब्याची विविध भांडी आकर्षकपणे मांडून ठेवलेली असत. आता भांडी- पातेली आकाराने मोठी , म्हणून ती मावतील असा लाकडी फळ्या व साखळ्यांचा बनवलेला, एक तागडी २ फूट बाय २ फूट असेल, असा तराजू लक्ष वेधून घ्यायचा. त्यांच्या दुकानात पाठीमागे एक कारागीर बसायचा. त्याच्यासमोर एक लोखंडी खुंटा असायचा, त्या खुंट्यावर एखादा पितळी,किंवा तांब्याचा हंडा उपडा ( म्हणजे त्याचे तोंड खाली) करून , त्या हंड्यावर ठोक्याची नक्षी काढायचे काम तो कारागीर अगदी तल्लीन होऊन करायचा. त्याच ठोक्यांचा तो नाद, एखाद्या तबलजीने तबला वाजवावा तसा आसमंतात भरून राही.दुसरं महत्वाचं आकर्षण म्हणजे खरेदी केलेल्या भांड्यावर मशीनने नांव घालतानाचा आवाज!! ण्टर्र्,ण्ट्र,ण्टर्र्,ण्ट्रण्टर्र्,ण्ट्र आणि शेवाटी थांबताना एक दीर्घ ण्टर्रर्रर्रर्र.

समीरच्या दुकानासमोर, डॉ. सोमणांचे घर. माझे वडिल त्यांच्याकडे रहयला होते, शिकताना. त्यामुळे बाजारात गेलो कि सोमणांकडे गेल्याशिवाय काही आम्ही परत जात नसू. ते होते मिलिट्रीत कर्नल, तिकडून रिटायर होऊन गावाला आलेले. त्यामुळे सोमणआज्जींकडे विविध पदार्थ असायचे. माईन मुळ्याचं लोणचं, दाल-बाटी आणि पॅशन्-फ्रूटचे सरबत (त्यांनी पॅशन्-फ्रूटचे एक झाड लावलं होतं) असे त्यवेळी अनवट असलेले पदार्थ सोमणआज्जींकडे चाखायला मिळायचे.अजून थोडं चालल्यावर, धाक्रसांचा वाडा लागायचा, त्याला भव्य दिंडी दरवाजा होता.

तिथून पुढे सुरु व्हायची ती, ढेकणे, पिसे आणि गाठे ह्यांची कापड दुकाने. "घ्या हो, अगदी ब्राम्हणी वाण आहे हो, तुम्हाला छान दिसेल"असं मिठ्ठास बोलत आपण आत गेल्यागेल्या विविध लाईट्स सुरु करणरे विनायकराव पिसे म्हणयचे कि "बघा , एकच वाण आहे हो, असा दुसरा नग नाही, जणू काही तुमच्या साठीच आणला आहे' एव्हढं गोड बोलल्यावर तुम्ही नाही म्हणूच कसे शकता?

तिथून वरती घाटी चढून गेल्यावर आपण पोचतो ते किल्ल्यावर. इथे शिवाजी राजांनी राजापूरच्या दोन डचांना पकडून कैदेत ठेवलं होतं. किल्ल्यावर शिवकालीन भवानी मंदिर आहे. तिथे दसर्याला, गाव पारध झाली की मारलेल्या रान डुक्कराच नेवैद्य दाखवला जातो. गाव पारध म्हणजे दसर्याच्या दरम्यान कापणीला आलेल्या भातशेतीची नासडी करणार्या रान डुक्करांना मारणे. दसर्याला किल्ल्यावर पतंग उडावण्याचा कार्यक्रम असे. किल्ल्यावर उभं राहून समोर साजराबाईची त्रिकोणी टेकडी दिसायची. आपला पतंग अगदी त्या टेकडीपर्यंत जावा असं वाटायचं. दसर्याला गुरवाने आपट्याची पाने खड्सून ( झाडावर चढून फांद्या खाली कापून टाकणे) टाकली की त्यातील सोने लुटायला ही झुंबड उडायची.

No comments:

Post a Comment