December 6, 2008

जातो आपुल्याच गावा

अष्टाक्षरी छंदातील ही रचना असून. माझे छंदगुरु श्री. धोंडोपंत ह्यांच्या छंदविवेचनानंतर ही स्फुरली आहे. आता उद्या घरी जाणार तेव्हा काय काय होइल ह्याच्या कल्पना लढबत असतानाच हे रचना झाली. ८,८,८,८ अशी रचना तसेच दुसरया आणि चौथ्या ओळीचे यमक हे ह्या छंदाचे वैशिष्ट्य.

पोचले रे माझे मन
घरीदारी भारतात
भेटतील सानथोर
हात घेउनी हातात

दिन एकच उरला
नुरले हे माह तीन
माझ्या आधी पोहोचली
माझी वेडी आठवण

धाव घेइल अनन्या
वेगे कुशीत शिरेल
घरी पाउल पडता
बार्बी द्यावया लागेल

हुंकारेल माझा दंफी
रांगे रांगे घेइ धाव
अष्ट शब्दी छंद आहे
अनुष्टुभ त्याचे नाव

बोजे ठेवूनी बाजूला
थोडा टाकीन मी श्वास
पाण्यासोबत ऎकेन
काकणांचे अनुप्रास

असेलच आई तिथे
आणि बाबा उत्सुकसे
काय होइल होइल
सर्व तुम्हां सांगू कसे!


(माझ्या मुलाचे नाव अनुष्टुभ. ते ठेवताना बराच काथ्याकूट झाला होता. त्याची आत्ता आठवण येत आहे. अनुष्टुभात सुद्धा ८ अक्षरे येतात पण लघु-गुरु अक्षरांचे नियम वेगळे आहेत.गीता, रामरक्षा, अनेक संत रचना तसेच भीमरुपी स्तोत्र हे अनुष्टुभ छंदाची उदाहरणे.)

असो चला आता परत भेटू , पण थोडया विश्रांतीनंतर!!

December 5, 2008

सोनियाच्या तालावर महाराष्ट्र वारयावर

चाल : चंदनाच्या पाटावर सोन्याच्या ताटावर

मोत्याचा घास तुला भरविते


सोनियाच्या तालावर महाराष्ट्र वारयावर

मुख्यमंत्री आता मी निवडिते. धॄ.

पदावर मुख्य नव्हता

पोलिसांना मंत्री नव्हता

मनी त्याचा सल नव्हता

पित्त्या बसवायचा होता

गुरहाळ चर्चेचे किती घालते ......



सोनियाच्या तालावर महाराष्ट्र वारयावर

मुख्यमंत्री आता मी निवडिते. धॄ.


जन्तेला फाट्या मारिले

नवे नायक नाही दिले

पायांना कितीक खेचले

पछाड धोबी टाकले

डाव कुटील किती मी खेळते........



सोनियाच्या तालावर महाराष्ट्र वारयावर

मुख्यमंत्री आता मी निवडिते. धॄ.


झाला मुंबैइवर हल्ला

इकडे नेत्यांचाच कल्ला

लावला निष्टेचा बिल्ला

कोण मुख्यमंत्री ते बोला

आमदारांची सगळ्या मते जाणते.......



सोनियाच्या तालावर महाराष्ट्र वारयावर

मुख्यमंत्री आता मी निवडिते. धॄ.


कसे केले बिनबोभाट

झाला नारायण सपाट

बाकी सगळेच हे माठ

आहे माझ्याशीच गाठ

पक्षावर सत्ता माझी चालते.......



सोनियाच्या तालावर महाराष्ट्र वारयावर

मुख्यमंत्री आता मी निवडिते.

December 3, 2008

अब पछतावेसे क्या फायदा भाग पहिला

मी कासीम. मुंबईवर हमला करुन मी एकटाच कैद झालो.बॉसने सायनाइडची गोळी दिली होती. पुलिसने पकडले तर खायला. पण इथली मुंबईची पुलिस एकदम चुस्त. ज्या अफसरवर गोळी चालवली त्याने शेवटचा सास भरण्याआधी दरोगाला तेच सांगितले. दरोगाने माझे हाथच पकडून ठेवले आणि ती गोळी काढून घेतली. म्हणूनच तर पकडला गेलो. पण आमच्या पुलिसपेक्षा इथली पुलिस एकदम जांबाज. आमच्या हाथात रायफल , तरीपण एकसाथ दोन हविलदार कूदले आमच्यावर. अमीन तर अल्ला ला प्यारा झाला. बदनसीबीने मी कैद झालो.

आता पुलिसला सांगतोय मला मरु दया. माझ्या घरवाल्यांना जिंदगी हराम करतील आता आर्मीवाले. सलमाआपाची शादी आताच झाली, तिच्या ससुरालवाल्यांना अम्मी- अब्बा आता काय सांगतील? बडे भय्या लाहोरला आहेत, मेहनत मजदूरी करतात. त्यांची पण शादी होउन चार साल झाले, दोन बच्चे आहेत. त्यांना पण आता आर्मीवाले नाही सोडणार. घरी अजून एक छोटी बह्न आणि भाइ आहे. ते काय करतील, आर्मीवाले अम्मी- अब्बुला घेउन गेले तर? मग मला मारुन टाका. म्हणजे मी काय सांगायला पण नको आणी माझ्या घरवाल्यांना काही तकलीफ पण नाही.

अब्बु फरिदपूरमध्ये कसाई होते. तेव्हा मी असेन चार सालचा. इदला बकरे हलाल करत होते अब्बु, ते बघून मी बेहोश झालो. मग अब्बुनी तो धंदा सोडला. चाटची गाडी लावली बझारमध्ये. मुलतानमध्ये किती होणार धंदा. त्यात पाच पोरांचा संसार. मग एक दिवस माझा बडा भाइजान निघून गेला. तेवढाच बोझ हल्का झाला. तो मेहनत- मजदुरी करायचा. इदला यायचा मिठाइ- कपडे घेउन.

असेच काही दिवस गेले. माझी बडी बहन सलमा आपाला रिश्ता आला. तिच्या शादीसाठी अब्बुनी घर गिरवी ठेवले. शादीनंतर दोन महिन्यातच मुलतानला दंगा झाला. सात दिन कर्फ्यू लागला. अब्बुचा काहीच धंदा नाही. अनाज संपले होते. तो शाबानचा महिना होता अजून रमजान यायला एक महिना होता, पण रमजानच्या आधीच आम्ही सात दिन रोजे केले. तेव्हा माझी उमर होती १७ सालची. काही समजत नव्हतं. उपासमारीने राग आला होता. मग अब्बुशी झगडा करुन घर सोडले. अब्बुला जोशात दिल चाहेल ते बोललो. पालना नही आता तो जना क्यू हमें असे काही बोललो अब्बु रडत होते. पण मी बाहेर पड्लो.
रागात पिंडीला पोचलो. एका मदरश्यात आसरा मिळाला. तिथे शाहरुख, आमीरचे पिक्चर बघायला मिळायचे. वाटायचं काय जन्नत आहे हिंदुस्तानात. तिथेले जातभाइ पण किती नसीबवाले, नाहीतरी काय मिळत होतं आम्हाला? दोन वेळची रोटी मिळाली तर लोक अल्लाची शुकर मानायचे. त्या पिक्चरमध्ये तर काय मस्त दिसायची हिंदुस्तानमधील जिंदगी. आमच्याकडे गोरे लोक गेल्यानंतर एक मैल पण जादा पटरी नाही वाढवली सरकारने. इकडे हिंदुस्तान कुठे पोचला.
एक दफा तरी हिंदुस्तानात जायला पहिजे तिथे असं वाटायचं.

पण मदरश्यातला मौलवी काही काही सांगायचा, त्याच्याकडे कोण कोण लोक यायचे, मग त्यांच्या लंब्या मसलती चालायच्या. ते गेले की मौलवी मदरश्यातील माझ्या सारख्या पोरांना गोळा करायचा. आणि कसले कसले कागद वाटायचा. ते वाचायला लावायचा. मग खुद भाषण दयायचा. ती भाषण एकून हळू हळू कश्मीरमध्ये हिंदुस्तानी आर्मी काय करते ते समजायला लागलं आमच्या जातभाईंवर तिथे आर्मी काय काय बदसुलूक करते ते मौलवी समजून सांगायला लागला. शाहरुख आमीरच्या मुंबईपासून कश्मीर किती दूर ते माहित नव्हतं पण नंतर मौलवीने एकदा तर मदरश्यातल्या टीव्हीवर एक टेप लावली. त्याच्यात तर कश्मीरमधे काय काय चालू आहे ते दाखवले. एकदम रक्त तापून निघाले. मग मौलवीकडे हमेशा येणरयापैकी दोघे आले. त्यांनी अजून भाषण दिले.

अजून काही कमवत नव्हतो. मदरश्यात दोन वक्तची रोटी तर मिळत होती. बस्स पिंडीत आर्मी अफसर खूप. ते कार घेउन फिरायला बाहेर पडत. त्यांची पोरं टाय लावून इंग्लीश शाळेत जायची. सुबह शाम आर्मी अफसरांच्या बायका आणी पोरी, बघत भटकायचं. शाहरुख, आमीरचे पिक्चर बघायचे. दुपारी आणि रात्री खान्या अगोदर मौलवीचे भाषण एकायचं अशी मस्त जिंदगी होती. मग नंतर मौलवीच्या त्या दोस्तांच्या खेपा वाढू लागल्या. कश्मीरच्या जोडीला आता तर हैद्राबाद- जयपूरच्या टेप येउ लागल्या. मौलवीचे दोस्त पण रोज भाषण देउ लागले.हिंदुस्तानी एवढी तरक्की केली म्हणतात मग इतके बदसुलूक का करतात?

पाच सहा महिने असेच गेले. एकदम मौलवी आला. मला म्हणाला तुला खुदाचा वास्ता, तुला खुदाने त्याची सेवा करायचा मोका दिलाय. भरोसा ठेव. मी सांगतो तिथे जा म्हणाला. तुझे घर गिरवी ठेवलंय ना ते सोडवून देतो. अब्बुकडे कुठे एवढे पैसे. घर सुटतंय म्हणून मी हो म्हणालो.

अब पछतावेसे क्या फायदा- भाग दुसरा

मौलवीचा दोस्त दुसरया दिवशी आला. त्याच्याबरोबर गेलो. रात्र भर आर्मीच्या ट्रकात बसलो होतो. पिंडीवरुन निघून मरकज़-तय्यबा ह्या गा्वात आलो. रात्रभर आर्मीच्या खुल्या ट्रकमध्ये बसून थंडीने नको जान झाली. माझ्याबरोबर अजून अशीच १२- १५ पोरं होती. सगळी अशीच गरीब. कुणाच्या बहनच्या शादीला पैसे नव्हते तर कुणाची अम्मी बीमार. पचास – साठ हजार घरवाल्यांना मिळतील म्हणून सगळे चालले होते. आणि दोन वक्ताची रोटीची तजवीज.

मौलवीचा इथे काय संबंध ते माहित नाही पडल शेवटपर्यन्त. पण मौलवीकडे येणारे त्याचे दोस्त मात्र इथे ही भाषण दयायला यायचे. काय जबान होती त्या दोघांची. तीन घंटे लगातार बोलले तरी त्यांनी अजून बोलायला पाहिजे असं वाटायचं .रोज वेगळी टेप दाखवायचे. हिंदुस्तान आपल्या जातभाईंवर नाइन्साफ करतो हे आता समोर यायला लागलं होतं. इतके दिवस पिकचरमध्ये बघितलेल्या हिंदुस्तानची ही बाजू समोर यायला लागली.

रोज कसरत मात्र करायला लागायची. झाडावर चढून रस्सीने दुसरया झाडावर जायचं. पहाडीवर धावायचं. मरकज़-तय्यबाच्या त्या थंडीत पोहायला पण लावायचे. हाथ- पायावर सरपटायला लागायचं. पच्चीस किलो वजन घेउन चालायला लावायचे. एखादा चक्कर येउन पडला तर त्याला फटके मारुन पुन्हा चालायला लावायचे. कसरत खूप करुन घेतली.एकदम आर्मीतले लोक करतात तशी. पण भूक लागली की खायला भरपूर मिळायचं. रोज मस्त गोश्त खायला दयायचे. दूध, बादाम, सेब खूप खायला देत. एवढं अब्बूने कधी दिलं नसतं.

फायरिंगमध्ये माझा निशाना बघून बॉस तर खूष झाला. हो त्याला बॉस म्हणायचं. त्याचं नाव नाही विचारायाचं तो आर्मीत होता म्हणे. माझा निशाना बघून तो म्हणायचा, काश ! करगील ला पाठवले त्यांचा असा निशाना असता तर?

आता त्या हिंदुस्तान्यांना सबक देण्याची वेळ आली होती. कश्मीरमधून हिंदुस्तानात पाठवणार होते. हिंदुस्तानात गेलो की एक दफा तरी मुंबई बघायची असं ठरवलं होतं.

पण काय झालं काय माहित , अचानक मला मरकज़-तय्यबा मधून माझी रवानगी दौरा-आम इथे झाली. तिथे सहा महिने समुंदरवर ट्रेनिंग झालं आता मला त्याची आदत पडली होती. त्यामुळे ट्रेनिंग पूरी करायला काही तकलीफ नाही झाली. फायरिंग तर माझी सगळ्यात चांगली होतीच. तेव्हा आपली बोट आपल्याला पाहिजे तिथे कशी न्यायची ते पण शिकवलं. एकदम नवीन फोन वापरायला शिकवला. त्यात तर आपण कुठे आहोत ते पण दिसायचं. आसपासचा नक्शा पाण दिसायचा. स्साल्या पिंडी कॅन्टानमेन्टमध्ल्या, आर्मी अफसरांच्या त्या घरवाल्या मोबाइलवर खिदळताना आठवायच्या. त्यांच्या मोबाइलपेक्षा हा फोन तर अजून बढकर होता.

अजून कारवाइचा हुकुम येत नव्ह्ता. कधी एकदा हिंदुस्तानात जातोय असं झालं. माझ्यासारखे अजून बरेच होते ट्रेनिंगला. पण ह्या समुंदरवर ट्रेनिंग कशाला असा एकदा प्रश्न विचारला बॉसला. हो त्याचं पण नाव नाही माहित. नेव्हीत होता तो. त्याला काय वाटलं काय माहित. त्याने सरळ मला उचलून समुंदरमध्येच फेकून दिलं आणि लॉंच घेउन गेला. तेव्हा एक डेढ घंटा पोहत राहिलो. तो परत आला. उचलून आत घेतलं आणि बेहोश होइपर्यन्त मारला मला तिघांनी मिळून.

किनारयावर आल्यावर समोर माझा छोटा भाइ रसूल दिसला. त्यांनी त्याला पकडून आणला होता. मग दोन दिवसांनी माझा इम्तेहान घेतला. माझ्याकडे रिव्हॉल्वर दिले. समोर माझा रसूल . हुकुम आला “फायर” माझे हाथ कापले. परत हुकुम आला “फायर” तरीपण हाथ कापले. मग मानेवर रिव्हॉल्वरच्या नळीचा थंडगार स्पर्श जाणवला.परत हुकुम आला “फायर”. माझे हाथ आपोआपच चालले. ट्रीगर दाबला गेला. मी डोळे मिटून घेतले. बेहोश होउन खाली पडलो. किती वेळाने शुद्धीवर आलो ते माहित नाही, पण डोळे उघडले तर समोर रसूल होता. त्याला काहीच समजले नव्हते. बॉस आला. थंडपणे म्हणाला. "तू सिलेक्ट हो गया मिशन के लिये, रिव्हॉल्वर खाली था."
मिशन पूरी होइपर्यन्त रसूल आता आमचा मेहमान बनून राहणार असे सांगून निघून गेला.

मला आता चीड आली होती. स्साला जाउन त्या हिंदुस्तान्यांवर गोळ्याच चालवतो. ग्रेनेड फेकून किती जणांना मारुन टाकतो असं होउन गेलं.अजून महिनाभर ट्रेनिंग झालं. आणी मिशन वर जायचा हुकुम आला.

त्यादिवशी आम्हाला एकदम हेवी अम्युनिशन दिले गेले. एकदम नवीन रायफल मिळाल्या. बॉसचा बॉस आला होता. बॉस त्याला सर म्हणत होता. सर म्हणाला माझी मिशन कधीच फेल नाही गेली. माझ्या मिशनमधली पोरं परत आली आहेत. तुम्ही दहाजण परत आणण्याची जिम्मेद्दारी आपली असं म्हणाला. चाहे तो हवाइजहाज अग्वा करेंगे पर तुम सबको वापस लायंगे. एकदम थंड, शांत बोलत होता. पण अजून मिशन काय ते माहित नव्हतं.

सर ने पडदयावर हिंदुस्तानचा नक्शा दाखवला. मग तो मुंबईत आला. मी मनात म्हणालो, वाह क्या बात है, आपलं स्वप्न पूरं होणार तर. पहिलंच मिशन आणि मुंबईत. आमच्यापैकी काही आधीच मुंबईत त्या हॉटेलात जाउन राहून आले होते. त्यांनी आम्हाला नकशे समजाउन सांगितले. दोन रात्री समजून घेण्यात गगुजरल्या.

तिसरया दिवशी पहाटे स्पीडबोटीतून दौरा-आम सोडलं. पोरबंदरला एक मच्छीची लॉंच पळवली. त्याच्यावर चारजण खलाशी होते . त्यांना आम्ही खलास केलं. तिथून मुंबइत उतरलो.
माझ्याकडे सीएसटी आणी कामा हॉस्पिटलचे मिशन सौपले होते. कामा हॉस्पिटल मध्येच त्या तिघांना मारले आम्ही. मरकझ- तय्यबाला फोन लाउन खुष- खबरी दिली. बाहेर पडून पळून जात होतो तर मुंबईची पुलिस पाठी पडली. त्यांनी जीपच घातली आमच्या कारवर. आमच्याहातात गन्स दिसतात तरी ते जांबाज पुलिस आमच्यावर कूदले. सायनाइड यला टाइमच नाही मिळाला. आणी कैद झालो.

आता माझ्या साथीदारांना, इथले मुस्लीमभाई कब्रस्तानात दफन करु नाही देणार. मी जेव्हा माझ्या छोट्या रसूलवर गोळी चालवली ना, तेव्हाच मेलो. पण आर्मीच्या खौफमुळे काम करत राहिलो. आता तर रसूल त्यांच्या ताब्यात आहे. काय करतील त्याचं . त्याचा दुसराकासीम करतील की त्याला मौत देतील? अम्मी-अब्बुला ते एक लाख देणार होते . आता देतील का? एक लाख जाउ दे, तकलीफ तरी नक्कीच देतील. आर्मीवाले नाही सोडणार माझ्या बडेभय्याला, सलमाआपाला.

पण आता पछतावा होउन काय फायदा. त्या वेळीच विचार करायला हवा होता. पण हे पोट? त्याचं काय केलं असतं?

छोट्या रसूलवर गोळी चालवली ना, तेव्हाच मेलो मी. आता जिंदा राहून काय करु? म्हणून सांगतो मला मारुन टाका..

पूर्णत: काल्पनिक. तसेच खालील बातम्यांवर आधारित.
१.TOI Making of a Jehadi page 13 http://epaper.timesofindia.com/Daily/skins/TOI/navigator.asp?Daily=TOIM&login=default
३.
४.
५.

December 2, 2008

मुंबईवरील हल्ले, चॅनेलवाले आणि काही जाहिराती

ह्या सगळ्या हल्ल्यांमध्ये मला दोन घटना खटकल्या.

पहिली म्हणजे चॅनेलवाल्यांचा अति- उत्साह..

चॅनेलवाले पण अति उत्साही, कमांडो हेलिकॉप्टर्मधून खाली कसे उतरले? ताज मध्ये शिरताना करकरेंनी अंगावर काय काय घातलंय? ताजमध्ये अडकलेल्या पत्रकार कोणत्या रुम मध्ये आहेत? अजून किमान १०० लोक आत अडकले आहेत. घ्या अतिरेक्यांनो तुम्हाला १०० बकरे आहेत अजून कत्तल करायला. मिडिया अशी माहिती विनासायास अतिरेक्यांच्या कमांडसेंटरला पोचवत होता.

सगळ्यवर कडी केली ती चरखा बाई मठ्ठ ह्यांनी, सुटका झालेल्या परदेशी महिलेला चरखा बाइ विचारत्या झाल्या “ इतके होवूनही तुम्ही भारतात परत याल का?” ह्या प्रश्नातून काय सूचित करायचं होतं चरखाला कोण जाणे? त्या महिलेनेच सांगितलं की असं कुठेही होवू शकतं त्यामुळे परत न येण्याचा विचार कशाला करु. तेव्हा चरखा मुस्काडात बसल्यागत गप्प.

श्रीयुत लाजबीज छोडदेसाइ तर दमच घेत नव्हते. आमच्याच चॅनेलने किती बातम्या ब्रेक केल्या ह्याची आकडेवारी देताना त्यांची धावपळ उडत होती.

मिडीयाला किती आणि काय दाखवायची परवानगी दयावी ह्याचे काही नियम आहेत की नाही? अश्याप्रसंगी काय करायचे ह्याची काही आखणी आहे की नाही. नसेल तर आता तरी ती सरकार करणार की नाही? ह्या मिडियावाल्यांनाही काही पाचपोच आहे की नाही? भारतीय प्रसारमाध्यमांना आता एवढी वैचारिक समज कधी येइल?

आणि आता दुसरी अजूनच व्यथित करणारी घटना जाहिरातींबद्द्लची..
ह्या गंभीर घटनेचं भांडवल करायला राजकारणीच नव्हेत तर अनेक भारतीय कंपन्या देखील पुढे सरसावल्यात. सध्या सुरु असलेली एअरटेल ची जाहिरात पाहिलीत? आर्यभट्ट,चाणक्य, सुश्रुत, जगदीशचंद्र बोस, विनोद धाम ते अगदी गांधीजी( An Indian who won war without fight) अश्या इतिहासात आणि वर्तमानात उल्लेखनीय कामगिरी बजावलेल्या महान भारतीयांचे, An Indian who invented the chip, An ancient Indian economist ,असे त्यांच्या Indian असण्याचे दाखले देउन झाले की ही जाहिरात Indian मधील I आणी Bharati मधील I ह्यात साम्य दाखवते. किंबहुना ह्या दोन्ही शब्दांमधला I एकसारखाच चित्रीत केला आहे. ह्या दोन्ही शब्दांची कॅलीग्राफी(अक्षरलेखनाची पद्धत) आणी रंगसंगती ही एकसारखीच. परिणाम साधण्यासाठी संपूर्ण जाहिरात कॄष्ण-धवल रंगात. देशभक्तीपर संगीत पार्श्वभूमीवर सुरुच असते. आणी मग Proud To Be Indian अशी पंचलाइन एकू येते. अशीच एक दुसरी जाहिरात म्हणजे ज्या समूहाच्या हॉटेलावर हल्ला झाला त्या टाटा समूहाच्या टाटा इंडिकॉम ह्या दूरध्वनी सेवेची. त्यांनी ही असेच देशभक्तीपर संगीताच्या पार्श्वभूमीवर आपल्या “इंडि”कॉम ची जाहिरात केलेली आहे. ही अगदीच कमी कालावधीची जाहिरात फक्त पंचलाइन सांगून जाते. राजकारण्यांनतर हे व्यावसायिक सुद्धा आता मॄतांच्या टाळूवरचे लोणी खायला निघाले आहेत.

दहशतवादी हल्ल्यांनंतर जो एक युफोरिया निर्माण झाला आहे त्याचे भांडवल करु पाहणारी ही किळसवाणी आणि विकॄत मनोवॄत्ती.

पण ह्या युफोरियाचे विधायक शक्तीत रुपांतर करण्याची आज गरज आहे. त्यातूनच भारताला ह्या समस्येवरचा उपाय सापडेल.

मंबइवरील हल्ले आणि काही प्रश्न

मुंबईवर लादल्या गेलेल्या युद्धात जे शूर पोलिस , जवान आणि कमांडो अधिकारी हुतात्मा झाले त्यांना माझी श्रद्धांजली.

गेले काही दिवस माझी घुसमट सुरु आहे. अनेक उलट- सुलट लेख, प्रतिक्रिया, ब्रेकिंग न्यूज मध्ये माझा कोंडमारा होतोय. पण मी अंतर्मुख होवून विचार केला आणि एक निर्णय घेतला आहे.

असे हल्ले भारतातच काय जगात कुठेही होउ शकतात. कुणी सांगावे? मलाही एखादवेळीस ओलिस ठेवले जाउ शकते. त्यामुळे जर असा प्रसंग माझ्यावर ओढवला तर माझ्या सुटकेसाठी कोणत्याही अतिरेक्याला सोडू नये. अशी इच्छा मी माझ्या कुटुंबीयांकडे व्यक्त केली आहे. असा प्रसंग माझ्यावर आलाच तर त्यांनी तसे सरकारला कळवावे. आपल्याला पटत असेल तर बघा. आपणही असा निर्णय घ्या असे माझा आग्रह नाही. मी जे ठरवले ते माझे वैयक्तिक मत आहे. पण देशासाठी प्राण देणारया बहाद्दर सैनिकांसाठी आपण एवढे नक्की करु शकतो. बघा मनाशी फक्त कल्पना करा अश्या प्रसंगाची. आणि त्यानंतर तुलना करा त्या बहाद्दरांच्या कुटुंबियांवर ओढवलेल्या प्रसंगाची. तेव्हा तुम्हाला ह्या प्रसंगाचे गांभीर्य समजेल.

अशी वेळ आपल्या देशावर का यावी? १९९२ मध्ये अतिरेक्यांनी सागरी मार्गाचा वापर करुन स्फोटके उतरवली. आज १६ वर्षानंतरही तोच मार्ग त्यांनी अनुसरला. आपली सुरक्षा व्यवस्था इतकी पोकळ आहे? महासत्ता होण्याच्या गप्पा करतो ना आपण?

अतिरेक्यांना “ दीज पर्सन्स” म्हणणारे, दिवसाला तीनदा कपडे बदलणारे, मंद दबक्या आवाजात बोलणारे केंद्रीय गॄहमंत्री, सिनेस्टार पुत्राला ताजची सैर घडवणारे मुख्यमंत्री, “५००० लोकांना मारायचे होते पण २०० च मेले, छोट्याश्या घटना होतातच हो” असे म्हणणारे कणखर आबा राज्याचे गॄहमंत्री म्हणून लाभल्यावर असेच होणार. ह्यांची गच्छंती आधीच व्हायला हवी होती. पण त्यांचा घडा भरायला थोडा वेळच लागला म्हणायचा.

अमेरिकेवर ९/११ हल्ला झाल्यावर परत का नाही हो झाले हल्ले? मग आपल्यावरच का होतात परत परत? कारण अमेरिका एकत्र येउन उपाय करते . आपण नाही करत .आता वेळ आहे ते एकत्र येण्याची जशी अमेरिका एकत्र आली होती. भले आपण देशात असू १०० कौरव आणि ५ पांडव. बाहेरच्यांसाठी आपण आहोत १०५ हे दाखवून देण्याची.

मग एवढीही राजकिय समज आपले नेते दाखवू शकत नाहीत? देशासाठी आपल्यातले भेदभाव बाजूला ठेवण्याची तयारी नाही ह्यांची? काय गरज होती ताजसमोर येउन एक कोटी मदत जाहीर करण्याची. सगळ्यांपेक्षा महान , स्वयंभू मीच हे दाखवण्याची ही वेळ होती का? देशभक्तीचा मक्ता आपल्याकडेच असे वाटणारया ह्या पक्षाचे सरकार असताना त्यांनी तर अतिरेक्यांना अगदी घरपोच करायला मंत्री पाठवला होता. त्यांनी कशाला बाता कराव्या देशाच्या? करकरेंच्या स्वाभिमानी कुटुंबियांनी ह्यांची एक पै सुद्धा नाही घेतली.

दैवदुर्विलास म्हणजे ह्या घटनेच्या निषेधाचे भाषण पंतप्रधानांनी टेलीप्रॉम्टरवरुन वाचून दाखवले तो क्षण. अगदीच सपक आणि कणाहीन नेतॄत्व. एक कठोर शब्द नाही उच्चारला गेला त्या भाषणात. अशीच प्रतिक्रिया गॄहमंत्री अगदी क्षीण आवाजात, खांदे पाडून देते झाले तेव्हाच त्यांनी अतिरेक्यांचा “ दीज पर्सन्स” असा उल्लेख केला.

मग राजीनामा सत्रच जणू सुरु झाले. पण जनतेच्या डोळ्यात अशी धूळफेक करुन भागेल का? पुढे काय करणार? मुंबईसारख्या ठिकाणी दिल्लीहून कमांडो पोचायला १० तास लागतात. देशाचे गॄहमंत्री किती कमांडो पाठवले ते वाहिन्यांवरुन सांगतात, अरे साधी अक्कल कशी नाही? तुमच्या वाहिन्या अतिरेक्यांचे कमांड सेंटर पण बघतेच की. मग त्यांना तुमच्या सगळ्या हालचाली जाहीर रित्या सांगता?
“दे वील नॉट हार्म यू अनलेस यू लेट देम हार्म यू” असे एक वचन आहे. प्रत्येक वेळी हल्ला झाला की शेजारयांकडे का बोट दाखवायचं? त्या शेजारयांची आपल्याकडे डोळा वर करुन बघायची हिंमत होता कामा नये असे काहीतरी करुन दाखवायलाच लागेल. इतक्या लांब पसरलेल्या किनारपट्टीवर नजर कशी ठेवणार? पण मग इतर देशांनाही आहेच की किनारा, ते काय करतात? आपण जर चंद्राचे फोटो काढू शकतो तर भारताच्या किनारपट्टीच्या लांबीचं कसलं आलंय कौतुक? मानवविरहीत छोटी टेहळणी विमाने आहेत की.

अमेरिका- मेक्सिकोच्या सीमेवर घुसखोरी टाळण्यासाठी एक आभासी( व्हर्च्युअल) कुंपण आहे. त्याचा भंग करुन प्रवेश करायचा प्रयत्न केला की तातडीने तिथे फौज जमते. आपण आपल्या किनारयाचे रक्षण अश्या प्रकारे करु शकत नाही असे मला वाटत नाही. पहिल्याच प्रयत्नात चांद्रकक्षेत यान यशस्वीरित्या सोडणारया देशाला हे नक्कीच अवघड नाही.

प्रतिबंध हाच एकमेव उपाय आहे अतिरेका वर.
आपली सहिष्णुता हा जर आपला कच्चा दुवा बनला तर ते घातक आहे भारतासाठी.

November 18, 2008

बंदपीठाचा धसका

पुण्यनगरीतील शनिवारवाड्याच्या आसपासचं एक मराठी वृत्तपत्र बरयापैकी उपक्रमशील आहे. अनेक उपक्रम चालवतात, रोज वेगळी पुरवणी काढतात.अशीच त्यांची एक साप्ताहिक पुरवणी “बंदपीठ”. ह्यात आपले अनुभव लिहून पाठवतात वाचक. गेले पाच सहा महिने बंदपीठात तर थैमान चालू आहे. समाजातील चांगले दाखवून देणारा एखादा तुरळक लेख सोडला तर बाकीचे तर वाचवत नाहीत.

एकेका लेखांचे विषय तर पहा.

कॅन्सर झाल्यावर केमोथेरपी घेताना, प्रत्येक केमोनंतर किती केस गळून पडले?
दिवाळीला फिरायला बाहेर गेलो तेव्हा दोन ट्रकांच्या मध्ये सापडून आपल्या मोटारीचा चेंदामेंदा कसा झाला?
कोणत्या नातेवाइकांचे कोणकोणते अवयव निकामी झाले?
किती तास किती मिनिटे अपघात स्थळी पोलिस कसे फिरकले नाहीत?
मॄताच्या शरीराचे देहदान करताना काय काय होते?
चोर बाइकवरुनधडक मारुन कसा पर्स पळवून गेला?
असे सगळे मन विषण्ण करणारे लेख.

आणि गंमत अशी वाटते की चांगले अनुभव देणारे वाचकच नाहीत की चांगले अनुभव ह्या जगात कुणाला येत नाहीत?

पंचाहत्तरीतले आजोबा देखील मी नोकरी धुळ्याला चालू केली तेव्हा म्हणून सुरुवात करतात आणि लिहितात काय तर त्यावेळी नोकरीवर रुजू झाल्यावर स्थानिक लोकांनी कसा त्रास दिला?
मागचे अनेक महिने तर कॅन्सर, केमोथेरपी, देहदान, मृतदेहाची विटंबना , स्पॉन्डिलाइटीस , सांधेदुखी, अपघात,इत्यादी वाचून तर बंदपीठ उघडायच नाही , बंदच ठेवायचं असं ठरवलं होतं.

हल्ली दोन महिने जरा बरे अनुभव छापून येउ लागले. मला वाटलं की आहे बुवा कुणी चांगले अनुभव येणारं जगात शिल्लक तर सध्या पुन्हा ये रेमाझ्या मागल्या. पुन्हा अपघात, हार्टएटॅक, पॅरालिसिस, वेगात ठोकरणे,सांधेदुखी सुरु.

आता तर पुण्यातील वैद्यकिय महाविदयालयात ऍनोटोमी च्या पुस्तकांएवजी “बंदपीठ” अभ्यासाला लावणार असे एकले आहे.कारण प्रत्येकाचे अनुभव, इस्पितळातील रसभरीत वर्णने, आजारांची नवनवीन नावे, शरीराच्या विविध अवयवांची आणि नीला- धमन्यांची शास्त्रीय नावे, अस्थिभंगाचे अनेक प्रकार हे सगळं फ्रेश, ताजं दर आठवड्याला दोन रुपयात मिळतं , मग कशाला ती ऍनोटोमीची जाडजूड पुस्तकं वाचा बुवा? ह्या बंदपीठाने लोकांना एवढं शिक्षीत केलंय की, हल्ली डॉक्टर लोक उपचार करायला घाबरु लागले. रुग्णाचे नातेवाइक बरोबर बंदपीठाचा ताजा अंक आणतात सोबत. त्याबरहुकुम उपचार होतायत ना हे बघायला.

चार महिन्यांपूर्वी तर कहर झाला. तेव्हा बंदपीठात देहदानाची चर्चा भलतीच रंगली होती. एका सुपुत्राने बंदपीठाच्या कार्यालयात फोन केला, देहदानाची सोय कुठे आहे? आमचे पिताश्री आता काही तासांचे सोबती आहेत. झालं त्याच्या पुढच्या बंदपीठात “ बंदपीठ इफेक्ट- असेही एक देहदान” असा लेख संपादकांनीच दिला छापून.

जागतिक चोर पाकिटमार भुरटे महासंघ देखील प्रात्यक्षिकासोबत बंदपीठ अभ्यासक्रमाला लावतो. त्यांच्या धंदयाचे विविध प्रकार एकाच जागी वाचायला मिळतात ना. मराठीतून प्रकाशित होणारं एकतरी नियतकालिक आहे का सांगा बघू जागतिक अभ्यासक्रमाला?

रोजचं वर्तमानपत्र तर चोरी, बलात्कार, खून, मारामारी, दंगल, बॉम्बस्फोट, अपघात ह्या सगळ्याने भरलेलं असतंच हो. चॅनेलवाले तर २४ X ७ दाखवायचं तरी काय म्हणून एखादी काचा फुटलेली टॅक्सी भाड्यावर घेउन तीच ठिकठिकाणी फिरवून, तिचे निरनिराळ्या एंगल्स मधून शूटींग करतात आणि अलम शहरातल्या टॅक्स्या फुटल्याच्या बातम्या देतात पसरवून, किंवा पावसात गेला बाजार एखादा नाला तुंबला की राहिले त्याच्या समोर उभे मग आलाच पूर शहरात.

त्याच्यापेक्षा प्रिंट मेडिआ बरा . पण तिथे पण हल्ली अशी विकतची फ्रस्ट्रेशन्स मिळतात. ती पण एकदम कन्साइज, क्रिस्प, खमंग आणि चुरचुरीत.

मी म्हणतो आजकाल ह्या धकाधकीच्या जीवनात आधीच ताण- तणाव फार, गाडी चालवताना ट्रॅफिकचा त्रास, हापिसात गेलो तिथे तणाव, घरी आलो सोसायटीच्या कटकटी, मग सकाळी पेपर वाचताना तरी आनंदी रहा की. पण कसचं काय राव, बंदपीठ हातात घेतलं की हात लागतो कापायला. आनंदी विचार मग कुठच्या कुठे पळून जातात. चोरट्याने धक्का मारुन दगडावर आपटलेल्या वृद्धेच्या जागी आपली आई दिसू लागते, दोन ट्रकांमध्येचेपल्या गेलेल्या कारच्या जागी आपल्या कारचे भास होतात, व्हॅनवाल्याने अपहॄत केलेल्या शाळकरी मुलीची जागा मनातल्या मनात आपली मुलगी घेते. अजून थोडी धक धक वाढते.

मॄत्यू हा माणसाच्या जीवनाला सुंदर बनवतो. पण तो किती भयप्रद अवस्थेत येउ शकतो त्याचे वर्णन करणारे अनेक पुठ्ठा बांधणीचे ग्रंथ भरतील इतके लेख ह्या बंदपीठात आले असतील आजपर्यन्त. वाइट अनुभव नसतातच असं नाही म्हणायच मला. कधी न कधी ते येणारच त्याच्यासाठी तयार असायला हव हे मान्य. त्यातून गेलेल्यांप्रति मी सहॄदय आहे. असे प्रसंग कुणावर येउ नये अशी मी देवाकडे प्रार्थना करतो.

पण जगात चांगुलपणादेखील आहे की शिल्लक, तो येउ द्या की भाउ समोर. जरा हुरुप वाढेल असं काहीतरी छापा ना जरा. सकाळी पेपर उघडला की समोर डोक्यातून भळभळ रक्त वाहणारी आज्जी, नाहितर पाय वर टांगून हॉस्पिटलात पडलेले आजोबा. कशी होइल बरं दिवसाची सुरुवात? आणि प्रत्येक आठवड्याला हे सगळं एकत्र छापून देणारे ते “बंदपीठ”

मी तर म्हणतो की Happy people find happy experiences, मग अश्या अनुभवांना पण येउ दया की समोर.चांगले- वाइट अनुभ येणारच की प्रत्येकाला कारण तुम्ही जगाकडे ज्या दॄष्टीतून बघता, जग तुमच्याकडे त्याच दॄष्टीतून बघते.
माणूस जगतो कश्यासाठी? त्याची जगण्याची प्रेरणा काय असते? दु:ख की सुखाची आशा? त्याचे प्रयत्न कश्यासाठी असतात? चांगल्यासाठी की वाईटासाठी? साधा विचार करा, प्रवासाला जाताना आपण आपली गाडी चुकेल असा विचार मनात आणतो का? मग अशी दु:खच समाजाच्यासमोर समोर आली तर त्याला जगायचा हुरुप कुठुन येणार?

इथे अनुभव लिहिल्याने दु:खितांची दु:खे नाहिशी होणार आहेत का? थोडा दिलासा मिळेल, दोन चार फोन येतील. पण आपला लढा आपल्यालाच लढायचा असतो, तिथे कोणी मदत नाही करत. माझ्या तरी मते त्यांनी समाजातील चांगुलपणाचे अनुभव वाचले तर त्यांची इच्छाशक्ती वाढेल. जगण्यासाठी काही प्रेरणा मिळेल.

अर्धा पेला रिकामा असला तरी अर्धा भरलेला असतो हे कळू दया की समाजाला. एखादया अग्रगण्य वॄत्तपत्राने हे असले टाळूवरचे लोणी खाण्याचे प्रकार बंद करुन समाजाचा हुरुप वाढवण्यासाठी प्रयत्न करायला नको ?

सुखी ताणरहित जीवनशैलीसाठी माझ्याकडे तरी एकच उपाय आहे.. "बंदपीठ" वाचायचं बंद करा.. मी ही तेच करतोय..

November 17, 2008

जुवळ-भाग -१

मी नववीत होतो तेव्हा पावसाळ्यात ट्रेक करायचा ठरवला. तेव्हा काही बाही पुस्तकं वगैरे वाचून, नॅट-जिओवर काही फिल्म्स बघून ट्रेकबद्दल एकदम आकर्षण निर्माण झालेलं.आम्ही सगळे मित्र तसे पावसात क्रिकेट खेळता येत नाही म्हणून डोंगरउतारावरुन घसरगुंडी खेळायचो. पावसाळ्यात उतार निसरडा झाला की खाली सरकत यायचं. त्यामुळे दर पावसाळ्यात घसरुन उतरुन एक चड्डी फाटली की तो खेळ बंद.
पण त्या वर्षी गावातल्या व्हाळातून* चालत ट्रेक करण्याचा घाट घातला. ते भाद्रपदातले दिवस होते. शाळेला गणपतीची सुट्टी नुकतीच लागली होती. ह्या दिवसात कोकणात पाउस जरा खळावतो* आणि थोडी ताप* पडते. त्यामुळे जनावरं* बिळातून बाहेर येतात. तापलेल्या खडकांवर, डांबरी सडकेवर पहूडून उष्णता मिळवत रहातात. त्यांच्या बिळांमध्ये तेव्हा पाणी गेलेलं असतं. मातीत ओलावा असतो. त्याचप्रमाणे हा त्यांचा मेटींग सिझन असतो.

आम्ही फार काही अवघड वाटेवरुन जाणार नव्हतो. आमच्या कॉलनीपासून मुंबइ- गोवा हायवे वर साधारण एक किलोमीटर अंतरावर तो व्हाळ ( त्याचं नाव अव्हेरयाचा व्हाळ) हायवेला छेदून जायचा. तिथे हायवेवर पूल आहे. तिथून खाली उतरुन अव्हेरयाच्या पात्रातून, तासभर नदीकडे चालत गेलो की डाव्या अंगाला वर व्हायचं. तिथून पुन्हा अर्धा तास चाललो की आमच्या कॉलनीच्या पाठीमागच्या गेटातून घरी. असा साधारण कार्यक्रम आम्ही आखला.

पाउस थोडासा थांबला असल्याने व्हाळात पाणी कमी असतं. पात्रातले शेवाळ धरलेले दगड आता वरती आलेले असतात. अव्हेरयाच्या व्हाळाचं पात्र चांगलं रुंद. त्याच्या प्रवाहाने घळइ निर्माण केली आहे. दोन्ही काठ चांगले उंच आहेत. त्याच्या प्रवाहाच्या वेगामुळे दगडांना वेगवेगळे आकार प्राप्त झाले आहेत.

आमचा एकंदरीत प्लान एकून शेवटी आम्ही तिघेच उरलो. आणि आता उद्याच जायचं ठरवलं.

त्यादिवशी घरातून साडेतीन- चारला निघालो. तसं वरती बघितलं तर आभाळ भरुन आलं नव्हतं पण संध्याकाळपर्यंन्त पाउस पडेल असं वातावरण होतं .

त्याप्रमाणे अव्हेरयावरच्या पुलाखाली उतरलो. जिथून उतरलो तिथे वरती डाव्या हाताला, गावात जे हिंदू लोक पुरुन(दफन) अंत्यविधी करतात त्यांचं स्मशान आहे. खाली उतरताना सहज वर बघितलं तर खड्डा खोदायला काही माणसं जमली होती. आधीच आम्ही घरी न सांगता हा बेत आखला होता. आता त्या मंडळींपैकी आपल्याला कोणी बघू नये असं एकमेकांत म्हणतोय न म्हणतोय तोपर्यन्त कानावर कुकारा* आलाच

“रे गजा, रे जातावायस खंय अव्हेरयात?” मित्राचं बाजारपेठेत दुकान होतं त्यामुळे त्याला ओळखणारे बरेच.
“ नाही, असंच जरा फिरायला.”
“ हो अवेरो फिरोची जागा हा की? फाटी फिरा बघू, नायत घराकडे सांगतो..”
“ नाही, जरा इथेच पुढे जातो, जास्त लांब नाही जात.”
“भीती हा हंय अव्हेरयात, मागल्या म्हैन्यातच गाडी उलाटली होती पुलावरसून, दोगे गेले हुते तुमी खाली उतारलात थंयच. ही काय आज भिक्याची आवस गेली, तिका घेवन इलो हाव्तं आमी..”
“ नाही तू काळजी नको करु, आम्ही सांगितलंय घरी, लगेच येतो परत.”

असं सांगून आम्ही त्यांना गुंगारा दिला आणी पुढे सुटलो. आधी कधीच आलो नव्हतो अव्हेरयात. साधारण तासाभरात आपण योग्य जागी पोचून मग वरती जाउ डावीकडे असा विचार होता. आम्ही उन्हाळ्यात आमच्या घराकडून करवंद काढायला येत असू तेव्हा अव्हेरयात उतरायचो. पण तेव्हा पाणी नसायचं पात्रात . त्यामुळे घरापासून अव्हेरा ही वाट सरावाची होती. हायवेवरचा पूल ते अव्हेरयाच्या पात्रातून चालत त्याजागेपर्यंत जाणे ही एक त्या वयानुरुप एक्साइटमेंट होती. ती जागा आली की वरती व्हायचं हे ठरलेलं. ती जागा पुलाकडून चालत आलो तर साधारण तासाभराने लागेल असा आमचा अंदाज होता.
अर्धा – पाउण तास झाला .आता वरती आभाळ भरुन येउ लागलं होतं, त्यात त्या स्मशानातल्या भाउने मनात भीती निर्माण करुन ठेवलेली. आम्ही तसे लहानच अजून. नववी- दहावीतले. आता आम्हालाही थोडीफार भीती वाटू लागली. पण आता आलोच आहोत तर पूर्ण करायचं म्हणून चालू लागलो. अजूनही आमच्या ठरलेल्या जागेचा पत्ता नव्हता.

शेवाळाने बुळबुळीत झालेल्या दगडावरुन सांभाळून चालावं लागतं होतं. एक- दोनदा तर आम्ही सरकून पड्लो देखील. पण एकदम थ्रील वाटत होतं आता बाकिच्या मित्रांना काय काय सांगायचं याच प्लानिंग सुरु झालं होतं. पण आता पाय दुखू लागले होते.
चांगल्या दीड तासांच्या पायपीटीनंतर एकदा आमची नेहमीची जागा दिसू लागली. म्हणजे आमचा अंदाज अगदीच काही चुकला नव्हता.

त्यामुळे आता डावीकडे चढून गेल्यावर अर्ध्या तास पायपीटीनंतर घरी पोचू शाश्वती होती. त्यामुळे आता एक भली थोरली धोंड * बघून त्यावर आम्ही तिघे पाय पासरुन बसलो. पाण्यात अर्धवट बुडालेल्या दगडांना मुळे* चिकटले होते. पाणी आवाज करत वाहत होतं. आम्ही पात्रात मध्यभागी बसून छान दॄष्य बघत होतो. आजूबाजूला माजलेल्या रानाचा, पावसाळी झुड्पांचा संमिश्र उग्र गंध वातावरणात पसरला होता.

आत्तापर्यन्त पायपीट करताना भुरंबुळे* काढले होतेच. त्या विस्तीर्ण धोंडीवर बसून आम्ही ते धुउन सोलून खाल्ले. थोडावेळ शांत बसून आता जाउया म्हणून उठलो तोच…

उजव्या हाताला वरती खस फस आवाज येत होता.. म्हणून धोंडीवरुन उतरुन व्हाळ ओलांडून पलीकडे गेलो. थोडी चढण चढून गेल्यावर पुढे जरा सपाटी होती. आणि चढण परत सुरु होत होती. त्या सपाटीवरुनच हा आवाज येत होता. कुणीतरी गवतात बेभान होउन लोळताना येइल तसा हा आवाज येत होता.

जाउया की नको वरती, काय असेल......?
चलबिचल होउन शेवटी वरती जाउन काय ते बघायचं ठरवलं. पहिली छोटीशी चढाई करुन वर गेलो. समोर बघतो तर काय, एक विलक्षण दॄश्य दिसत होतं. आम्ही देहभान हरपून बघतच उभे राहिलो. शेजारी कोणी उभं आहे ह्याची सुद्धा जाणिव झाली नाही. नजरबंदी झाल्यागत होउन गेलं.

त्या छोट्याश्या सपाटीवर दोन तीन बांबूची बेटं होती. दोन तीन वीत भर उंच गवत माजलं होतं. त्या गवतात एक नाग- नागीणीची जोडी आपल्या मीलनात हरवून गेली होती.

पिवळी जर्द , उमदी अशी ती दोन जनावरं* एकमेकांत अक्षरश: गुंतून गेली होती. गुरफटली होती. एकमेकाला विळखा घालून दोघंही खाली गवतावर आपटत होती. मध्येच विळखा न सोडवता गवतातून लोळत बांबूच्या बेटापर्यंत पोचत होती. तिथले काटे टोचले की पुन्हा गवताच्या मउ मुलायम शेजीवर येत होती.

त्यांच्याच गवतात लोळण्याचा आणी मधूनच हुंकारण्याचा, फुत्कारण्याचा आवाज आम्हाला खाली व्हाळात येत होता.
अत्यंत देखणी जनावरं होती ती. पिवळ्या अंगावरचं करडया, तपकिरी ठिपक्यांचं नक्षीकाम उठून दिसत होतं, मध्येच फणा फुलवल्यानंतर आकडा दिसत होता, लवलवत्या जिभल्यांनी एकमेकाला स्पर्श होत होते. मध्येच हुंकार टाकले जात होते.आपल्याच आनंदात मश्गुल झालेली ती दोघंही एकमेकांला विळखे घालून शेपटीवर उभी राहीली की आमच्या एवढी उंचीची होत होती. आणी हे सगळं बघायला आम्हांला धैर्य कुठुन आलं होतं न कळे?

तेव्हा नुकताच गावाकडे टीव्ही दिसू लागला होता. भली थोरली डिश बसवून दोन तीन वाहिन्या दिसायच्या. त्यात दूरदर्शन वर नॅट-जिओच्या अश्या काही वन्य जीवनावरच्या फिल्म्स दाखवत. ते कॅमेरामन महिनोनमहिने कॅमेरे रोखून रहात तेव्हा कुठे त्यांना पाहिजे ते चित्रीकरण करता येत असे. त्यांच्या चिकाटीचे तेव्हा कौतुक वाटत असे. पण आम्हाला आज असे काही डोळे दिपवून टाकणारे दॄश्य प्रत्यक्ष नैसर्गिक स्वरुपात बघायला मिळत होते.

जुवळ भाग-२

त्या दोघांचं तांडव चालूच होतं. आमच्या पासून काही फूट अंतरावर आम्ही ते सगळं बघत होतो. चांगली मनगटाएवढी जाड ती जनावरं कधी थोडी अलग होत होती. वरची चढण चढून जात होती. फिरुन खाली येउन एकमेकांना फणे पसरुन, समोरासमोर डोळाभर न्याहाळत होती आणी पुन्हा गुरफटून बिलगून जात होती. आपल्या फण्यांनी , जिभल्यांनी एकमेकाला स्पर्श करत होती.

तो सगळया परिसर त्यांच्या थैमानाच्या खुणा आपल्या अंगावर बाळगता झाला होता. गवत अस्ताव्यस्त झालं होतं. रानअळू जागोजागी मोडून पडलं होतं. बांबूच्या काटयांवर ती जोडी आपटून त्यांच्या अंगावर त्याच्या खुणा दिसत होत्या. पण त्या दोघांना त्याचं कसलंही भान उरलं नव्हतं.

आम्ही तिघेही नि:स्तब्ध, थिजल्यासारखे नजरबंद होउन ते अनोखं , दुर्मिळ दॄश्य बघत उभे राहिलो होतो.

हे सगळं बघून फारतर दहा मिनिटं झाली असतील, त्या दोघांनी एकमेकाला विळखे घालत आता पूर्ण उंची गाठली, शेपटीकडे ते दोघे आता एकत्र झाले. आपण आपले हात एकमेकाभोवती पिरगाळून दोन्ही तळहात थोडे बाजूला घेउन फुलवले तर जसं दिसेल तसे एकमेकाला विळखे मारुन त्यांनी आपले फणे एकमेकाच्या आजूबाजूला फुलवले….. ती उमदी जनावारं आता दोन,वेगवेगळी उरली नव्हती. परस्परांत रममाण असे त्यांचे अद्वैत झाले होते.

पुढच्या काही क्षणांत ती जोडी अलग झाली. त्यातील एक जनावर आता निपचीत श्रांत- क्लांत पसरलं होतं. दुसरं मात्र आमच्या रोखाने फणा काढून बघत होतं. आता इतक्या वेळाने भानावर येउन त्याला आमची चाहूल लागली होती.

खाडकन जाग यावी तसे आम्ही भानावर आलो. काय करावं ते सुचेना. वरती कसं जाणार. त्याने वाट तर अडवून धरलेली. शिवाय थोडं पुढे त्यांच्या पैकी एक जण पसरलं होतं. खाली व्हाळ. प्रवाहात उडी मारायला आवश्यक एवढं पाणी सुद्धा नव्हतं.

निर्णय घ्यायला फक्त काही क्षण होते आमच्या जवळ. बघितलं तर थोडा पुढे, व्हाळाचा प्रवाह जराश्या उंचीवरुन खाली पडत होता. तिथे एक कोंड* होती. उतारावरुन आडवं धावत जाउन त्या कोंडीत उडी मारणे हा एकच पर्याय होता.
दोघांनाही हाक देउन मी पुढे पळत गेलो , पाठचा पुढचा विचार न करता साधारण पाच- सहा फूट उंचीवरुन उडी टाकली थेट कोंडीत. माझ्या पाठोपाठ अजून दोन आवाज झाले.
आता संकट तरी टळलं होतं. जीवाच्या आकांताने उड्या मारल्या खरया, पण आमच्यापैकी कोणालाच पोहायला येत नव्हतं.

आमचं नशीब त्या दिवशी खरोखरच जोरावर होतं. कोंड फारशी खोल नव्हती. एकदा- दोनदा असहाय्यपणे त्या पाण्याबरोबर गोल गोल फिरुन आमचे पाय आता खाली टेकले. तोपर्यन्त बरच पाणी खाल्लं होतं. कसाबसा मी काठावर हात टेकून वरती आलो. पाठोपाठ दोघा मित्रांनाही वरती काढलं.

काठावर येउन धापा टाकत बसलो. दहा मिनिटामध्ये एवढं सगळं घडून गेलं होतं. एव्हाना ती खस-फस सुद्धा एकू येइनाशी झाली. आमच्या पायातल्या चपला आता कोंडीतल्या पाण्याबरोबर गोल फिरु लागल्या होत्या. दगड मारुन त्या काठाला लावल्या. काढून घेतल्या. कपडे तर ओले चिंब झाले होते.

नववी- दहावीच्या वयाच्या अवघड टप्प्यावर असताना असे काही बघायला मिळाल्यामुळे, किंवा एवढे चालल्याच्या श्रमांमुळे, की कोंडीत सापडून बाहेर आल्यामुळे, कोण जाणे कश्यामुळे, आम्हा तिघांचेही उर आता धपापू लागले. कपाळ,कान,गाल, गळा आणी छाती गरम झाली होती. ताप बघताना जसा हात लावून बघतो तसा हात लावला तर चटका बसण्याइतपत . तोंडाला कोरड पडली होती. कोणच कोणाशी बोलत नव्हतं. जणू एक अनामिक, विलक्षण गारुड पडलं होतं. डोळ्यासमोरुन ते दॄश्य हलत नव्हतं.. अजूनही आहे तसं आठवतं.

धोंडीवर थोडावेळ टेकलो. भारल्यागत होउन तसेच अबोलसे उठलो. पुढे चालून आमच्या खुणेच्या जागेवर आलो. तिथून वरती होउन अर्धा तास वाट तुडवली की घरी.

एवढ्या कालावधीत आता अंधारुन यायला सुरुवात झाली. आकाश भरुन येउ लागलं. थोड्याच वेळात पाउस सुरु झाला.तसेच भिजत भिजत घराकडे चालताना कधीतरी पाउस संपला. हळूहळू आम्ही भानावर येउन एकमेकांशी बोलू लागलो. आता अंग हळूहळू नेहमीसारखं होउ लागलं. भर पावसातही जाणवणारा चटका आता जाणवेनासा झाला होता.

आता घरी जाउन पावसात भिजायला झाल्याचं सांगून जमणार होतं.

शाळेत स्त्रीकेसर, पुंकेसर, पुनरुत्पादन संस्था वगैरे फक्त पुस्तकात वाचायला शिकायला मिळत होतं. पण हे असं काही प्रत्यक्ष बघितल्यामुळे, ते अजून डोळयासमोरुन हलत नव्हतं. ते ही इतकी उमदी , देखणी जनावरं बघायला मिळणे हा अजून एक योग.

घरी जाउन गरम पाण्याने आंघोळ केली. देवासमोर दिवा लागला होता. रामरक्षा म्हटली तेव्हा कुठे जरा चित्त ताळ्यावर आलं.

गेल्यावर्षी एका मित्राबरोबर बोलताना त्याला हा प्रसंग सांगितला. तो नाथपंथी. बैरागी. त्याच्याकडून समजलं की आम्ही जे काही बघितलं ते फार कमी जणांना प्रत्यक्ष बघायला मिळतं. असे बघणारे फार भाग्यवान असतात असं त्यांच्या समाजात प्रचलित आहे. भाग्योदय होइल तेव्हा होइल. पण हा विलक्षण अनुभव मात्र तसाच साठवलेला राहिल.

हा अनुभव शब्दबद्ध करताना कोकणी बोलीभाषेतील अनेक शब्द वापरणे आवश्यक झाले. त्यांचा अर्थ तिथेच कंसात दिला असता तर अडथळल्यासारखं वाटलं असतं म्हणून त्या शब्दांना * असे चिन्ह टाकून त्यांचा अर्थ खाली देत आहे.

व्हाळ : रुंद, मोठा ओढा
खळावतो: पाउस थोडे दिवस थांबतो.
ताप पडणे: उन पडणे.
कुकारा : खच्चून, लांबवर एकू जाइल अशी मारलेली हाळी.
धोंड : प्रवाहाच्या पात्रातील विस्तीर्ण, काळे पाषाण.
कोंड : प्रवाहाची धार एकत्र, थोड्या उंचीवरुन पडून खड्ड्यासारखा भाग तयार होतो. तिथे पाणी
गोल फिरते. थोडावेळाने ठरावीक उंचीपर्यन्त आले की पुढे सरकते. प्रवाहात भोवरा बनतो
जनावर : नाग असा थेट उल्लेख कोकणात करत नाहित. त्याएवजी जनावर असा शब्द
भुरंबुळे : हे कंद कोकणात,पावसाळ्यात मिळतात.ओल्या मातीत थोडंसं खोदल्यावर सापडतात. पण जपून नीट पाने जोखून काढावे लागतात, कारण तश्याच पानांची अजून एक वनस्पती असते, तिचे कंद खाल्ल्यास तोंडाला खाज येते.
मुळे : शंखात मांसल भाग असलेला माशाचा प्रकार. त्याचं सार करतात पावसाच्या दिवसात.पावसात भिजून सर्दी झाली की मुळ्यांचं मसालेदार सार हा अक्सीर इलाज.
जुवळ : नाग- सापाच्या मीलनासाठी कोकणी बोलीभाषेतला प्रतिशब्द

November 14, 2008

धन्यवाद

आज मी ब्लॉग लिहायला सुरुवात करुन तीन आठवडे झाले. पण आजचा दिवस माझ्यासाठी विशेष आनंदाचा आहे.


मी ब्लॉग लेखनाला तशी बरीच उशीरा सुरुवात केली. मराठीत हजारो ब्लॉग आहेत. लाखो वाचक असणारे ब्लॉग आहेत. अतिशय सरस , सकस साहित्य ब्लॉगवर वाचायला मिळतं.ह्यात मी कुठेच नाही ह्याची मला कल्पना आहे. तरी पण एक प्रयत्न करुन बघू म्हणून मी ब्लॉग लेखन सुरु केलं. मी दोन प्रकारचे गणक( हिट काउंटर) लावले . एक फक्त हिट्स मोजतो, ते म्हणजे भेट देणारे लोक. दुसरा गणक हया ब्लॉगावर पुन्हा- पुन्हा येणारे( रिटर्नींग) तसेच यूनिक वाचक मोजतो. हे वाचक ठरवण्याचे निकष अत्यंत कडक आहेत. ते तुम्हाला
इथे वाचायला मिळू शकतील ह्यांनी काही ना काही वाचन केलेले असते.

तर ही वाचक संख्या आता १००० चा आकडा ओलांडून गेली आहे.एवढया कमी कालावधीत माझ्या ब्लॉगला भेट देणारयांची संख्या १६०० पार करुन गेली. त्यापैकी १००० जणांनी कोणता न कोणता लेख वाचला.

मी जेव्हा सुरुवात केली तेव्हा इतक्या लवकर वाचकांचा आकडा १००० पार होइल असं वाटलं नव्हतं. मुदलात आपलं लेखन कितपत आवडेल असा प्रश्न होता.

पण तुम्ही मला सांभाळून घेतलं, माझा हुरुप वाढवणारया प्रतिक्रिया दिल्या, आपल्याला जे आवडलं नाही ते ही सांगितलं. आपल्या स्नेहामुळे हे शक्य झालं.

आपल्या सर्वांचे आभार किती आणी कोणत्या शब्दांत मानू ते मला कळत नाहीसं झालं आहे. य़ापुढेही मी माझ्या परीने चांगले लेखन देण्याचा प्रयत्न करीत राहिन. माझ्यावर असाच लोभ ठेवा. माझा ब्लॉग वाचत रहा. मला माझ्या चुका दाखवत रहा.

धन्यवाद
!!

November 13, 2008

एकलेचपणा

आता अमेरिकेत येउन दोन महिने झाले. घरी परत जायचा दिवस आता एक महिन्यावर आलाय. बरयाच वर्षानी घरापासून दूर राहिलो इतके दिवस. त्यामुळे साहजिकच आठवण येउ लागली आहे. माझा मुलगा अनुष्टुभ आता सहा महिन्यांचा झालाय. त्याच्या बाललीलांचे विडियो पहावे लागतात. अनुष्टुभची अनन्या ताई मला त्याची प्रगती सांगत असते.


असा थोडा भावनाविवश असतानाच, माझे स्नेही श्री.धोंडोपंत यांनी अभंग किंवा देवद्वार छंदाबद्द्ल मार्गदर्शन केले. चार ओळींचा हा छंद ६,६,६,४ असे शब्द प्रत्येक ओळीत आणि दुसरया / तिसरया ओळीचे यमक अश्या सोप्या शब्दांत धोंडोपंतांनी हा छंद समजावून सांगितला.


मग माझ्या मनाच्या त्या भावनाविवशतेत असताना मला ही एक ह्याच छंदातील कविता स्फुरली. मग घरी वडिलांना ऎकवून त्यात बरिचशी सुधारणा केली. ती कविता आज इथे देतोय.

एकलेंचपणा
संपेलच आतां
जाईन भारतां
माझ्या गावां

अमेरिका वारी
एकाकी जीवन
कसलें मरण
पैशापोटीं.

माझ्या लेखनाने
दिली मला साथ
करितोहो बात
मनासवें.

मित्रही लाभले
उत्तम अनेक
हिरा हा प्रत्येक
पारखिलां.

कपिलच्या मना
ओढ ही लागते
मायभूं दिसते
स्वप्नांमध्यें.

पिंजरा सोनेरी
टाळू येणे कसें
मन वेडेपिसें
करितोहां

November 5, 2008

हॅलो, केन आइ स्पीक टू ओबामाजी- भाग-१

“ हॅलो, केन आइ स्पीक टू ओबामाजी?”

“ह्हे, व्हूज दॅट?”

“आई येम सतीश मिश्रा, मायावती’ज एड फ्राम इंडिया”

“मायावाटी, व्हाट्स दॅट? बरॅक इस वेरी बिझी नॅव, काल अगेन लेटर”

“नो नो एज ओबामाजी इज फॉर अमेरिका, मायावती इज फार इंडिया, शी मे बी द ने़क्स्ट प्राइम मिनिस्टर ऑफ इंडिया.”

“ओके बट डोन्ट बादर हिम मच, ओन्ली अ फ्यू मिनिट्स.”

“मेडम बात करियेगा, अभी लाइन ट्रैन्सफर हो रही है”

“येस, बरॅक हिर”

“हेलो, ओबामाजी, कान्ग्रेजुलेसन्स जी,आपने तो इतिहास.. हेलो… अरे मिश्राजी, वो कागज इधर करो ना.. हा हेलो कान्ग्रेजुलेसन्स.. यू हेव मेड अ हिस्टरी सरजी, आय येम प्रावड आफ यू एन्ड आल माय पार्टी मेंबर्स अल्सो टू सरजी”

“थॅंक यू, मायावाटी, बट इवन मॅन्मोहन एन्ड सोनिया हॅवन्ट काल्ड येट, हाव यू हॅव काल्ड मी?”

“सर दॅट्स द चेन्ज इंडिया नीड्स, सर आय हेव डन सोसल इंजिनियरिंग इन उत्तर परदेस सरजी टू बिकम चीफ मिनिस्टर आफ उत्तर परदेस , एन्ड नाव यू हॅव फालोड माय पाथ इन अमेरिका सरजी”

“विच ब्रॅन्च आफ इंजिनियरिंग इज धिस? एट लीस्ट इन हार्वर्ड आय हेव नाट हर्ड आफ एनी सच ब्रॅन्च आफ इंजिनियरिंग एन्ड व्हॅट इज उत्तर परदेस?”

“सरजी देट इज….अरे मिश्राजी यहा पे सुनो.. अब क्या बतायें? जल्दी लिख के देना, चोटी से हात निकालो और लिखो जल्दी से”

“स र जी आ य हे व गाट स पोर्ट आफ अ प र का स्ट एन्ड लो व र कास्ट.. अरे मिश्राजी.. जल्दी लिखो भई ओबामाजी को टाइम नही है., उत्तर परदेस इज द स्टेट इन इंडिया सर….. दिल्ली……. अवर केपिटल…. इज वेरी नियर फ्राम हियर…. एन्ड नाउ अ डेज इन माय साइट टू सर”

“वेल मायावाटी आय गाट यूर पाइन्ट.”

“सर जी एक्चुअली, यू हेव कम्प्लीटेड द ड्रीम आफ कांन्सीरामजी सरजी”

“ड्रीम्स आर नाट कम्प्लीटेड, ड्रीम्स आर फुलफिल्ड मायावाटी”

“ओके, सोरी सर, यू हेव फुलफिल्ड द ड्रीम आफ कान्सीरामजी सरजी”

“वेल बट व्हेर फ्राम धिस कान्सीराम केम इन बिट्वीन”

“ सर जी ही हेज नोट कम इन बिट्वीन, ही इज विदिन मी सर, व्हूएव्हर आय येम, आय येम बिकाज आफ हिम सर”

“ सो यू मीन ही इज यूर गाडफादर?”

“येस सर”

“सर यू हेव आल्सो कम्प्लीटेड, सोरी फुलफिल्ड द ड्रीम आफ फुलेजी, शाहूजी एन्ड आंबेडकरजी सर जी”

“ ओह, व्हू आर दिज जंटलमेन? एन्ड व्हाट इज धिस जी जी यू आर सेयिन्ग अगेन एन्ड अगेन?”

“सर जी, दिज आर अवर गाड्स सर, लायक यूवर मार्टीन ल्युथर किंग, लिंकन एन्ड लिंडन जान्सन…अरे मिश्राजी तिनो नाम बराबर है ना?”

“ओके ओके म बी सम ग्रेट पर्सनालिटीज फ्राम इंडिया, फार नॅव आय नो ओन्ली मॅहॅत्मॅ घॅन्दी, मॅन्मोहन एन्ड सोनिया दॅट्स व्हाय आय हॅव जो बिडेन एज माय डेप्युटी टू लूक ऍफ्टर फारिन पालिसीज”

“ नो सर दीज थ्री आर व्हेअर एन्ड फुलेजी, शाहूजी ,आंबेडकरजी आर व्हेअर? डोन्ट कम्पेयर सर…. मिश्राजी अब कैसे जल्दी लिखके दिया?”

हॅलो, केन आइ स्पीक टू ओबामाजी? भाग-२

“सर जी टू सेलिब्रेट यूवर सक्सेस, आय येम गोइंग टू कन्स्ट्रक्ट यूर स्टेच्यू इन फ़्रंट आफ उत्तर परदेस असेंब्ली. सर इट वील एन्करेज अवर यूथ. सर आय येम आल्सो गोइंग टू कन्स्ट्रक्ट अ मुझियम इन रायबरेली, आय हेव केन्सल्ड लेन्ड गिव्हन फार द रेल फेक्टरी टू कन्स्ट्रक्ट देट मुझियम.”

‘”ओह दॅट्स काइंड आफ यू, बट आय एम नाट सो ग्रेट.”

“नो सर, नाउ यू वील बी अवर फोर्थ गाड आफ्टर फुलेजी, शाहूजी एन्ड आंबेडकरजी.... नाउ इट वील बी कंपल्सरी फार अवर पार्टी वर्कर्स टू वियर टी- शर्टस विथ यूवर फोटो सर…… यूवर फोटो वील आल्सो बी हेन्गड ओन द वाल्स सर…आल द कंपाउंड वाल्स आफ लखनौ वील हेव यूवर पेंटींग्ज........ आय हॅव इन्स्ट्रक्टेड मिश्राजी टू चेंज द सिलेबस एन्ड इन्क्ल्यूड यूवर लेसन्स फार ओल स्टेन्डर्डस सर….. एव्हन आय एम प्लेनिंग टू रि-कलर ताज महाल वीथ ब्ल्यू…… सर माय पार्टी कलर एन्ड यूवर पार्टी कलर इज सेम सर.”

“ सर आय येम आल्सो गोइंग टू रिनेम बुलंद्सेहेर डिस्ट्रीक्ट एन्ड गिव्ह यूवर नेम. सर नाउ इट वील बी ओबामा जिला देट मीन्स ओबामा डिस्ट्रीक्ट …… सर इन धीस वे अवर पार्टी इज वर्कींग फॉर प्राइड एन्ड वेल बिईंग ऑफ डाउनट्रोडन कम्युनीटी इन इंडिया सर,…. डाउनट्रोडन कम्युनीटी….. मिश्राजी आसान लिखने मे क्या परेशानी है आपको?”

“ मायावाटी यू आर मिस्टेकींग, आय एम नाट ओन्ली फार डाउनट्रोडन कम्युनीटी, आय एम प्रेसिडेन्ट आफ यूनायटेड स्टेट्स आफ ऍमेरिका एज अ व्होल. आय वान्ट टू वर्क फार एन्टायर सोसायटी एन्ड ओवरकम द बॅरियर्स आफ कॅस्ट्स, रेस एन्ड रिलिजन्स. आय वान्ट ऍमेरिका टू बी अ मोर लिबरल सोसायटी , एन्ड दॅट्स द चेन्ज आय वान्ट टू सी इन ऍमेरिका."
" आय वान्ट टू स्टाप आल धिस डर्टी पालिटीक्स आफ कॅस्ट्स, रेस एन्ड रिलिजन्स. आय बिलिव्ह एवरीबाडी इज इक्वल फार द गाड आलमायटी.नाट ओन्ली इन ऍमेरिका बट आय वान्ट टू वर्क टूवर्डस सच अ ग्रेट वर्ल्ड.आल द लीडर्स आफ मायनारिटी एन्ड डाउनट्रोडन कम्युनीटी्ज शुड नाव शेड देर कलर्स एन्ड राइज अप टू वर्क टूवर्डस द न्यू वर्ल्ड आर्डर.”

“ हेलो सर जी आय येम नाट एबल टू हियर यू सर, येस्टरडे आय ट्रान्स्फरड द टेलिकोम सेक्रेटरी टू एनिमल हजबंडरी सर, ही मस्ट हेव प्लेड वीथ द कनेक्शन सर…… देयर सीम्स टू बी सम प्राब्लेम इन द कनेक्शन सर…हेलो व्हाट डिड यू से सर…….. हेलो… हेलो.. हेलो.. हेलो….... सर जी आय येम नाट एबल टू हियर यू सर……. हेलो….”

“ आय सेड, आल धिस गिमिक्स आफ चेंजिंग द सिलॅबस, विअरिंग द टी- शर्टस, पेंन्टीग द वाल्स, म्यूझियम्स एन्ड रिनेमींग सम डिस्ट्रीक्ट वील नेव्हर हेल्प."
"आल द लीडर्स आफ मायनारिटी एन्ड डाउनट्रोडन कम्युनीटीज शुड नॅव लीव देर युज्वल कॅस्ट बेस्ड पालिटीक्स एन्ड शुड नॅव ऍडॅप्ट टू द न्यू थाट आफ अन एक्वल वर्ल्ड आर्डर. एन्ड स्टार्ट वर्किंग फार रिअल वेल्फेयर आफ द एन्टायर कम्युनीटी….”

“ हेलो सर.. हेलो… हेलो….... हेलो…... हेलो….. सर जी आय येम नाट एबल टू हियर यू सर……. सर…… बट यू डोन्ट वरी आय वील इन्स्ट्रक्ट मिश्राजी टू ट्रान्स्फर दॅट सेक्रेटरी फ्राम एनिमल हजबंडरी टू फेमिली प्लेनिंग सर.. अरे मिश्राजी देख क्या रहे हो?....... फोन काट दो भई…….और हमने सबसे पहले बधाइ दिया ये कल के अखबारोंमे छपवाइएगा….”

November 3, 2008

नवीन लेखन

मित्रहो, अमेरिकेतील डीयर हंटींग सिझन तसंच बरेच दिवस मनात अडकून बसलेली लंच टाईम आणि डब्बा ग्रूपची पोस्ट आता पूर्ण केली आहे. दुसरा भागही इथे आता वाचायला मिळेल.

November 1, 2008

लंच टाईम आणि डब्बा ग्रूप - भाग १

मी कामाला जाताना डबा न्यायला लागलो, त्याला आता १२ वर्षे होउन गेली. शाळा, कॉलेज घराजवळ होते , त्यामुळे, मधल्या सुट्टीत, घरी जेवायला येत होतो. नंतर इंजिनिअरींगला असताना, कॉलेज मेस आणि हॉस्टेल एकाच कॅम्पसमध्ये असल्यामुळे, तिथेही डब्याचा संबंध आला नाही.

पुण्याला,जॉब सुरु केल्यावर,डबा सुरु झाला. बॅचलर असताना, आमच्या कंपनीत एक डबेवाला यायचा. त्याचा डबा असायचा छान, पण अगदीच कमी पडायचा. त्याला आम्ही, "काय भोसले आज वाटाण्याच्या उसळीत फक्त २५ वाटाणे होते, तिसरया घासाला पोळी संपली” असं खुलेआम चिडवलं तरी त्याची क्वांटीटी काही वाढायची नाही. डब्याचे पैसे मात्र वेळेवर घ्यायला यायचा. पुढच्या आठवड्याचे ऍडव्हान्स द्याल? अशी ओशाळी विनंती सुद्धा तो करत असे. घोडयांच्या रेसचा त्याला भारी नाद. त्याची बायको पुढे पुढे पैसे जमा करायला लागली होती. पण त्याचा डबा बंद करुन लवकरच,मी आमच्या मेसच्या बीडकर काकूंकडून डबा घेउन जाण्यास सुरुवात केली. अगदी घरगुती पद्धतीच्या डब्यामुळे दुपारी जेवण्याची छान सोय झाली होती.

तेव्हा, माझ्या पहिल्याच जॉबमध्ये( म्हणजे ऍडॉर सामिया) लंच ब्रेकला डबा खाणे, म्हणजे एक माहोल असायचा. एका मोठया टेबलावर आम्ही दहा-पंधरा जण जमत असू. त्यामुळे विविध पद्धतीने केलेल्या भाज्या, उपलब्ध असत. फ़्रान्सिसला त्याने आणलेली अप्पम किंवा इडली मिळायची नाही आणि यादवभय्याला त्याच्या डब्यातील करेला.मिलिंद आणि आनंदच्या डब्यातील, साखरांबा-तूप बघून, आपल्या डब्यात कधी येणार असा विचार येउन जायचा. बरेच कलीग्स बॅचलर होते, त्यामुळे जसे दिवस जाउ लागले तसे डबा, बनवणारी व्यक्ती बदलत गेली. एखाद्याचं लग्न झाल्यावर, तो डबा कसा आणतो ह्याकडे सगळ्यांचं लक्ष असायचं. त्यामुळे बायकोच्या हातचा डबा आणि, आईच्या हातचा डबा ह्यातील फरक बरयाच जणांना समजू लागला. आपल्याला मिळणारा “नवीन” डबा, आता त्या “जुन्या” उंचीला कधी जाउन पोचणार , हा विचार त्या “ डबा-डिमोटेड” मित्रांच्या मनात येत असेल. पण मेस किंवा डबेवाल्याकडून , बायकोच्या हातचा डबा मिळू लागलेल्या नवविवाहितांसाठी मात्र ते “प्रमोशन” असायचं.

पण दिवसभराचं स्ट्रॆस घालवण्याचं ठिकाण ,म्हणजे लंच टाइम असे. जेवताना क्रिकेट, राजकारण, ऑफिस गॉसिप, लोकल घडामोडी, बॉलिवूड, असे नानाविध विषय जेवणाबरोबर तेवढ्याच चवीने चघळले जात. एखाद्याला एखाद्या दिवशी टार्गेट करुन, त्याची यथेच्छ खेचली जायची. तो अर्धा तास म्हणजे आमची रिचार्जींग बे होती. उरलेला वेळ काम करण्याची मानसिक क्षमता, तो अर्धा तास देउन जायचा.

ऍडॉर सामियामध्ये एक सेल्स इंजिनिअर होती. ती अगदी टीपीकल सेल्स इंजिनिअर होती. म्हणजे तिचे व्यक्तीमत्व जेव्हढे आकर्षक होते, त्याला साजेसा तिच्याकडे ड्रेसिंग सेन्स होता.त्यामुळे तिची प्रेझेंटेशन्स “बघणेबल” असायची. कंपनीचा सेल्स मॅनेजर तिच्याबरोबर सेल्सप्लॅन्स करत असायचा आणि ऑपरेशन्स मॅनेजरला सेल्सप्लॅन्स बरोबर एक्झेक्यूशन प्लॅन फाइन-ट्यून करण्यासाठी तिचीच गरज भासायची. आता डब्याच्या विषयात हे इतकं विस्ताराने सांगायचा उद्देश म्हणजे, ती रोज मला तिच्या डब्यात, न चुकता, काहीतरी स्वीट आणायचीच. ते मलाच देण्यासाठी, टेबलावर ती आधी आल्यास, ती माझ्यासाठी तिच्याशेजारची खुर्ची धरुन ठेवायची. मी आधी आलो तर, मी ही तसेच करत असे. पुढे-पुढे ही गोष्ट बाकी सगळ्यांच्या लक्षात आल्यावर, मोठया मनाने(!) कुणी माझ्या किंवा तिच्या शेजारी बसत नसे. पण लंच नंतर मात्र, अरे कपिल, तू एक तर गोरा घारा,चिकना चुपडा, तुला गोडधोड खायला घालून बकरयासारखा माजलास की, एखादया इदला हलाल करेल ती, सांभाळ बाबा! असा प्रेमळ सल्ला मिळत असे.

काही वर्षांनी, आमचा ऍडॉर सामियामधील डब्बा ग्रूप पंधरावरुन पाच वर आला , तेव्हा मी तो जॉब सोडून, थर्मॅक्स मध्ये गेलो. …..
क्रमश:

लंच टाईम आणि डब्बा ग्रूप- भाग २

तिथे मी नवीनच होतो. पण काम एव्हढे प्रचंड होते की, वेगवेगळ्या प्रोजेक्ट्सवर काम करुन माझा असा नवीन डब्बा ग्रूप कधी बनला तेच समजलं नाही. थर्मॅक्स जॉइन केल्यावर मी सुरुवातीच्या दिवसांत बरेच, रिव्हॅम्प आणि ऑगमेंटेशनचे प्रोजेक्टस केले. माझी जबाबदारी डिझाइन- इंजिनिअरिंगची असल्यामुळे, मी खूपवेळा साइट्सवर जात असे. ज्यात सुधारणा करायची आहे, ते बघितल्याशिवाय त्याचा अंदाज येत नसे. साइट्सवर जाउन जाउन, आमच्या कमिशनींग आणि कन्स्ट्र्कशन इंजिनिअरांशी माझे चांगले संबंध प्रस्थापित झाले. त्यांचा फिडबॅक आणि सूचना, रिव्हॅम्प आणि ऑगमेंटेशन जॉबच्या डिझाइनमध्ये मला यश देउन जायच्या. त्यात मलाही शिकायला भरपूर मिळायचं, पण अश्या ह्या अनोख्या दोस्तान्यामुळे, हे कमिशनींग आणि कन्स्ट्र्कशन इंजिनिअर्स ऑफिसमध्ये आले की, माझ्याबरोबरच डबा खात. दिवसेंदिवस साइटवर पडीक राहिल्यामुळे घरचा डबा खायचं समाधान त्यांना फार कमी दिवस मिळायचं, एक साइट संपली, की दुसरी वाटच बघत असे. घरच्या डब्याचं ते समाधान त्यांच्या चेहरयावर दिसायचं. मी, बाबर, गिरीश, भोइटे, मनोज आणि श्रीवास्तव असा आमचा तो डबा ग्रूप होता. ह्यातील कोणीना कोणी माझ्याबरोबर नक्की असे. फार क्वचीत एकटयाला जेवायला लागायचं.

थर्मॅक्स मध्येही लंच टाइम म्हणजे स्ट्रेस रिलीवींग टाइम असायचा. विविध विषयांवर चर्चा होत असे. तिथे असताना बाबरच्या डब्यातील भाजी खाल्ली की मला थेट आठवण यायची ती, मी लहान असताना, शेजारच्या गुरुप्रसादगोळांकडे खाल्लेल्या भाजीची. मूळच्या कराडच्या बाबर आणि गुरुप्रसादगोळांकडे मसाला सुद्धा एकाच पद्धतीचा कसा काय ह्याचं आश्चर्य वाटायचं. भोइटेंच्या डब्यातील साखरेच्या पाकातील रताळ्याचे काप, श्रीवास्तवकडचे “मूली और गज्जर का सलाड” अजूनही आठवतात. श्रीवास्तवकडचे जेवण जरा तिखट असायचे. त्याबद्दल विचारल्यावर, श्रीवास्तव “उसमे तेजपत्ता, धनिया और बहोत सारे मसाले डलते है भई” असे खास त्याच्या लखनवी अंदाजमध्ये सांगायचा. थर्मॅक्स मध्ये जायच्या आधीपासून माझा डबा, मेस ते बायकोच्या हातचा असा प्रमोट झाला होता. माझ्या डब्यातील रोजच्या तूप-साखरेवर किंवा आटीव आमरसावर मात्र सगळ्यांचा डोळा असायचा.

लंच झाल्यानंतर, मी माझ्या टीममध्ये काम करणारया, माझ्या ड्राफ्ट्समन मित्रांबरोबर टपरीवर जात असे. तिथे उन्हाळ्यात फ़्रूट डिश, ताक किंवा लस्सी पिण्याचा कार्यक्रम पार पडायचा. हिवाळ्यात मला हटकून सर्दी झाली की, शेख आणि जाधव मला एखादी गुडंग गरम ओढायचा आग्रह करत. त्याने ही सर्दी गेली नाही, तर मात्र एक डोळा बारीक करत, एक हात दुसरया हाताच्या तळव्याला लावून, आता “ह्याच्या” शिवाय पर्याय नाही असं ते मला सांगायचे.

जरी मी त्यांचा टीम लीड होतो तरी त्यांच्याबरोबर लंच टाईममध्ये मिसळल्यामुळे त्यांच्याशी चांगली मैत्री झाली. त्यांच्याशी ह्याआधी एवढं मिसळून कोणी वागलंच नव्हतं, मी त्यांच्यापेक्षा अनुभव आणि वयाने लहान होतो त्यामुळे सुरुवातीला "अशा साहेबाला" सामावून घेणं त्यांना कठीण जात असे. पण काही दिवसातच आमची छान गट्टी जमली. त्या लंचटाईम टपरी मिटींगमधून एक खरंखुरं टीम बिल्डींग कोणतंही विशेष ट्रेनींग न घेता आम्ही सगळे नकळत करत होतो. कामातही मला ते उत्तम सहकार्य देउ लागले.माझ्या टीमच्या कमीटमेंट्स नेहमी पाळल्या जाउ लागल्या.त्या आगळया टीम-स्पिरीट (!) मुळे रिव्हॅम्प आणि ऑगमेंटेशनचे डिझाइन सोडा, ग्रीन फिल्ड जॉब्सही यशस्वी पणे पार पडू लागले. बॉसने एका ऍप्रायझलमध्ये ह्या गोष्टीचा उल्लेखही केला.

नंतर नंतर, मी, सुहास नातू ,सुहास जोगळेकर, सोमवंशी, कल्लू कलावडे, प्रफुल्ल आणि निलेश असा डबा खाल्ल्यानंतरचा टपरीग्रूप स्थापन झाला होता. हया आमच्या ग्रूपमध्ये कंपनीतील सगळ्या डिपार्टमेंट्सधील एक एक जण असल्यामुळे, कुठे काय चालू आहे आणि हवा कुठच्या दिशेने वाहत आहे, ह्याची डिटेल्ड माहिती तिथे मिळायची. त्यामुळे नंतर होणारया रिव्ह्यू मिटींगची स्ट्रॅटेजी ठरवायला, तिथले इनपुट्स मदत करत!! आमच्या ह्या टपरीवरच्या इलाइट ग्रूपची मेंबरशीप, सहसा कुणाला मिळायची नाही. इथेच सुहास जोगळेकरांचे गुंतवणूक आणी शेअर बाजाराचे मौलिक मार्गदर्शन होत असे. जवळच असणारया कॉल सेंटरची शिफ्ट दिड वाजता संपून "ती क्राउड" इंडिका किंवा सुमो स्वार ( की प्रविष्ट) होऊ लागली की आमचा लंच टाइम संपायचा ही मात्र थोडी दु:खदायक बाब असे.

थर्मॅक्समधल्या त्या दिवसांमध्ये डबा ग्रूप आणि टपरी ग्रूप हे दोन असे अविभाज्य घटक होते.


थर्मॅक्स सोडून एमड्ब्ल्यूएच ह्या एम.एन.सी मध्ये जॉइन केल्यावर मात्र, लंच रूम मधले वातावरण अगदी एम.एन.सी सारखे धीरगंभीर असायचे. मग आम्ही(म्हणजे मी आणि इतर काही मित्र) त्याला, भारतीय रंग देण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. पिझ्झा, बर्गर सारखे जंक फ़ूड तिथे मिळत असल्यामुळे, ३-४ किलो वजन वाढल्यावर , ते अजूनही खात नाही.

तिथूनही सोडून आता ट्रान्सटेक मध्ये गेलो. पण तिथे डबा खायचा प्रसंग अजूनही आला नाही. कारण जॉइन करुन सरळ इथे अमेरिकेतच आलो. भारतात परत गेल्यावर डब्याची मजा परत ह्या नवीन कंपनीत तशीच असेल ना असा विचार मनात येतो.

इथे लंच एकत्र बसून धमाल वगैरे कन्सेप्ट नाही. एखादा फूट लॉंन्ग सब (फूटभर तरी पाहिजेच हो त्यांना!), टयूना/सालमॉन सलाड किंवा गेलाबाजार हॅम असलं की झालं लंच.त्याच्याबरोबर ग्लासात आइसक्युब्ज आणि आइसक्युब्जांमधल्या पोकळयांमध्ये कोक! हापिसातच मागवायचं. क्युबीकलमध्ये एकटयानेच संपवायचं. किंवा चेंज म्हणून रेस्टारंटात जायचं.

डबा असा खाल्ला तर पचायचा नाही आपल्याला बुवा.घर आणि ऑफिस जवळच आहे. त्यामुळे मी लंचला घरी येतो. घरी एकटयाने, लंच करताना मात्र, इतकी वर्षे केलेली डबा खातान्ची धमाल आठवते, आणि हळवं करुन सोडते.

डियर हंटींग अमेरिका भाग -१

कोकणात, माझ्या काकांबरोबर शिकारीसाठी भरपूर हिंडलो आहे. जंगलातही खूप भटकंती केली आहे.दसरयाच्या आसपास भातशेती कापणीला आली की, काकांना हमखास बोलावणं येई. भातशेतीची नासाडी करणारया रानडुकरांचा बंदोबस्त करायला. काकांबरोबर शिकारीला ,त्यांच्या गावातली माणसं उत्सुक असायची, कारण काका कधीच काही खात नसत. फक्त शौक म्हणून शिकार करायचे. त्यामुळे शिकार झाल्यावर आपल्याला मेजवानी मिळणार ह्या विचाराने, कोणीही तयार व्हायचं. मी त्यांच्याकडे असलो की मी पण जात असे भटकायला.....

पण हे सगळं आत्ता आठवायचं कारण म्हणजे, इथे अमेरिकेत सध्या डिअर हंटींग चा मोसम चालू आहे. दरवर्षी ,ऑक्टोबर ते जानेवारी ह्या महिन्यांत असतो. क्वेल पक्षी, ससे, खारी आणी हरणांची शिकार करण्याचा हा मोसम. पण ह्याला डिअर हंटींग सिझन असंच म्हणतात. ह्या सिझनबददल एकून होतो. त्यामुळे ऑफिसमधल्या शिकारयांची माहिती काढून ठेवली होती. आमच्या ऑफिसमधील अनुभवी शिकारी, चार्ल्स ब्रायन आणी लुईस लगाटुटा ह्यांच्या बरोबर मी मागच्या वीकांताला, जंगलात शिकार बघायला गेलो होतो.

इथल्या रहिवाश्यांना, काही अटी-शर्तींची पूर्तता केल्यावर डिअर हंटींग परवाना मिळतो. बो- आर्चरी(धनुष्य-बाण), प्रिमीटीव्ह फायर आर्म्स ( ठासणीची बंदूक) आणी शॉट गन ने शिकार करण्यास परवानगी असते. शिकारी कुत्र्यांना घेउन सुद्धा शिकारीला जाता येतं आणी still (कुत्रे न घेता).ह्या प्रत्येक प्रकारे शिकार करण्याचा ठराविक कालावधी असतो. त्या त्या काळात, त्याच साधनाने शिकार करता येते. म्हणजे बो-आर्चरीच्या काळात शॉटगन ने शिकार करता येत नाही. कारण त्यामुळे इतर शिकारयांना धोका उत्पन्न होतो.

बरंच दाट जंगल जवळच असल्यामुळे डिअर हंटींग सिझनची इथे लुइझिआनामध्ये भारी क्रेझ आहे. खास हंटर टी- शर्ट, ट्राउझर, कॅप्स, हंटर शूज वगैरे जामानिमा करुन बरेच लोक जातात हंटींगला.

इथे हरिणाच्या नराला बक, मादीला डो, आणी बछड्याला फॉन असं म्हणतात.फॉनच्या शिकारीवरती पूर्णपणे बंदी आहे. डोची शिकार पूर्ण मोसमात फक्त १ आठवडयाच्या कालावधीसाठी दोनदा म्हणजे एकूण २ आठवडे करण्यास परवानगी आहे. बकची शिकार मोसमभर कधीही चालते. सूर्योदयापूर्वी अर्धा तास ते सूर्यास्तानंतर अर्धा तास अशा ठरावीक वेळेतच शिकार करता येते. म्हणजेच रात्री करता येत नाही. शिकारीसाठी राखीव अवाढव्य जंगले आहेत.

परंतु ह्या शिकारींवर निर्बंध म्हणून एक शिकारयाला जास्तीत जास्त तीन शिंगवाल्या( with antelers) आणी तीन बिनशिंगाच्या हरणांची शिकार करता येते. एका शिकारयाला, एका मोसमात वरीलप्रमाणे ६ तसेच एका दिवसात जास्तीत जास्त २ हरणांची शिकार करता येते. ही शिकार झाल्यावर, त्याच्यावर फॉरेस्ट खात्याकडून मिळालेले “किल स्टीकर” लावावे लागते. त्या स्टीकरशिवाय जंगलातून शिकार बाहेर आणता येत नाही. हे सगळं पाळलं जातय की नाही ते बघायला रेंजर्स गस्त घालत असतात.

मादी म्हणजे डो माजावर येण्याचा हंगाम साधारण ऑक्टोबर ते डिसेंबर असा असतो. ह्या अवधीत तिचा बकशी संबंध येउन गर्भधारणा होते. त्यामुळे डो ला ह्या हंगामात मारण्यावर बंधन असते. अश्यावेळी तिची गर्भधारणा झाल्याचा संभव असतो.ह्या महिन्यांत अमावस्या ते पौर्णींमा असे पंधरा दिवस मादीसाठी गर्भधारणेसाठी योग्य असतात.

ऑक्टोबरपासून डिअर हंटींग सिझनची सुरुवात होण्याचं कारण म्हणजे,मोठ्या संख्येने, मादयांना आकर्षित करण्यासाठी जंगलात फिरणारे नर. इथल्या शिकारयांचं एथिक्स म्हणजे ते सहसा मादीला मारत नाहीत. आणी धनुष्य-बाणाने शिकार करण्याची हौस फार!!

नर माजावर आला की तो झाडाच्या बुंध्याला पुढचे दोन पाय लावून,आपली मान, डोकं आणी शिंग घासायला लागतो. आणी एक प्रकारचा गंध तिथे सोडतो. ह्याला इथे स्क्रेपिंग असे म्हणतात.अश्या अनेक पाइन वॄक्षांवर अश्या प्रकारे स्क्रेपिंग करुन झाल्यावर , त्याच्या गंधाचा सुगावा मादीला लागतो.नर पुढच्या दोन पायांनी जमीनीवरचा पाला-पाचोळा दूर करुन, जमीन थोडी खोदल्यासारखी करतो. त्या उथळ खड्ड्यात तो मूत्र विसर्जन करुनही मादीला इशारा देत असतो.

परंतु , त्याच्या गंधाने इतर इच्छुक नरसुद्धा तिथे येउन आधीच्या नराला आव्हान देतात. आणी मग सुरु होते ती त्यांची, मादीला प्राप्त करण्यासाठीची लढत.

थोडयाच दिवसांत येतोय भाग -२.. वाचत रहा .. पहा मिळाली का शिकार आम्हांला...
क्रमश:

डियर हंटींग अमेरिका भाग -२

शिंगावर किती पॉइंट्स(गाठी) आहेत त्यावर नराचे वय / प्रौढत्व ठरत असते. पूर्ण वाढ झालेल्य नराच्या शिंगांवर १०- १२ पॉइंट्स असतात. आपली डौलदार शिंगे रोखून, दोन नर एकमेकांवर चाल करुन जातात. मध्येच ते आपला राग (आणी रग!) जिरवण्यासाठी,एखाद्या झाडावर शिंगे किंवा मानेचा, तोंडाचा भाग घासतात. लढतीच्या वेळी पालापाचोळा, धूळ उडत असते. त्या दोन योदध्यांना कशाचेही भान उरत नाही.ह्या लढतीत, बलवान नराचा विजय होतो, आणि हरलेला घायाळ नर त्याच्या एरियातून निघून जातो. मग त्या एरियातील मादयांवर, जेत्या नराचा अधिकार असतो. नराने मादीला आकर्षित करुन घेण्यासाठी स्क्रेपिंग करणे आणी शेवटी त्याचा मादीशी संबंध येण्या पर्यंतच्या सगळ्या सिक्वेन्सला Rutting म्हणतात.

हुशार शिकारी, आपल्याकडील हरिणशिंगाचा एकमेकांवर घासून आवाज काढून नरांचे लक्ष वेधून घेतो. असा आवाज दोन नरांच्या झुंजीच्या वेळी तसंच नराने शिंग झाडावर घासताना येतो. त्यामुळे शिकारयाकडे अनायासेच इतर नर चालून येतात.नर बाणाच्या किंवा बंदूकीच्या टप्प्यात आल्यावर, त्याची शिकार करणं सोपं असतं. ह्या प्रकाराला Rattling म्हणतात.

पण म्हणून जंगलात कुठेही जाउन, असा शिंगांचा आवाज काढला की, नर तिकडे येतात का? नाही.

असा आवाज काढण्यासाठी, नरांची संख्या जास्त असलेला जंगली भाग निवडावा लागतो. तो भाग शोधण्याची सोपी युक्ती म्हणजे, त्या भागातील माद्या कधी पिल्ले घालतात ते पाहणे.

मादयांचे गर्भारपणाचा काळ सात महिने असतो. आधी उल्लेख केल्याप्रमाणे मादी माजावर येण्याचा हंगाम साधारण ऑक्टोबर ते डिसेंबर असा असतो.मादयांच्या माजावर येण्याच्या हंगामात त्यांना नराची साथ मिळाली तर त्या सात महिन्यांनी पिल्ले घालतात.म्हणजेच ज्या भागातील मादया जून ते जुलैमध्ये पिल्ले घालतात, त्या भागात पुरेसे नर असतात.

ह्या काळात मादीला गर्भधारणा झाली नाही, तर ती परत पुढच्या फेब्रुवारी मध्ये माजावर येते. त्यामुळे ज्याभागात मादया सप्टेंबरमध्ये पिल्ले घालतात, त्या भागात नर कमी असतात.

इथले शिकारी ह्या आडाख्यांबरोबरच, कोणत्या भागात पाइन वॄक्षांचे स्क्रेपिंग होत आहे, तसेच पुढच्या खुरांनी जमीन उकरली गेली आहे, पाला पाचोळा विस्कटला गेला आहे ते ही बघून आपले मचाण बांधतात.

मी, चार्ल्स आणी लुई,मागच्या वीकांताला, दोन दिवस रानात फिरुन काही हाती लागले नाही.दोन दिवस जंगलात फुकाची पायपीट मात्र झाली. जंगल जवळून बघायला मिळाले ते गोष्ट निराळी!

कधी लुईचा नेम चुकायचा तर कधी चार्लीचा. एकदा तर निसटता बाण बसून बक पळून गेला. चार्ली तसा अनुभवी खिलाडी, त्यामुळे तो इकडे तिकडे जाउन टेहळणी करुन आला की त्याला त्या भागात जास्त स्क्रेपिंग दिसायचे, किंवा एखाद्या भागात त्याच्या दिव्य दॄष्टीला पाला पाचोळा विस्कटलेला दिसायचा. त्याच्या सांगण्यावरुन मचाण हलवून जीव मेटाकुटीस आला. ह्या झाडावरुन उतरुन त्या झाडावर चढून मांडया भरुन आल्या. मात्र दोन दिवसांत अमेरिकेतील डिअर हंटींगची भरपूर माहिती मिळाली. तीच इथे दिली आहे.

शेवटी येता येता एक जंगली ससा आणी एक टर्की पक्षी मिळाला. त्यांचे चार्ल्सच्या रॅंचवर बार्बेक्यू करुन,त्यावर सगळ्यांनी आडवा हात मारला. बरोबर झक्कास वेस्ट इंडियन रम!!

कोकणात मी भेकरु (हरणाचा प्रकार)च्या लुसलुशीत मांसाची सागुती खाल्ली होती. डिअर हंटींग सिझनची सुरुवात झाल्यावर चार्ल्स आणी लुईसोबत, इथेही एखादे हरिण चापायला मिळेल म्हणून गेलो होतो, पण शेवटी ससा आणी टर्कीवर समाधान मानून परत आलो.

चार्ल्स आणी लुईने अजूनही हिंमत हारलेली नाही. पुढच्या वीकांतात परत जायचे प्लॅन्स आखले जातायत. त्यांच्याकडची लुईझिआना वाईल्ड लाइफ डिपार्टमेंटने दिलेली, शिकारीवर लावण्याची “किल स्टीकर्स” त्यांना खुणावतायत.

हॅलोविन...हॅलोविन...






आज ऑफिसमध्ये हॅलोविन पार्टी होती. त्यानिमित्त हॅलोविन म्हणजे काय हे जाणून घ्यायचा प्रयत्न केला. १९व्या शतकात अमेरिकेत आलेल्या, आयरिश लोकांनी ही प्रथा त्यांच्याबरोबर अमेरिकेत आणली. हॅलोविनच्या आसपास हिवाळ्याची चाहूल लागते. त्यामुळे येणारया हिवाळ्यासाठी घरात, पुरेसा धान्य आणी मांसाचा साठा आहे का नाही त्याचा हिशोब, ह्या दिवशी पूर्वी (१७/१८ व्या शतकात) लावला जात असे. कारण नंतरच्या कडाक्याच्या थंडीत, बाहेर पडायची पंचाईत व्हायची.

हॅलोविन, ऑक्टोबरच्या शेवटच्या शुक्रवारी साजरा करतात. नोव्हेंबरचा पहिला शनिवार, हा ऑल हॅलोज डे किंवा ऑल सेन्ट्स डे असतो. त्यामुळे हॅलोज ईव्ह, वरुन हॅलोविन असं नाव पडलं आहे. हॅलोज ईव्ह, हॅलोज ईव्ह, असं भरभर म्हणून बघा!!

थोडं विषयांतर!! अमेरिकेत एक मात्र बरं आहे. सगळे सण,ठराविक महिन्यात, ठराविक दिवशी असतात. म्हणजे शेवटचा शुक्रवार, पहिला शनिवार, तिसरा गुरुवार वगैरे. असो.

हॅलोविन चा सण अतॄप्त आत्मे, चेटकीणी, डाकीणी, भूत-खेत- पिश्शाच, वगैरे लोकांना शांत ठेवण्यासाठी साजरा केला जातो. त्यामुळे हॅलोविन पार्टीत घुबड, कावळा, कोळी, चेटकीण, डाकीण, गिधाड, काळं मांजर, हाडांचा सांगाडा, ममी ( इजिप्तमधली हो!), राक्षस अशी “त्या” कॅटॅगरीतील सोंगं काढली जातात. म्हणजे कावळ्याकडे बघण्याचा सगळ्यांचाच दॄष्टीकोन एकच की!!
भूतांच्या गोष्टी सांगितल्या जातात, हॉरर सिनेमे बघितले जातात, गूढकथा वाचल्या जातात. बोनफायर म्हणजे शेकोटीत हाडकं टाकायची प्राण्यांची. म्हणजे अतॄप्त आत्मे घरी येत नाहीत अशी इथे श्रद्धा आहे. ( अनिस वाल्यांना स्कोप आहे तर इथेही!!)
हॅलोविनच्या रात्री म्हणे इथल्या कुमारिकेने (!) मंद प्रकाशात आरश्यात एकटक बघितलं तर , तिला तिच्या होणारया पतीचा चेहरा दिसतो!!

भोपळ्याच्या केकशिवाय हा सण साजरा होत नाही. तसच लाल मोठे भोपळे कापून, त्यावर सुंदर नक्षीकाम कोरुन, त्यात मेणबत्त्या लावून, ते भोपळे घराबाहेर भूत- पिश्शाच्चांची ( लिहायला किती कठीण!) बाधा होउ नये म्हणून ठेवले जातात.

ऑफिसमधली काही भूतं खास तुमच्या साठी वरती दिली आहेत….. ह्यात एका मुलीने पॅलिनबाईंचे सोंग काढले आहे. पॅलिनबाई हे सुद्धा एक "भूत" आहे, ही विशेष दखल घेण्याजोगी गोष्ट आहे.

अजून बघायची असतील तर भेट दया माझ्या वेबअल्बमला.. त्याचा दुवा आहे..
http://picasaweb.google.com/kapilkale75/Halloween#

October 28, 2008

अफूची गोळी

बेस्टची बस आणी त्यातील प्रवाश्यांना ओलिस धरु पाहणारया राहुल राज ह्याला मुंबई पोलिसांनी एन्काउंटरमध्ये ठार केले.

होय , मुंबई पोलिसांनी जे केले , ते योग्यच आहे. ह्यामुळे मुंबई/ महाराष्ट्रात बिहारसारखे वागू पाहणारा प्रत्येक बिहारयाच्या मनात भय निर्माण होईल. मुंबई आणी बिहार पोलिसात फार फरक आहे. मुंबई पोलिसांची तुलना स्कॉटलंड यार्डशी केली जाते. त्या तरुणाला वाटले होते की, बिहारसारखे आपण मुंबईत वाट्टेल ते करु शकतो. त्याला इनोसंट म्हणणारया बिहारी नेत्यांनी हे लक्षात घ्यायला हवे की, नोकरी शोधायला आलेल्या गरीब बिचारया तरुणाकडे पिस्तूल कसे आले?

आजपर्यंत सर्वात जास्त रेलवे मंत्री बिहारी झाले आहेत. बिहार मधून मुंबईला जाणारया तरुणांना, बिहारात रोजगाराच्या संधी उपल्ब्ध झालेल्या नाहीत. मिळाल्या त्या फक्त बिहारी रेल्वेमंत्र्यांनी सुरु केलेल्या, मुंबईला घेउन जाणरया रेल्वेगाड्या.

बिहारमध्ये अशी हत्यारे खुलेआम विकली जातात. अश्या राज्यातील नेत्यांनी महाराष्ट्राबद्दल तोंडातून ब्र काढू नये. गेल्या ५०- ६० वर्षांत ह्या बिहारी नेत्यांनी, बिहारची वाट लावली नसती, तर त्या राहुल राजवर आज नोकरीसाठी,मुंबई गाठायची वेळ आली असती का?

आबा पाटील, मुंबई पोलिसांच्या पाठीशी ठाम उभे आहेत , हे चांगलेच आहेत. विलासरावांनी ही संधी साधून लगेच चौकशी सामिती स्थापन केली आहे. कारण गॄह खाते राष्ट्र्वादीकडे आहे. तिकडे शिवसेनेने, मनसेला ह्या मुद्दयावर सुद्धा बरोबर घेउन जाण्याचे नाकारले आहे.

राजने उभ्या केलेल्या आंदोलनामुळे मराठी मनाची त्याला सहानुभुती निर्माण झाली होती. त्याची दखल सर्वच पक्षांना घ्यावी लागली आहे. फक्त नारायण राणे आणी छगन भुजबळ ह्यांनी त्यावेळी सरकारला, रेल्वे भरतीबाबत महाराष्ट्र सरकार, रेल्वे खात्याला तसेच रेल्वे मंत्र्यांना जाब विचारणार आहे का, असे ठणकाउन विचारले होते.

पण आता ज्याप्रकारे बिहारी नेते एकत्र आले आहेत. काही वॄत्तपत्रे आणी सबसे तेज चॅनेल्सना हाताशी धरुन, ज्याप्रकारे हिंदी मिडीयात गरळ ओकली जात आहे, तेव्हा आता ह्या मुद्द्यावर समस्त मराठी नेत्यांनी मतभेद विसरुन एकत्र आले पाहिजे. इस्त्रीचे कपडे दिवसाला तीन वेळ बदलणारे, चापून चोपून भांग काढून फिरणारे, दिल्लीतील, मराठी गॄहमंत्री आता काय भूमिका घेतात हे पहायला हवे.

मुंबई पोलिसांना ह्या बाबतीत पाठिंबा असला तरी, आर आर आबांची वक्तव्ये ही, राज ठाकरेंनी निर्माण केलेल्या, मराठी लाटेवर स्वार होऊन, त्याच्याकडे झुकणारी मते आपल्यापक्षाकडे वळवण्याचा प्रयत्नांचा एक भाग वाटतात.

अशी वक्तव्ये करुन , त्यांनी बिहारी नेत्यांना एक अफूची गोळी रेडीमेड उपलब्ध करुन दिली आहे. ही अफूची गोळी, हे बिहारी नेते येत्या निवडणूकीत वापरतील आणी आधीच विकासापासून वंचित आणी सुन्न असलेली बिहारी जनता अजून बेशुद्ध पडेल.

उद्या, एखादा मराठी कामानिमित्त कोलकात्याला जाताना, त्याला मध्येच बिहारमध्ये, बिहार पोलिसांनी हकनाक उडवला तर?

October 24, 2008

लवकरच येत आहे

लवकरच येत आहे.... Coming Up Next ....

मित्रहो, अमेरिकेतील डीयर हंटींग सिझन तसंच बरेच दिवस मनात अडकून बसलेली लंच टाईम आणि डब्बा ग्रूपची पोस्ट आता पूर्ण केली आहे. दुसरा भागही इथे आता वाचायला मिळेल.
अजून पुढच्या आठवडयात


१. अजून अमेरिकन पाटया बाकी आहेत. त्या येतील पुढच्या वीकांतात.
२. ऑफिस ऑफिस! हा इथल्या ऑफिस कल्चरबद्दलचा लेख मॅड मॅड अमेरिका ह्या सदरात टाकेन.

तुमच्या प्रतिसादाने माझा हुरुप वाढला आहे. तुमच्या अभिप्रायांचे मी स्वागत करतो. असाच वाचत रहा.. नियमीत .. माझा ब्लॉग !!

दिवाळीचा फराळ तुम्ही पोटभर खाल्लाच असेल. कुठे कुठे फिरायल गेला होता ते नक्की कळवा मेलवर.

अमेरिका उलटी..




Coming Up Next मध्ये उलटेपणावर लेख लिहिणार असं वाचून अनेक मित्रांनी त्यातील योग्य शब्द कोणता- उरफाटी की उफराटी असा बराच काथ्याकूट घातला. शेवटी हे दोन्ही शब्द वगळून उलटी असा शब्द वापरायचा ठरवलं!


इथे येइपर्यंत अमेरिकेत सगळंच उलट असतं असं ऐकून होतो. तसा, मस्कत आणि दुबईत अनुभव घेतला होता, पण आता इथे हा उलटा अनुभव घेऊन बरेच दिवस झाले. पहिल्याच दिवशी न्यूयॉर्क ला हॉटेलच्या बसमधून एअरपोर्ट्वरुन हॉटेलकडे निघालो होतो. ड्रायव्हरला एका चौकात उजवीकडे वळायचे होते. मी त्यच्या पाठीमागेच बसलो होतो. समोर रस्ता दिसत होता. त्यामुळे मी माझ्या मनात टर्न घेतला तो लाँग घेतला. मला भारतात ड्राइव्ह करायची सवय. आपल्याकडे उजवे टर्न लाँग तर डावे टर्न शॉर्ट असतात. पण इथे बघतो तर काय? ड्रायव्हर चक्क शॉर्ट टर्न मारुन निघाला होता. बाप रे!! ह्या उलट्या अमेरिकेचा पहिला धक्का बसला होता.!!


पुढे अपार्टमेंटचे कुलुप, आलो तेव्हा बरोबर आलेल्या माईकने उघडून दिले. पण दुसरया दिवशी ऑफिसला जाताना दार लॉक करता येइना. मला लॉक म्हणजे क्लॉकवाईज माहिती हो, बराच वेळ खटपट करुन लक्षात आलं, उलट फिरवून बघूया, म्हणून पाहिलं तर काय, झालं की लॉक!! पुन्हा घरी आलो तेव्हा असाच घोळ. तेव्हा पण थोडया वेळाने उलट फिरवून पाहिल्यावर खुल जा सिम सिम झालं. लाईटची बटणं तर असतातच उलटी, त्याची झाली सवय, पण किचन कॅबिनेटच्या दारं , किंवा कोणताही एका झडपेचा दरवाजा, आपल्या भारतीय पद्धतीपेक्षा उलटाच असणार. म्हणजेच त्याला डावीकडे बिजागरी( हिंजेस) आणि उजवीकडे हँडल असणार. अजूनही किचन कॅबिनेटस उघडताना हात डावीकडे जातो, पण तिथे हिंजेस असतात!! मॉल्स मधली, दूध, दही, आईस्क्रीम, फ्रोजन फूड्सची कपाटंसुद्धा उलटी. आता ती सगळी एकमेकाला चिकटून ठेवलेली असतात. त्यामुळे काचेतून दिसणारया,आपल्याला हव्या असलेल्या वस्तूसमोरचा दरवाजा उघडला की समोर भलतीच वस्तू असते. कारण आपण पुढच्या कपाटाचा दरवाजा उघडलेला असतो!! इथे टाकलेले फोटो पहा. त्या फोटोंवर क्लिक केल्यावर ते मोठे दिसतील.

इथल्या जाहिरातीत दिसणारे कॉल सेंटर्सचे नंबर्स. ते नंबर म्हणजे आकडे नसतात, तर इंग्रजी अल्फाबेट्स असतात. म्हणजे इथेही उलटेपणाच की? मी आलो तेव्हा एअरलाईनच्या बॅगेज क्लेमचा नंबर दिला होता. तो असा 1-800-2235-BAGS. आता ही BAGS ही काय भानगड? हा नंबर डायल तरी कसा करायचा हो? तेव्हा समजलं की फोनच्या डायलपॅडवर जी इंग्रजी अल्फाबेट्स प्रत्येक आकडयाच्या खाली असतात, ते आकडे डायल करायचे, म्हणजे, BAGS साठी 2247 डायल करायचं. इथल्या लोकांच्या मेमरीला नंबर ध्यानात ठेवायचा जास्त ताण पडू नये म्हणून ही युक्ती. तुम्हाला बुकिंग करायचे असेल तर डायल करा BOOK म्हणजे 2665 वगैरे वगैरे..


इथे एक गोष्ट मात्र सुलटी बघितली. ती म्हणजे पोस्टाची डिलीव्हरी व्हॅन. ती मात्र आपल्यासारखी राइट हॅन्ड ड्रीव्हन. (पण इथल्या लोकांसाठी उलटीच नाही का?) का असे? म्हणून बघितलं तर प्रत्येक घरासमोर लावलेल्या पेटीत पत्र टाकणे डिलीव्हरीचालकाला न उतरता सुलभ व्हावे यासाठी! हो, पत्र पेटी रस्त्याकडेला घराच्या समोर असते. आता जर नेहमीसारखी लेफ्टहॅन्ड ड्रीव्हन गाडी असेल तर तो पत्र काय खाली उतरून टाकणार पेटीत? कल्पना करा लेफ्टहॅन्ड ड्रीव्हन गाडी रस्त्याच्या उजवीकडून जातेय , तर तो तुमचे पत्र रस्त्याकडेच्या पेटीत कसे टाकणार? व्हॅनमधे बसल्या- बसल्या त्याला तुमच्या पेटीत पत्र टाकता यावे म्हणून डिलीव्हरी व्हॅन राइट हॅन्ड ड्रीव्हन. आता बघा राइट हॅन्ड ड्रीव्हन गाडी रस्त्याच्या उजवीकडून जातेय तर तो चालक व्हॅनमधे बसल्या- बसल्या तुमच्या पेटीत पत्र टाकू शकतो की नाही?

ह्या उलटेपणाचा कहर म्हणजे घरात इस्त्री, टी.व्ही, टोस्टर आदी उपकरणांच्या टू-पिना. दिसायला अगदी साध्या. पण आता ह्यात काय उलटेपणा? सांगतो- आपल्याकड्च्या टू-पिनेला कसे गोल पाय असतात. इथे टू-पिनेला चपटे पाय असतात. हे कमी म्हणून की काय. ह्या चपटया पायांपैकी एकाची जाडी दुसरयापेक्षा जास्त असते. आणि हो, त्यामुळे ही टू-पिन अडकवण्याच्या सॉकेटला सुद्धा ज्या खाचा असतात ना, त्यातील एक जरा जास्त रुंद असते. त्यामुळे होतं काय ही टू-पिन कशीही घातली तर नाही जात सॉकेटमध्ये. ती एका ठराविक प्रकारेच जाते. जर तुम्ही टू-पिनचा जाड पाय सॉकेटच्या रुंद खाचेत घातला तरच!!


इथे एका विकांताला(हा शब्द मी माझा मित्र प्रशांतकडून उसना घेतला आहे, वीकेंड्साठी त्याने कॉईन केलेला हा शब्द!!) कारमधून भटकूया म्हणालो. माझ्याकडे आन्तरराष्ट्रीय चालक अनुमती ( ईन्टरनॅशनल ड्रायव्हींग परमीट) आहे, आणि मी रहातो तिथे विशेष ट्राफीक नाही त्यामुळे, म्ह्टलं की बघू चलवून गाडी इथे. न्यूयॉर्कचा अनुभव होताच, तसेच मी इथल्या कलिगच्या गाडीत त्यांच्या शेजारी बसलो होतो, त्यामुळे भीड चेपली होती. पहिल्यांदा अपार्टमेंट्च्या आसपास चालवली. काही प्रॉब्लेम नव्हता. त्यामुळे मेन रोडवर गेलो. हो जाताना उजवीकडे व्यवस्थित शॉर्ट टर्न न चुकता मारला. स्वतःलाच शाबसकी दिली.पुढे गेलो, आता सिग्नल होता. केला की घोळ भाउ, मी तिथे!! वळल्यावर पाठीमागून सायरन वाजवत कॉप हजर. समोर ट्राफिक नव्हतं त्यामुळे काही झालं नाही, पण मी चक्क राँग साईडला घुसलो होतो!! कॉपने परिस्थिती समजवून घेऊन, मोठया उदारपणे सोडून दिले!! वरती विचारले की, सोडू का घरी परत नेऊन? तेव्हापासून कार, स्वतःच चालवत कुठेही जात नाही!!

आता मीसुद्धा उजवीकडून एंटर आणि डावीकडून एक्झिटला सरावलो आहे.!
पण ह्या अमेरिकनांना,उलटेपणाची एव्हढी सवय झाली आहे, की ते ऑफिसच्या कॉरिडॉरमधून सुद्धा उजवीकडून चालतात, कार रस्त्यावरुन उजवीकडून चालवल्याप्रमाणे!!

घरोघरी मातीच्या चुली.. अमेरिकेतील निवडणूक प्रचार

सध्या इथे निवडणूकांचे दिवस आहेत. अगदी आपल्याकडच्यासारखा नसला तरी थोडाफार तसाच प्रचार सुरु आहे. ऑफिसमधे तीच चर्चा सुरु असते.

डेमोक्रॅटीक पक्षाचे बराक ओबामा हे रिपब्लिकन जॉन मॅक्-केन यांच्याविरुद्ध उभे ठाकले आहेत.बराक ओबामांचे पारडे सध्या तरी जड दिसत आहे. आजपर्यन्त झालेल्या तिन्ही आमने-सामने डिबेट्समध्ये तर ओबामा भाव खाउन गेले. उपहास, नर्म्-विनोद,वेळोवेळी वस्तुस्थितीची जाणिव करुन देणे आणि समोरच्यावर चिखलफेक न करता आपले मुद्दे ठाशीवपणे मांडण्याच्या त्यांच्या शैलीमुळे, मॅक्-केन हे पुरते बॅक-फूटवर गेलेले आढळले. गेल्या ८-९ वर्षातील रिपब्लिकन बुश शासनाचा कारभार, आणि सध्याची मंदीसादॄश्य परिस्थिती मॅक्-केन यांच्या काळजीत भर घालत आहेत. त्यांच्याकडे मुद्द्यांचा अभाव दिसतो आणि ओबामांएव्हढा कोणत्याही प्रश्नाचा अभ्यासही दिसत नाही.


डेमोक्रॅट पक्षाचे तिकिट मिळवण्यासाठी हिलरी आणि ओबामा यांच्यातील लढत, ओबामांनी जिंकून इतिहास घडवला. प्रथमच एक आफ्रो-अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या इतका जवळ आला आहे. त्या दोघांपैकी कोणीही जिंकले असते तरी तो इतिहासच होता कारण तर दुसरी महिला होती. पण एक झालं, डेमोक्रॅट पक्षाने त्या दोघांना उमेदवारी देऊन आपली प्रतिमा पुरोगामी बनवली.

आंतरराष्ट्रीय राजकारणाचा कमी अनुभव असलेल्या ओबामांनी त्या विषयातील महारथी जो बिडेन यांना आपला उपाध्यक्षपदाचा उमेदवार बनवले तर हिलरींना मिळणारा महिलांचा पाठिंबा लक्षात घेऊन, राजकारणात मुरलेल्या धूर्त मॅक्-केन यांनी अलास्काच्या गव्हर्नर सारा पॅलिन यांना आपला उपाध्यक्षपदाचा उमेदवार बनवले. तोपर्यन्त ह्या पॅलिन बाई कुणाला ठाउकही नव्हत्या. ह्या अनपेक्षित खेळीने ओबामांची कॅम्पेन १-२ आठवडे पिछाडीवर होती.पॅलिन बाई, त्यांचे फॅशनेबल कपडे,त्यांची धर्म श्रद्धा, त्यापोटी त्यांना झालेली पाच मुलं, त्यापैकी सगळ्यात मोठया षोडशवरशा मुलीला तिच्या बॉय-फ्रेंडपासून गेलेले दिवस (ज्यूली आठवतोय का?), पॅलीन बाईंचे फॅशनेबल ड्रेस ह्याने जणू काही अमेरिकेच्या समाजमनावर मोहिनी घातली. बाई आपल्या कुटुंब-कबिल्यासह प्रचारासाठी दिसू लागल्या. त्यांची ५ महिन्याची पोटुशी मुलगी, त्यांच्या प्रचाराचे जणू साधन बनली. धर्मनिष्ठेपोटी आपण मुलीचा, गर्भपात न करता तिचे, तिच्या बॉय-फ्रेंडबरोबर कसे लग्न लावून देणार आहोत, त्याच्या सुरस कथा साक्षात पॅलीन बाईंकडूनच ऐकाव्यात. त्या ऐकून इथल्या कॅथॉलिक सनातन्यांचे आपल्या बाजूने ध्रुवीकरण होइल अशी अपेक्षा असणारे रिपब्लिकन काही दिवसातच जमिनीवर आले. कारण ह्या सगळ्याला कंटाळलेली अमेरिकन जनता शेवटी, ओबामांकडे झुकती झाली. (आपल्याकडे त्यांना पालिन असे म्हटले जाते, इथे उच्चार पॅलिन असा करतात.बराक ओबामांना बर्राकोबामा, तर मॅक-केन ह्यांचा उच्चार जॉनकेन असा केला जातो.)


ओबामांनी छोटे उद्योगधंद्याना, तसेच मध्यम वर्गीयांना करसवलती देण्याचे घोषित केले आहे. इथे हेल्थ-इन्शुरन्स फार महाग आहे. त्यामुळे आम्ही तो स्वस्त कसा करु हे, ओबामा प्रत्येक डिबेटमधे मांडताना दिसतात. शिक्षणव्यवस्थेतही महत्त्वाचे बदल घडवून आणण्याचे त्यांचे मनसुबे त्यांनी जाहीर केले आहेत. इराकपेक्षा , अफगाणीस्तान- पाकिस्तानात सैनिकी कारवाईची गरज असल्याचे ओबामांचे मत आहे. इराक युद्धात किती मिलियन डॉलर्स फुकट चालले आहेत त्याची ते आकडेवारी देतात. आपला हेल्थ-इन्शुरन्सचा मुद्दा पटवून देताना, आपल्या आईच्या आजारपणाच्यावेळी इन्शुरन्स कंपनीबरोबर आपल्याला किती भांडावे लागले होते ह्याची ते भावनाविवश होऊन आठवण करुन देताना पाहून, आपल्या देशातील राजकारण्यांची आठवण येते. कोणत्याही फोरममध्ये, आम्हा पोलिटीशीयन्सना असलेल्या सुविधा, सामान्य माणसाला मिळत नाहीत, ह्याची आपल्याला किती खंत वाटते, ह्याची ओबामा वारंवार आठवण करून देतात असे म्हणण्यापेक्षा,संभाषणाची गाडी ह्याच मुद्द्यावर आणण्याची त्यांची हातोटी वाखाणण्याजोगी आहे. ते बघून आपल्या देशातील आम आदमीचा नारा लावणार्या राजकारण्यांची आठवण येते.
बेल आउट पॅकेजचे श्रेय दोन्ही उमेदवार घेताना दिसतात.


परंतु मॅक्-केन यांच्याकडे मुद्द्याची कमतरता जाणवते. नवीन मुद्दे मांडण्यापेक्षा ओबामांचे मुद्दे खोडण्यावरच त्यांचा भर दिसतो. इराक युद्ध हे देवाने सोपवलेली जबाबदारी आहे, आणि खर्च होतोय म्हणून माघार घेणे म्हणजे आतापर्यन्त सांडलेल्या रक्ताचा अपमान आहे,असे सनातन्यांच्या हृदयाला हात घालणारे,टाळीखाउ मुद्दे ते मांडतात.त्यांच्या घरातील, आजोबांपासून चालत आलेल्या, सैन्यात सेवा करण्याच्या परंपरेचे ते भांडवल करायचा प्रयत्न करतात. भारताशी केलेया अणु- करारामुळे, अमेरिकेला किती बिलियन डॉलर्स धंदयाची संधी उपलब्ध झाली आहे, ह्याचा मॅक्-केन यांच्या वाद सभेतील उल्लेखाखेरीज, भारताचा कुठेही उल्लेख होत नाही.


मी सध्या आहे त्या लुईझिआनाच्या सिनेटर डेमोक्रॅट मेरी लँन्ड्रू आहेत. त्यांचे विरोधक रिप. जॉन केनेडी त्यांच्या विरोधात जोरात जाहिरात करतात. ह्या बाईंची भ्रष्ट्राचाराची प्रकरणे तसेच त्यांनी किती वेळा, कोणत्या विधेयकाच्या बाजूने अथवा विरोधात मतदान केले आहे त्याची आकडेवारी केनेडी आपल्या जाहिरातींमध्ये दाखवतात. त्यांच्या विरोधात लँन्ड्रू बाई, केनेडींनी कितीवेळा पक्ष बदललेला आहे त्याची जंत्री देतात. त्यांच्या जाहिरातीत केनेडींच्या फोटोबरोबर एक रंग बदलणारा शॅमेलियॉन दाखवला आहे.ओबामा-मॅक्-केन ह्यांच्या जाहीराती अश्याच एकमेकांवर चिखलफेक करतात. जाहीरात संपता संपता ही जाहीरात कोण करत आहे हे दिसते , तसेच घाईघाईने सांगितले जाते.( म्युचुअल फंडाच्या जाहीरातीच्या शेवटच्या डिस-क्लेमर प्रमाणे!)


असे असले तरी ह्या आठवडयाअखेरीस ओबामांनी ५०% मतदारांची पसंती मिळवली आहे. मॅक्-केन ह्यांना ३९% पसंती आहे. प्री एलेक्शन ओपिनिअन पोलचे फॅड फार आहे. त्यातील निकालांच्या विश्लेषणाचे दळण मिडीया करत असतो. तसेच त्यावर उमेदवारांचाही विश्वास दिसत आहे. "मॅक्-केन इज अ फायटर, फायटर आल्वेज कम्स बॅक" हे खुद्द मॅक्-केन यांचे ताजे उद्गार ह्याच गोष्टीचे द्योतक आहेत. आघाडीच्या सर्व वृतपत्रांच्या ओपिनिअन पोलमध्ये ओबामाच आघाडीवर आहेत.


आर्थिक मंदीच्या गाळात , रिपब्लीकन पक्षाचे जहाज खोल रुतले आहे. त्यामुळे त्यातून उडया ठोकून तीर गाठणारयांची चढाओढ लागली आहे. अशीच उडी ठोकून, बुशप्रशासनातील माजी परराष्ट्रमंत्री जनरल कॉलिन पॉवेल ह्यांनी सरळ ओबामांचा तीर गाठला आहे. ओबांमाची कँपेन त्यांना "फिनॉमेनल" वाटायला लागली आहे. ते काही असले तरी ओबामांनी कँपेनच्या खर्चासाठी ह्या एका आठवडयात १५ कोटी डॉलर्स मिळवले आहेत.

मॅक्-केन ह्यांनी नुकतीच केलेली, बुशप्रशासनावरची जाहीर टीका, आणि प्रेसिडेंट बुश ह्यांना त्यांनी आपला प्रचार करण्यासाठी नाकारलेली अनुमती दोन गोष्टी पुरेशा बोलक्या आहेत असे मला वाटते. असे असले तरी, इथल्या अनेक विचारवंतांना ओबामांचा ब्रॅडली होणार की काय? अशी भिती वाटते. ब्रॅडली हे लॉस-एंजलिसचे अत्यंत लोकप्रिय, पण कृष्णवर्णीय मेयर होते. ते कॅलिफोर्निआच्या गव्हर्नरपदाच्या निवडणूकीला उभे राहिले होते, तेव्हा त्यांना मतदानपूर्व भरघोस पाठिंबा मिळत होता. तेच जिंकणार अशी परिस्थिती असताना ऐन मतदानाच्यावेळी वर्णभेद उफाळून आल्यामुळे, ते निवडणूक हरले. ही साधारण ३० वर्षांपूर्वीची घटना आता इथे सर्वांना आठवू लगली आहे.

इथला निवडणूक प्रचार पाहून,त्याची भारतातील प्रचाराशी तुलना केली तर, घरोघरी मातीच्याच चुली, ह्या म्हणीची सार्थता पटल्यावाचून रहात नाही.

October 23, 2008

नमनाला तेल !!

अमेरिकेबद्दल अनेकांनी लिहीलं आहे. अनेकांची प्रवासवर्णने आत्तापर्यंत वाचायला उपलब्ध आहेत. असं आसताना मी परत काय लिहू त्याच्या वर ? असा विचार आला मनात.

पण नंतर म्ह्टलं की इथली प्रगती तर माहीत आहेच मग त्याच्याबद्दल, हाय्-स्पीड रेल्वे बद्दल, गुळगुळीत रुंद रस्त्यांबद्दल आणि ऐहिक सुखांबद्दल, परत परत न लिहिता जरा आपण ही अमेरिका थोडी वेगळ्या नजरेतून पाहू, आणि लिहूया जशी दिसली, थोडी ह्टके!!

आजपर्यन्त खादाडीवरचा लेख तुम्ही वाचला असेलच. अमेरिकन व्हॅल्यूजवरचा लेख तर सकाळमधेच वाचला आहे तुम्ही सगळ्यांनी, तो ही टाकलाय इथे.

ह्यापुढे मी ह्या लेखमालेचे ६-७ भाग माझ्या ब्लॉगवर प्रकाशित करेन. मॅड,मॅड अमेरिका ह्या सदरात तुम्ही माझी ही लेखमाला वाचू शकता.आपण ते वाचून मला नक्की प्रतिक्रिया दया!

मराठी अस्मितेबद्दलचा लेख, रोखठोक ह्या सदरात वाचायला मिळेल. माझ्या गावच्या आणि माझ्या लहानपणीच्या आठवणी तुम्ही वाचू शकता, आठवणी दाटतात ह्या सदरात.

लवकरच येत आहे मध्ये ३ विषयांची झलक आहेच, ते मिळतील वाचायला पुढच्या आठवडयात,मॅड,मॅड अमेरिका ह्या लेखमालेत!!

मनोगत

आता हे अभि-ललित म्हणजे काय? तर साधं-सोपं आहे उत्तर. मी एक अभियंता आहे. आता गेली बारा वर्षे काम करतोय, कामानिमित्त भारतात इशान्य भारत वगळता बाकी सगळा भारत फिरुन झाला.परदेशातही फिरून झालं. इतकी वर्षे काम करताना, भटकताना अनेक अनुभव आले, अनेक घटना जवळून पाहिल्या. साठवत गेलो ते सारं मनात. तशी ललितलेखनाची पहिल्यापासून आवड. पण अजून काही म्हणावं तसं लेखन झालं नाही हातून. कधीतरी पेपरात एखादा लेख,ऑर्कुटवरचं काही,किंवा कंपनीच्या हाउस मॅगझीनमध्ये केलेलं लिखाण यापालीकडे गाडी जात नव्हती.

पण आता घरापासून दूर आहे. एकटाच आहे. वेळ असतो. त्यामुळे म्ह्टलं , ही संधी नाही सोडायची, एकदा लिहायची सवय लागली की, होईल आपोआप हातून नंतर.म्हणून हे एका अभियंत्याने केलेलं ललित लेखन. अभि-ललित.

इथे जास्त ललितच असेल. पण एखादा रोख-ठोक लेखही असेल. एखादी कविताही देइन कधी. मी मुदाम लिहायचं म्हणून लिहित नाही.अगदी उर्मी अनावर झाली की लिहितो. त्यामुळे लिखाणाचा दर्जा कायम राहतो, असं मला वाटतं. तरीही मी सातत्य राखायचा प्रयत्न करीन.

सकाळमधे दुसरा लेख प्रकाशित झाला. अनेक मित्र्-मैत्रिणींनी आवडल्याचं सांगितलं. अजून लिही, थांबू नकोस इथेच, अशा प्रतिक्रिया आल्या. त्यामुळे निश्चय अजून दॄढ झाला. अशाच विचारमग्न अवस्थेत मराठी अस्मितेचा लेख लिहून झाला. माझ्या गावाबद्दलही लिहून झालं.

दिवाळी आता येत आहे. अशा आनंदाच्या सणाला माझा ब्लॉग तुमच्यासमोर मांडायला विशेष आनंद होतोय.

दीपावलीप्रीत्यर्थ आपल्याला आणि आपल्या कुटुंबीयांना हार्दिक शुभकामना. ही दिपावली आपल्याला, भरभराटीची, सुखसमॄद्धीची, समाधानाची आणि उत्तम आरोग्याची जावो, ही ईश्वरचरणी प्रार्थना!!

पुढे सुद्धा असं लेखन माझ्या हातून नियमीत होत राहो!! अशी परमेश्वराकडे प्रार्थना करतो. तुम्हा सगळ्यांच्या शुभेछा आणि आशीर्वादांची गरज आहे. ते तुम्ही द्यालच अशी मला खात्री आहे.

मराठी अस्मिता

दोन महिन्यापूर्वी मी भारतात- पुण्यात असताना घडलेला हा प्रसंग..
तांदुळ आण असे घरुन सांगितले म्हणून गेलो होतो दुकानात, त्याला म्ह्टलं कि ३-४ नमुने दे पाव पाव किलोचे, करुन बघतो, जो चांगला वाटेल तो २ दिवसांनी घेऊन जाईन पोतंभर.
दुकानदार म्हणाला " नही साह्ब, कमसे कम १ किलो लेना ही पडेगा"
मी (मराठीतच) " पाव किलो देतोस का , तरच घेतो'
"नही साहब. १किलो"
मी " नाही घेत जा"
"ठीक है साहब"
डोकं सणकंल होतं. अजून काही औषधे घ्यायची होती.
समोर " ग्रेवाल मेडिकल" मध्ये गेलो.
तो पण गुर्मीत म्हणाला " वैट करना होगा" मी काही बोलायच्या आधीच, त्याची मस्ती सुरु झाली होती.
मी म्हणालो ( मराठीतच) " अरे हो बाबा , मला दिसतंय तू बिझी आहेस ते, मी थांबतो थोडावेळ"
तर मस्तवाल ग्रेवाल म्हणतो कसा " हिन्दी मे बात करिये, मराठी नही समझती"

तांदुळाच्या एपिसोडावरुन टाळकं फीरल होतं त्याला म्हणालो " हरामखोर, भोसडयात गेलास. जरा पुढे गेलो की चव्हाणांचं दुकान आहे, तिथे घेतो"

मी तर निघालो तिथून, पण माझ्या रुद्रावताराचा परिणाम म्हणून कि काय माझ्या आधी आलेल्या ५ कस्टमरांनी त्या ग्रेवालकडून आप्-आपली प्रिस्र्क्रिप्शन काढून घेतली आणि ते ही माझ्या बरोबर चव्हाणांच्या दुकानात आले.

सध्या मराठी अस्मितेचा मुद्दा जोरात आहे, राज ठाकरे त्यांचे विचार आणि इतर घडामोडीनी महाराष्ट्र ढवळून निघालाय. तिकडे असताना काही वाटत नाही ह्या सगळ्या गोष्टींचं पण इकडे इतक्या दूर मात्र बरंच काही जाणवत रहातं.


अश्या मनस्थितीत बरेच विचार येऊन गेले मनात.

तिकडे तामिळी लोक बघा. श्रीलंकेत हे तामिळी दहशतवादी कारवाया करतात. आपले एक पंतप्रधान - त्यांची हत्या केली. आता त्या अतिरेक्यांच्या मुसक्या आवळत आणल्या श्रीलंकेच्या लष्कराने, तर हे सगळे तामिळी एकासुरात गळा काढू लागले. मलेशियात ह्यान्च्या वंशीयावर थोडी कारवाई केली तरी ह्याना इथे भारतात कळा येतात.

आणी आपण मराठी माणसे, आपल्या अस्मितेबद्दल एव्ह्ढे उदासीन का? असेल राजचे एक्झेक्युशन चुकीचे, पण विचार तरी धगधगतायत ना? उद्या हे बिहारी आपल्याकडे येऊन आपली डेमोग्राफी बदलून टाकतील.

अमरनाथ ट्र्स्ट्ला जमीन दिली तर तो ओमार अब्दुल्ला काश्मीरियतचे गळे काढू लागला, त्यात त्याला काश्मीरची डेमोग्राफी बदलण्याचे डावपेच दिसू लागले.

आसामी लोकांनी, आसामात परीक्षेला आलेल्या, बिहारी आणी बंगाली उमेदवारांना हाकलून दिले, तेव्हा सगळे कसे गप्प बसले होते?

मग आता राजने काही केलं ,( त्यामागचा त्याचा उद्देश काही असो) तर आपण मराठीच का ओरड करतो?
इथे महाराष्ट्रात हे भय्ये येऊन त्यांचे काय काय धंदे चालतात ते पहा.

तिकडे आमच्या कोकणात, मल्याळी येऊन शेती करतात- अननसाची आणि माशांची. अननसाची शेती कसली हो? अननसाच्या कोवळ्या कोंबाच्या गंधाने तिकडे नाग आकर्षित होतात, त्यांना पकडून , विषाची आणि कातड्याची तस्करी करतात हे.

ह्या सगळ्यांना महाराष्ट्रच का हवा? तुमचे राज्य विकसीत करा ना?


परप्रान्तीय आय्.ए.एस्.अधिकारी मुंबईत मंत्रालयात बसून , आपल्याकडे मंजुरीला आलेले उद्योग बंगाल आणि कर्नाटकात कसे जाईल ते पाह्तो. हे सगळं बंद व्ह्यायला हवं.

बॅळगाव, निपाणी, गुलबर्गाच्या सरकारी एस्.टी डेपोत जाऊन बघितलेय कधी? बघा महाराष्ट्राच्या एस्.टी गाड्या आणि त्यांच्या चालक- वाहकाला मिळणारी वागणूक. महाराष्ट्राच्याबॉर्डरपर्यन्त गाडी रिकामी येते. कर्नाटकाच्या डेपोच्या फलाटाला लावू दिली जात नाही. विरोधाभास म्हणजे नाशीकपासून कोकणात राजापुरपर्यन्त आणि शिर्डीपासून लातुरपर्यन्त त्यान्च्या कानडी बोर्ड लावलेल्या एस्ट्या मात्र बिन्दिक्कत् फिरत असतात.

अमेरिकेत आणि इंग्लडात इतके परकिय नागरिक आहेत, सरकारी नोकर्या करताहेत, पण म्हणून विमानतळावर इमिग्रेशन ऑफिसर "बाहेरचे" नसतात. ते मात्र नेटीव्ह्च असतात कि नाही?

मग आपण सगळ्याचे महाराष्ट्रात स्वागत का करतो? त्याना मोक्याच्या नोकर्या का देतो?

परवाच्या पुणे सकाळ मधील फॅमिली डॉक्टर ह्या पुरवणीसाठी एक पाककृती स्पर्धा झाली होती त्यात १, २ आणी ३ हे क्रमांक कुणाला मिळाले असतील बरं? सौ. गुप्ता,सौ ओस्वाल आणि सौ.गुजराथी. सकाळने तिन्ही भगिनींच्या पाककृती जश्याच्या तश्या छापल्या आहेत. त्यातील मराठी वाचवत नाही. पुणे सकाळच्या स्पर्धेचा हा निकाल आपल्याला काय सांगतो?

महाराष्ट्राची डेमोग्राफी बदलतेय ती ह्या लोंढ्यामुळेच!!

बघा हे असेच चालू राहिले तर मुंबई- पुण्यात महापालिकेचे व्यवहार हिंदीत होऊ लागतील, आपल्या मुलाना शिकवायला एखादा बिहारी असेल, रेलेवेच्या घोषणा भोजपूरीत होऊ लागतील, सरसोच्या तेलातील बटाटेवडे स्टेशन च्या बाहेर गाडीवर मिळतील, नाष्ट्याला फाफडा अने कढी किंवा जलेबी - दही मिळू लागेल. स्टैट बैंकेत जाऊन आपल्याला धनाचे आवंटन करावे लागेल, घरी गैसचा सिलिंडर घेऊन भैय्या येइल, वैभव आणी विजयचे बैभब आणि बिजय होतील, तसे झाले तरी कुमार केतकरप्रभॄती वसुधैव कुटुंबकम चे नारे देतील!!

मराठी संस्कृती वरचे हे आक्रमण आपणच थांबवू शकतो.

बघा पटतंय का? म्हणून सांगतो..असेल राजचे एक्झेक्युशन चुकीचे, पण विचार तरी धगधगतायत ना? मग आता राजने काही केलं,( त्यामागचा त्याचा उद्देश काही असो) तर आपण मराठीच का ओरड करतो
?